मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ जंगीड सर्कल भागात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाची अवहेलना होत आहे.
भाईंदर- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ जंगीड सर्कल भागात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाची अवहेलना होत आहे. या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. भरीस भर म्हणून की काय स्मारकाजवळ कच-याचे ढीग साचलेले असतात.
२६/११ च्या नुसत्या आठवणीने देशवासीयांच्या अंगावर काटा उभा राहतो. मुंबईतील शिवाजी टर्मिनस, ताजमहाल हॉटेल, कामा रुग्णालयासह १२ ठिकाणी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बने हल्ला केला, त्यात १६४ जण मृत्युमुखी पडले तर ३०८ जण जखमी झाले होते. हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्यासह आठजण शहीद झाले होते, त्यांच्या स्मरणार्थ मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क भागातील जंगीड सर्कल जवळ ३० जानेवारी २०११ रोजी शहीद स्मारक उभारण्यात आले.
महापालिकेने त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला. परंतु, आता त्याची देखभाल नीटपणे होत नाही. स्मारकाच्या भोवताली सुका कचरा, वाढलेले गवत, पालापाचोळा, जाहिरातीचे तुटलेले फलक पडलेले असतात. तर स्मारकाच्या बाजूला कच-याचे ढीगसुद्धा असतात. स्मारक वर्षातून निदान एक वेळातरी पाण्याने धुऊन साफ करावे आणि २६/११ ला त्याला पुष्पांजली अर्पण करावी. अशी मागणी स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी महापालिकेकडे केली आहे.