दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खरमरीत टीका केली आहे.
अहमदनगर- दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’च्या झालेल्या पराभवावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे.
केजरीवाल यांच्या कथनी आणि करनीत अंतर पडल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. त्यामुळे ‘आप’ने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा अण्णांनी केला आहे.
‘आप’ला यश मिळाले नाही हे दुर्दैव आहे. ‘आप’मुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र ‘आप’ची विश्वसार्हता कमी झाली आहे, असे अण्णा म्हणाले.
सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून त्यांची बुद्धी पालटली. केजरीवाल यांनी सरकारी सवलती घेणार नसल्याचे आधी जाहीर केले होते, मात्र सत्तेत आल्यावर गाडी, बंगला, मानधनही घेतले. सर्वांपेक्षा जास्त पगारवाढ केल्याचेही अण्णांनी म्हटले आहे. यावेळी अण्णांनी ‘आप’चा एव्हीएम मशीनच्या आक्षेपाचा दावाही फेटाळून लावला. याआधी निवडणूक आयोगाने आवाहन केले होते ना, मग त्यावेळी दोष का दाखवला नाही, असा सवाल अण्णांनी केला आहे.
सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला ‘अण्णा माझे गुरू आहेत,’असे सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. तसेच त्याच्यापासून दूर झालो, एका परिने देवानेच मला वाचवले, असा टोलाही अण्णांनी लगावला आहे.
Kathni aur karni mein antar pad gaya hai: Anna Hazare on AAP #MCDelectionresults2017 pic.twitter.com/7B10nvjoeE
— ANI (@ANI_news) April 26, 2017