मराठवाडयातील आठ जिल्ह्यांत गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. जवळपास ६५ टक्क्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नांदेड- मराठवाडयातील आठ जिल्ह्यांत गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. जवळपास ६५ टक्क्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली या आठ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ४६० जागांसाठी २ हजार २९५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
७६ पंचायत समितीच्या ९३० जागांसाठी ४ हजार ८५ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भाग्य एव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले. लग्नाची तिथी असल्याने सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही; परंतु दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या.
बीड जिल्ह्यातील नेकनूर मतदान केंद्रावर ५००पेक्षा अधिक मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने गोंधळ उडाला. तर काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक यंत्रात बिघाड झाल्याने काही काळासाठी मतदान प्रक्रिया ठप्प झाली. सरकारी अधिका-यांनी तातडीने मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरू केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदान केंद्रावर एका नवरदेवाने आपली वरात मतदान केंद्रात आणली. घोडयावर बसून आलेल्या नवरदेवाने अगोदर मतदानाचा हक्क बजावला व नंतर तो बोहल्यावर चढला. तरुण मतदारापासून ते वयोवृद्ध मतदारापर्यंत अनेक जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक मतदान केंद्रावर अपंगांनीही मतदानाचा हक्क बजावला.
धमार्बाद तालुक्यातील पाटोदा बु. या आदर्श मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचा-यांनी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक मान्यवर नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या दोन भगिनींसह मतदानाचा हक्क बजावला.
लातूर जिल्ह्यातील बाभळगाव मतदान केंद्रावर माजी मंत्री दिलीप देशमुख, वैशालीताई देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. लिंबगाव मतदान केंद्रावर माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला.
वैजापूर तालुक्यात गोंधळ!
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील धोंदल गावात मतदान केंद्रावर भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांत वाद झाला. त्यानंतर भाजपा कार्यकर्ते व पोलिसात बाचाबाची झाली. त्या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.