रायगड जिल्ह्यातील दुर्गम वाडय़ा-वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या सुमारे ५३० प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील दुर्गम वाडय़ा-वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या सुमारे ५३० प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. त्यासाठी या शाळांची पटसंख्या कमी असल्याचे कारण सांगण्यात आले असून त्यामुळे या वाडयांतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार मात्र मारला जाणार आहे.
यामुळे आघाडी सरकारने सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाचा बळी दिला जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांनी केला आहे.
ज्या प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्या २०पेक्षा कमी आहे, त्या शाळा बंद करण्यात येणार असून शिक्षणाधिका-यांनी त्याची प्रक्रियाही सुरू केली. मात्र यामुळे या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर शिकायचे असले, तर ५-७ कि.मी. वरील शाळेत पायपीट करावी लागेल.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांमध्ये आधीच शिक्षणाची गोडी निर्माण करावी लागते, त्यांच्या गावात असलेली शाळा बंद केली, तर ती मुले खरंच पायपीट करून लांबच्या शाळेत येतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत शिक्षण विभागाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांनी रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सचिव नंदा म्हात्रे व इतर कार्यकत्रेही उपस्थित होते.