मराठी साहित्य संमेलन म्हणजेच चोरांची आळंदी आहे. साहित्य संमेलनाचा व्यवहार अत्यंत दृष्ट बुद्धीच्या पुरुषांनी नियंत्रित केला आहे.
ठाणे- मराठी साहित्य संमेलन म्हणजेच चोरांची आळंदी आहे. साहित्य संमेलनाचा व्यवहार अत्यंत दृष्ट बुद्धीच्या पुरुषांनी नियंत्रित केला आहे. यात खरा साहित्यिक कधीही सहभागी होऊ शकत नाही, असा आरोप लेखक मिलिंद बोकील यांनी नुकत्याच ठाणे येथे आयोजित केलेल्या मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात केला.
नौपाडा येथील हितवर्धिनी सभेचे सावरकर वाचनालय यांच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाचे पहिले पुष्प मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली जोशी यांनी घेतलेल्या प्रसिद्ध लेखक बोकील यांच्या मुलाखतीतून उलगडले. खरे साहित्यिक साहित्य संमेलनात कधीही सहभागी होऊ शकत नाहीत. साहित्य संमेलनात वाचकांची लोकशाही आणायची असल्यास वाचनालयांनी पुढाकार घ्यावा. असे घडले तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष वाचक पसंतीनुसार निवडला जाईल, असे मत त्यांनी मांडले.
जर शासनाचे पुरस्कारच परत करायचे होते, तर पुरस्कार स्वीकारलेच का, असा सवाल त्यांनी ‘पुरस्कार वापसी’ करणा-यांना केला. शासन जेव्हा पुरस्कार जाहीर करते, तेव्हा त्यामध्ये काहीतरी साटेलोटे असते, असेही ते म्हणाले. त्यामुळे राजसत्तेशी साहित्यिकांचा उभा दावा असावा. साहित्यिकांनी राजसत्तेकडून कोणतेही पुरस्कार स्वीकारू नये. पुरस्कार स्वीकारतानाही साहित्यिकांना मेंढय़ांसारखे रांगेत उभे राहावे लागते, तसेच मिळणारे पुरस्कार हे अनेकवेळा भ्रष्ट पुढा-यांकडून मिळत असतात.
माझी कोणतीही परवानगी न घेता राज्याच्या साहित्य-सांस्कृतिक मंडळाच्या पदावर मला बसवण्यात आले होते. मात्र मी त्याला विरोध केला. आजचे पुरस्कार जाहीर करणारे शासन उद्या आपला गळा दाबू शकते, असेही ते म्हणाले. गांधी आणि विनोबा या दोघांनाही महाराष्ट्राला समजून घेता आले नाही. महात्माजींचा द्वेष आणि विरोध ही आपली ऐतिहासिक चूक आहे. शेतक-यांची अवस्था पाहता महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड यातील आसूड उगारण्याची आज तितकीच गरज आहे. जे राजकारणी शेतक-यांचे पुत्र म्हणवून घेतात, त्यांनीच शेतक-यांचा गळा घोटला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
[EPSB]
युरोपमध्ये गांधी जयंतीनिमित्त ‘फॉलो द महात्मा’
[/EPSB]