आपल्या शिस्तबद्ध आणि शांततेने एक नवा आदर्श निर्माण करीत असतानाच संपूर्ण समाजमन ढवळून टाकणारे मराठा क्रांती मोर्चाचे वादळ दिवाळीच्या नंतर आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबईत धडकणार आहे.
मुंबई- आपल्या शिस्तबद्ध आणि शांततेने एक नवा आदर्श निर्माण करीत असतानाच संपूर्ण समाजमन ढवळून टाकणारे मराठा क्रांती मोर्चाचे वादळ दिवाळीच्या नंतर आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबईत धडकणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी झालेल्या सकल मराठा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनाबाबत शिवाजी मंदिर येथे समन्वय समितीची बैठक पार पडली. मुंबईतला मोर्चा हा जगातला सर्वात मोठा मोर्चा म्हणून नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती, वाहनांची पार्किंग व्यवस्था, एवढी मोठी संख्या एकत्र येण्यासाठीची जागा व मुंबईतली वाहतूक यंत्रणा याचे नियोजन करावे लागेल. अशी भूमिका जिल्ह्याजिल्ह्यांतून आलेल्या समन्वयकांनी मांडली. काही संघटनांचा मोर्चाची तारीख निश्चित करा असा आग्रह होता.
अखेर महिला कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून मोर्चाबाबत समन्वयाने निर्णय घेण्याची सूचना केली. अखेर मोर्चा दिवाळीनंतर व हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर काढण्याच्या निर्णयावर एकमत झाले.
दरम्यान, यंदाच्या दिवाळीत प्रत्येक घरात कोपर्डी बलात्काराच्या बळी ठरलेल्या भगिनीला आदरांजली म्हणून एक पणती लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर दिवाळीत नवे कपडे घातल्यास त्यावर एक काळी फीत लावून मराठा मोर्चाच्या मागण्या मान्य न झाल्याचा निषेध नोंदवण्याचाही निर्णय झाला.