मराठा समाजातील मोठा घटक शेतीवर अवलंबून आहे, त्याची सध्या अवस्था अत्यंत बिकट आहे.
नवी दिल्ली- मराठा समाजातील मोठा घटक शेतीवर अवलंबून आहे, त्याची सध्या अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे अन्य जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी केली.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर निघणा-या प्रचंड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पंतप्रधानांची घेतलेली ही भेट महत्त्वाची ठरली आहे. मराठा समाजाची अवस्था बिकट असून बहुतांशी समाज हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे.
केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित असलेल्या मराठा आरक्षणासारख्या या कळीच्या मुद्दय़ावर संसदेत समन्वयाने योग्य त्या प्रक्रियेची सुरुवात व्हावी, अशी विनंती आपण केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबतही पंतप्रधानांशी चर्चा झाली.
सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्या वाढत आहेत. त्यांच्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळत नाही. अनेक साखर कारखान्यांनी वीजनिर्मितीचा जोड उद्योग सुरू केला आहे. मात्र सरकार त्यांची वीज घ्यायला अनुत्सुक आहे.
साखर कारखान्यांकडून तयार होणारी वीज साखर कारखाने आणि सरकारला उपयुक्त ठरू शकते. इथेनॉलबाबत सरकारने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा. कारण सरकारने बदललेल्या धोरणामुळे इथेनॉलनिर्मिती करणा-या साखर कारखान्यांवर परिणाम झाला आहे, असेही ते म्हणाले.
जानकर यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी
भगवान गडावरील मेळाव्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. या ‘सुसंस्कृत’ मंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्री कोणती कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे, असे पवार यांनी सांगितले.