उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सीमेपलीकडील दहशतवाद रोखल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.
नवी दिल्ली- उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सीमेपलीकडील दहशतवाद रोखल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.
पाकिस्तानच्या अणू हल्ल्याच्या धमकीबाबत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पर्रिकर म्हणाले की, उथळ पाण्याचा खळखळाट फार. तसेच उरीमध्ये झालेली घटना पुन्हा होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.
या हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीमेपलीकडील दहशतवाद रोखल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. याबाबत कोणतीही पावले उचलावीत याचा निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार निर्णय घेईल.
उरीबाबत काही त्रुटी राहिल्याची शक्यता आहे. याबाबत आपण आताच तपशिलात जाऊ शकत नाही. कारण हा संपूर्ण विषय संवेदनशील आहे. आता त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.