मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना किंवा भाजपा सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घेणार, याविषयी राजकीय विेषकांची मतमतांतरे सुरू असताना मनसेचे सात नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येते. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करताना तसे संकेत दिले.
महापौरपदाची निवडणूक ९ मार्च रोजी आहे. मनसे आणि शिवसेना महापालिकेत एकत्र आले असते. तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या आणि शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती, अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशातच शिवसेनेकडून सत्ता स्थापण्यासाठी भाजपा वगळता इतर पक्षांबरोबर समिकरणे मांडली जात आहेत.
शिवसेनेला काँग्रेस,मनसे सारख्या पक्षांनी पाठिंबा दिल्यास सेनेचा महापौर सहजपणे होऊ शकतो. तेव्हा मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा या मुद्याखाली मनसेच्या सात नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा मिळू शकतो.
मात्र, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच घेणार आहेत. हा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.
त्यामुळे शिवसेनेला मनसे टाळी देण्याची शक्यता बळावली आहे. उशिरा का होईना शिवसेनेला मनसेचं म्हणणं पटलं. त्याचा आम्हाला आनंद आहे,असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. ‘मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील.
राज ठाकरेंचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो’असंही बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेसमोर असलेला मुंबई महापालिकेतील बहुमताचा पेच मनसेच्या सात नगरसेवकांच्या साथीने सुटणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.