नवरात्रोत्सावाच्या नऊ दिवसांत रास गरबासाठी आयोजकांकडून मैदानांवर मैदाने मारली जात आहे.
मुंबई- नवरात्रोत्सावाच्या नऊ दिवसांत रास गरबासाठी आयोजकांकडून मैदानांवर मैदाने मारली जात आहे. महापालिकेने सवलतीत ही मैदाने उपलब्ध करून घ्यायची व गरबा खेळणा-यांकडून पैसे वसूल करायचे असे धंदे आयोजकांकडून सुरू आहेत.
त्यामुळे रास गरबांसाठी महापालिकेने मैदाने उपलब्ध करून देताना त्यांच्याकडून व्यावसायिक दराने शुल्क वसूल करण्याची मागणी मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका सवलतीत मैदान देणार असेल तर आयोजकांच्या नफ्यातील ५० टक्के हिस्सा महापालिकेला मिळावा, या अटींवर ही परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शाकाहार व मांसाहारावरून जैनविरोधात आंदोलने करणा-या मनसेने आता गुजराती समाजाला लक्ष्य केले आहे.
मनसेचे महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देताना नवरात्र उत्सवात सर्व दांडिया रास आयोजकांना व्यावसायिक दराने किंवा ५० टक्के नफा भागीदारी तत्वाने मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दांडियाचे आयोजन करताना अनेक ठिकाणी हजारो रुपयांचे शुल्क घेऊन तिकिटांची विक्री केली जाते. त्यामुळे आयोजकांना लाखो रुपयांचा फायदा होत असतात. गणेशोत्सवात जी मंडळे प्रायोजकांकडून बॅनर्स किंवा गेट घेतात, त्यांनाही व्यावसायिक दराने भाडे आकारले जाते. मग दांडिया आयोजकांना वेगळा न्याय का, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.