माहेर..! स्त्रीच्या जीवनातील हळवा कप्पा. शरीराने सासरी नांदणारी. मुलाबाळांत रमणारी स्त्री सय येताच क्षणात माहेरी पोहोचते. मनाच्या डोळ्याने माहेरच्या अंगणी, दारी, घरात, परसात संचार करते.
माहेर..! स्त्रीच्या जीवनातील हळवा कप्पा. शरीराने सासरी नांदणारी. मुलाबाळांत रमणारी स्त्री सय येताच क्षणात माहेरी पोहोचते. मनाच्या डोळ्याने माहेरच्या अंगणी, दारी, घरात, परसात संचार करते. माहेरी जाणं म्हणजे सासुरवाशिणीला सासरच्यांकडून मिळणारी सर्वात मोठी भेट. माहेरी जाणं म्हणजे जणू उत्सव. माहेरी जाणं म्हणजे जसा सण. अशाच एका माहेरवाशिणीचा माहेरी येण्याचा उत्सव म्हणजे सौदंण्याच्या चिमणीबुबू ऊर्फ बिबिसाहेबबीची यात्रा. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अप्रतिम उदाहरण. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्याजवळ आठ-दहा किलोमीटरवर वसलेले छोटेखानी खेडे म्हणजे सौदंणे हिंदू-मुस्लिम एकता आणि स्त्री सन्मानाचे उदात्त उदाहरण. गावाच्या मध्यभागी मशिदीजवळ असणारा दर्गा म्हणजे मुस्लिमांसाठी बिबिसाहेबबी आणि मेहमानची माजार तर हिंदू आणि लिंगायतांसाठी चिमणाबुबू आणि पाव्हण्याचं देवस्थान.
खेडेगावात जावयाला मुसलमानात मेहमान तर हिंदूत पाव्हणं म्हणण्याची रीत असते. यात्रे व्यतिरिक्त दग्र्यात गेलो तर मजारींवर गलाफ म्हणजे चादर लोबान उद जळताना दिसतो तसेच हळदीकुंकू फूल वाहून दर्शन घेतानाची भक्त मंडळीही पाहायला मिळतात. या दग्र्यात दोन मजारी दिसतात. एक हजरत बिबिसाहेबबी ऊर्फ चिमणाबुबूची तर दुसरी त्याला लागूनच मेहमानची म्हणजे पाव्हण्यांची. गुढीपाडव्याच्या नंतर दुस-या दिवसापासून जत्रेला प्रारंभ होतो. जत्रा चार दिवस चालते. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम जसे कुस्ती, व्याख्यान, भजन, गाणी असे कार्यक्रम दररोज होतात. खाऊ, खेळणी, बांगडय़ा, भांडी, कपडे, मिठाया अशी अनेक प्रकारची दुकानं लागतात. सारा गाव आनंदमय, चैतन्यमय होतो. गावक-यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो.
दग्र्यासंबंधी आख्यायिका सांगताना गावातले जुनेपुराने बुजुर्ग सांगतात की हजरत साहेबबी या सौदंणे गावच्या. त्यांचा विवाह सौदंण्यापासून जवळच असणा-या तामदर्डी गावात झाला. बहुतेक हा आंतरधर्मीय विवाह असावा. एकदा चिमणाबुबू माहेरी आल्या असताना पाहुणा त्यांना सासरी न्यायला आला. तेव्हा दोघात काहीतरी बोलाचाली झाल्याने चिमणाबुबू रुसून तिथल्या चिंचेच्या बनात गेल्या. पाहुणा त्यांची समजूत घालायला मागोमाग गेला आणि दोघेही अचानक त्या बनातच अंतरधान पावले. ज्या जागी ते गुप्त झाले तिथेच दर्गा बांधून मुस्लिम आणि हिंदू त्यांना गावचे खानदानचे कुलदैवत मानून पूजतात. अशा थोडय़ाफार फरकाने अनेक कथा यासंबंधी सांगितल्या जातात. उरुसाच्या दुस-या दिवशी तामदर्डी गावते लिंगायत समाज चिमराया भीमराया जे चिमणाबुबूचे मानलेले भाऊ समजले जातात, त्यांचे मुखवटे ठेवलेली पालखी मानपानाने गावात आणतात. दोन्ही समाजाचे लोक आपापल्या पद्धतीने पूजा करतात. एक दिवस मुक्काम करून तिस-या दिवशी पालखी परत जाते आणि यात्रेची सांगता होते. सौदंणेगावच्या अनेक पिढय़ांपासून सुरू असलेली ही प्रथा आजही सुरू आहे.
या उरूस उत्सवात खरा मान सन्मान होतो. तो गावच्या सगळ्या लेकीबाळींचा. उरुसाला सासरी गेलेली प्रत्येक लेक माहेरी आणायचा इथे रिवाज आहे. सगळ्या माहेरवाशिणी मग त्या हिंदू असो अथवा मुसलमान सगळ्यांना हिरवाचुडा भरला जातो. या दिवशी अगदी तरुणींपासून वयस्कर स्त्रियाही हिरवाचुडा, गजरे, फुले लावून छान नटूनथटून असतात. प्रत्येकाच्या घरात मांसाहारी स्वयंपाक केलेला असतो. घरी आलेल्या प्रत्येकाला जेवण केल्याशिवाय जाऊ दिले जात नाही. अनेक कुटुंब नवसाचा स्वयंपाक करतात. आपले परके सगळ्यांना खाऊ घालतात. दूरदूर सासरी गेलेल्या सख्यांची भेट होते. दूर शहरात राहणारे नातलग जत्रेला आवर्जून गावी येतात.
यात्रेचे व्यवस्थापन गावातील हिंदू-मुस्लिम मिळून करतात. दग्र्याचे मुजावर मात्र मुसलमान आहेत. आणखीन एक उल्लेखनीय आणि अभिमानाची बाब म्हणजे उरुसाच्या दिवशी दग्र्यात मजारीजवळ महिलांना मुक्त प्रवेश आहे. महिला मजारीजवळ थांबून येणा-या भक्तांची चादर चढवणे. शेरा-हार घालणे. नैवेद्य चढवणे, नारळ फोडणे बाकी सगळे विधिवत करतात. मजारीवर नव्या साडीचा पदर कापून त्याचा झेंडा करून वाहण्याची पद्धत आहे आणि पदर कापलेली साडी सवाष्णबाईला देतात. गावच्या बायका सवाशीण म्हणून जेवायला गेल्यावर प्रत्येकाच्या भांगेत सिंदुर भरले जाते. मुसलमान स्त्रियांच्या भांगेतही या दिवशी सिंदुर भरलेला दिसतो.
साल २०१६ दर्गा आणि मंदिर प्रवेश या मुद्दय़ाने गाजला. शेवटी न्यायालयात याचिका सादर करून स्त्रियांनी मंदिर दर्गा प्रवेशाचा हक्क परत मिळवला जो पुरुषी वृत्तीने हिरावून घेतला होता. दग्र्यातली मजार स्त्रीची असो अथवा मंदिरात स्त्री दैवत असो तिथली पूजा, खिदंमत, अभिषेक, अलंकार नेसवणे, संदर, तबर्रक, शेरा, धूप, अत्तर चढवणे पुरुषच करतात. कारण काय तर धर्माने बाईला याची बंदी घातलीय. थोतांचं आहेत सारी! धर्मात कुठेच याचे पुरावे सापडत नाहीत. पुरुषी मानसिकतेने रचलेले कुभांड सारं! दर्गा-मंदिर प्रवेश हा आमचा मुद्दाच नाही. आमचा लढा आहे, असमानतेविरुद्ध.. लिंगभेदाविरुद्ध.. दुय्यमत्वाविरुद्ध! अन्यथा शांतीची, सहवासाची, सोबतीची, एकतेचीच आम्हाला आस आहे. हजरत बिबिसाहेब आणि पाव्हण्यांची सत्य कथा काही का असेना तो इतिहास त्यांनाच माहीत. पण आजच्या जातीद्वेषाच्या धगधगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मळा फुलवणा-या अशा उदाहरणाची नितांत गरज आहे.
[EPSB]
[/EPSB]