देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘उडान’ या योजनेला महाराष्ट्रात मात्र ब्रेक लागला आहे.
मुंबई- देशातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘उडान’ या योजनेला महाराष्ट्रात मात्र ब्रेक लागला आहे. राज्यात सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक आणि नांदेडमधून मुंबईत विमानसेवा सुरू करण्याबाबत मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणा-या जीव्हीके कंपनीने येण्या-जाण्याच्या आठ वेळा निश्चित केल्या. मात्र राज्यातील प्रशासनाने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात दिरंगाई केल्याने यातील सहा वेळा गुजरातमधील पोरबंदर, सुरत आणि कांडला विमानतळाने पळवल्या. आता जीव्हीकेकडे वेळांचा पुरेसा स्लॉटच शिल्लक नसल्याने राज्यातील विमानसेवा टेकऑफ घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशातील सर्वसामान्यांना अत्यंत कमी दरात विमानसेवेचा वापर करता यावा, तसेच तालुके एकमेकांना जोडले जावेत, या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी एप्रिल २०१६मध्ये उडान योजनेचा शुभारंभ केला. ज्या ठिकाणी विमानतळ आहे, मात्र विमानसेवा सुरू नाही वा कमी प्रमाणात विमाने सुरू आहेत, अशा ९ ठिकाणी प्रामुख्याने ही सेवा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, राज्यात पहिल्या टप्प्यात सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक आणि नांदेड या ठिकाणी सेवा सुरू करण्याचे ठरले. त्यापैकी नांदेड येथे एप्रिल २०१७ मध्ये विमान सेवा सुरू झाल्याने जीव्हीकेने उर्वरित चार विमानतळांसाठी विमान येण्या-जाण्यासाठी आठ वेळा देण्याबाबत तयारी दर्शवली.
या ठिकाणी ज्या विमान कंपन्यांना विमानसेवा पुरवायची आहे त्यांना वीज, पाणी तसेच पाकिर्ंगची व्यवस्था मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. याशिवाय पहिल्या १५० किमी प्रवासासाठी एक हजार ४४० रु., तर पहिल्या ८०० किमीसाठी साडेतीन हजार रु.चे प्रवासभाडेही निश्चित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम राज्य प्रशासनाकडे होते. जीव्हीकेसोबत संपर्क साधून कागदोपत्रांच्या बाबी पूर्ण करायच्या होत्या. मात्र यात प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचे कळते.
दरम्यानच्या काळात गुजरातने उडानअंतर्गत पोरबंदर, सुरत, कांडला विमानतळावरील विमाने मुंबईत येण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण केल्याने आठ वेळांमधील सहा वेळांचा स्लॉट त्यांना मिळाला. परिणामी, केवळ दोनच स्लॉट महाराष्ट्राच्या वाट्याला शिल्लक राहिले आहेत. याबाबत अलिकडेच प्रशासनाकडून जीव्हीकेला विचारणा करण्यात आली असता, आपल्याकडे आता वेळांचा स्लॉटच शिल्लक नसल्याने त्यांनी सांगितल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे राज्यातील उडानअंतर्गत सुरू होणा-या विमानसेवेला ब्रेक लागणार आहे.
[EPSB]
गुगलच्या १९ वा वाढदिवसानिमित्त डुडलमधून ‘सरप्राईज’
[/EPSB]