‘सावित्री कोपली’ असे सामान्य माणसांना वाटते. त्यात अमावस्येची काळरात्र. ही काळरात्र जीव घेणारी ठरली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका दिवसात कोसळलेल्या पावसाने ८८ वर्षाचा पूल खचला. त्यामुळे ‘हा सगळा निसर्गाचा प्रताप आहे’ असे मानले गेले. शोक व्यक्त करणा-यांनी आपल्या भावना आवरल्यानंतर आता सावित्री कोपाची जी कहाणी प्रसिद्ध होत आहे, ती वेगळी कहाणी आहे. त्यात निसर्गकोपाचा फारसा संबंध नाही. ‘प्रशासनाच्या चुका आणि खात्याच्या मंत्र्यांचा हलगर्जीपणा’ ही दोन कारणे याला जबाबदार आहेत.
निरापराध लोकांचे जीव जायला ही दोनच कारणे ख-या अर्थाने कारणीभूत ठरली. ११ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटले तेव्हा लकडी पुलावर ७ फूट पाणी होते. त्या काळात पुण्यात आजच्यासारखी वाहने नव्हती, तरीसुद्धा लकडी पुलावरून दोन अॅम्बिसिडर आणि दोन फियाट गाडय़ा कठडा तोडून वाहून गेल्या, जुन्या लोकांना आठवत असेल. लकडी पुलाचे कठडेही तुटले, त्यात तुटलेल्या कठडय़ांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. पण पूल शाबूत राहिला. आता जो पूल बांधण्यात आला आहे तो ‘नवा पूल’ आहे. सावित्रीच्या कोपाची कहाणी वेगळी आहे. या पुलावरून पाणी वाहत नव्हते, तेव्हा पाण्याच्या लोंढय़ात एस.टी.गाडय़ा किंवा खासगी गाडय़ा वाहून गेल्या असे घडलेले नाही. सावित्री नदीवर दोन पूल आहेत, त्यातला एक पूल ब्रिटिशांनी बांधलेला आहे, तो १९२८ साली. १९२८ साली बांधलेल्या या पुलावरून त्या काळात दिवसातून एखाद् दोन गाडय़ा जायच्या, बाकी वाहतूक बैलगाडय़ांचीच होती. आता या पुलाला ८८ वर्ष झाली. पुलाचे आयुष्य संपलेले आहे, असे ब्रिटिश सरकारच्या लंडन येथील कार्यालयाचे पत्र भारत सरकारच्या ‘सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री’ म्हणजे आपल्या गडकरींच्या खात्याकडे दीड वर्षापूर्वी आलेले आहे. या देशावर दीडशे र्वष राज्य करणा-या ब्रिटिशाला कितीही नावे ठेवा, पण त्यांच्या कामाची एक पद्धत आहे. त्यांच्या कुठच्याही कामात भ्रष्टाचार झालेला नव्हता, किंवा टक्केवारी नव्हती. त्यांनी जेवढी वर्षे राज्य केले त्या काळात निकृष्ट बांधकामाबद्दल एकाही इंजिनीअरला अटक केल्याची बातमी नव्हती. त्यांच्या राज्यात सूर्य मावळत नाही असे सांगितले जायचे. म्हणजे जगातल्या सर्व विभागात अनेक देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले आणि जिथे जिथे राज्य केले त्या प्रत्येक देशाची अद्ययावत माहिती असलेले एक मुख्यालय लंडनमध्ये आहे. त्या कार्यालयातून त्यांच्या काळात बांधलेले रस्ते, पूल, इमारती यांचे आयुष्य किती, याची परिपूर्ण माहिती त्यांच्याकडे आहे आणि माहितीचा अधिकार नसताना ती कुणालाही मिळू शकते. लंडनमधले कार्यालय ब्रिटिशांनी राज्य केलेल्या प्रत्येक देशाला ही माहिती त्या-त्या वेळी पुरवत असते. खरे तर त्यांचे या देशांशी आता काही देण-घेणे नाही. सावित्री नदीच्या पुलाचे आयुष्य संपलेय, आता पुढचे तुम्ही बघा, हे लंडनला बसून सांगणारे किती दूरदृष्टीचे असतील आणि दीड वर्षापूर्वी त्यांनी पत्र पाठवलेय. आणि या उलट आमचे आताचे बांधकाममंत्री ज्यांना बांधकामातले काही कळत नाही, कोणत्या विषयातले कळते हाच प्रश्न आहे, तेच बांधकाममंत्री आहेत. कोणी चंद्रकात पाटील नावाचे आहेत. ते धडधडीतपणे सांगतात की, ‘या पुलाचे मे महिन्यात ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ केले होते’ आणि चंद्रकात पाटील सभागृहाला माहिती देतात की, ‘या पुलाला धोका नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता’ आता जर या पुलाची तपासणी झाली, चंद्रकांत पाटलांच्या भाषेत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले (चंद्रकांत पाटील यांना स्ट्रक्चरल ऑडिट याचे स्पेलिंग तरी लिहिता येईल का?) तरी त्यांनी ऑडिट केले. जर मग मे महिन्यात पूल पक्का आहे, असा अहवाल येतो तर ऑगस्ट महिन्यात तो कसा कोसळतो? त्यामुळे हा सावित्रीचा कोप आहे की, म्हशीसारखे पाण्यात बसलेल्या प्रशासनाचा गलनाथपणा आहे? अधिका-यांनी दिलेल्या अहवालावर १०० टक्के विसंबून राहणा-या मंत्र्याला आता या भीषण घटनेनंतर जबाबदार धरायचे तर कोणाला धरणार? गंगा नदीवरून रेल्वे जात असताना रेल्वेचे दोन डब्बे पाण्यात पडले, त्यावेळचे रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता डब्बे पाण्यात पडण्याशी लालबहादूर शास्त्रींजींचा थेट संबंध नव्हता. पण नैतिकता होती. मी खात्याचा मंत्री आहे, माझ्या कार्यकाळात असा अपघात होणे हा माझा पराभव आहे, अशी टोचणी होती, संवेदनशीलता होती, चंद्रकांत पाटलांना कसली आलीय संवेदनशीलता? शास्त्रींचा थेट संबंध नव्हता. सावित्री पुलाच्या दुर्घटनेशी चंद्रकात पाटील यांचा थेट संबंध आहे. पुलाला धोका नसल्याचा अहवाल आल्यानंतर खात्याचा मंत्री म्हणून त्या अहवालाची खातरजमा करून घेतली होती का? अपघात घडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांना घेऊन महाडला गेले, तिथे घोषणा काय केली. राज्यातल्या ३६ पुलांचे ऑडिट करणार! एखाद्या ऑडिट पार्टीने असे बोलले असते तर ते समजण्यासारखे आहे. पण घडलेला प्रसंग काय आणि ३६ पुलांचे ऑडिटचे तुम्ही बोलता काय? सोमवारचा विषय ३६ पुलांच्या ऑडिटचा नव्हता. पुलाला धोका नसलेच, ऑडिट झाल्यानंतर तो पूल कोसळतो, अपघात झालाय, निदान तेवढय़ा पुलापुरते तरी बोला. ३६ पुलांचे नंतर! आणि कर्माचे ऑडिट होणार आहे! सगळी थापेबाजी आहे. आता या ऑडिटच्या नावाखाली बांधकाम खाते आणि पोलीस अनेक पूल बंद करून टाकणार. ज्या पुलाचा अहवाल चुकीचा दिला गेला त्याचे कोणीच बोलत नाही. अजितदादांनी बरोबर मागणी केली. दुर्घटनेची जबाबदारी कोणावर निश्चित करता ते सांगा? त्या खात्याचा मंत्री कोण? त्याची जबाबदारी आहे की नाही? त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, तिथपर्यंत हे पूल असेच कोसळणार आहेत.
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे आहेत. संघवाले आहेत म्हणून मंत्रिमंडळात आहेत. पण बांधकाम खात्यांशी किंवा उत्तम प्रशासनाशी त्यांचा काही, कधी संबंध नव्हता. आता चंद्रकांत पाटलांनी त्यांना काय चांगले करून दाखवायचे असेल तर, या धोकादायक पुलांची यादी करून येत्या एका महिन्याच्या आत या पुलाच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. पावसाळय़ामुळे थोडी अडचण आहे. आता ४०० वर्षापूर्वीचा नागोठण्याचा पूल कधीही पडू शकतो. ‘प्रहार’ने एक महिन्यांपूर्वी त्याचे छायाचित्र छापले. चंद्रकांत पाटील सांगलीचे आहेत, त्यांनी एकदा कोकणात दौरा करावा आणि धोकादायक पुलावरून जावे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या पुलांची क्षमता नाही, अशा किमान १५ ते २० पुलांवरून बारा, पंधरा टनाचे ट्रक अवजड सामानांची वाहतूक करताहेत. राजापूर, हातखांबा, अरवली, नागोठणे, वाकण, मेढा या ठिकाणच्या पुलांची स्थिती जाणून घ्या. हे पूल कधीही पडू शकतात. एखादी भीषण घटना घडल्यानंतर सरकार जागे होणार आणि मग भले मोठे शब्द वापरून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणार, लोकांना ऑडिट नकोय, त्वरित दुरुस्तीची कामे हवीत. ऑडिट म्हणजे तो अहवाल येणार, तो अधिका-यांकडे जाणार, मग तो सचिवाकडे जाणार, मग तो मंत्र्यांकडे जाणार, नंतर बजेट तयार होणार, मग फायनान्सकडे जाणार, मग मुनगंटीवार फाईल पाहणार, मग मुख्यमंत्र्यांकडे जाणार. त्या फाईलचा जेव्हा नंबर लागेल तेव्हा मुख्यमंत्र्यांचा लाल शाईतला कोंबडा होणार, यात तीन वर्षे निघून जातील, शिवाय तुम्ही ज्याला ‘ऑडिट’ म्हणता, ती तुमची ऑडिट करणारी पार्टी आहे तरी कोण? असा चुकीचा अहवाल सादर करून ऑडिट करणार असाल तर असले ऑडिट करू नका. ज्या ऑडिटमुळे पंचनामा करायची वेळ येते त्या ऑडिटरचाच पंचनामा करा! तेव्हा हा सावित्रीचा कोप वगैरे काही नाही, हे सगळे मानवनिर्मित बेपर्वाईचे बळी आहेत. चंद्रकांतदादांना झेपणारे ते खाते आहे असे वाटत नाही. दक्ष-आरम एवढे सोपे नाही आणि म्हणून आणखी बळी जाऊ द्यायचे नसतील तर विषय गांभार्याने घ्या, एवढेच.