महाडजवळील सावित्री नदीवरील पूल पडल्याने अपघात होऊन दोन एसटी बससह अनेक वाहने वाहून गेली. दोन दिवस झाल्यानंतरही याबाबत प्रशासन ठोस कोणतीही माहिती देऊ शकलेले नाही.
मुंबई- महाडजवळील सावित्री नदीवरील पूल पडल्याने अपघात होऊन दोन एसटी बससह अनेक वाहने वाहून गेली. दोन दिवस झाल्यानंतरही याबाबत प्रशासन ठोस कोणतीही माहिती देऊ शकलेले नाही. अपघातानंतर तेथील परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सरकारला धारेवर धरले. या अपघाताला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही राणे यांनी केली.
महाड अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करताना राणे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टी होणार असल्याची सूचना हवामान खात्याने दिलेली असताना प्रशासनाने ज्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतलेली नाही. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. गोव्याला आणि कोकणात जायला एकच रस्ता आहे. मात्र त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु गेल्या काही दिवसांत हे काम बंद आहे. रोज अपघात होत आहेत. सकाळी वाहन घेऊन एखादा माणूस बाहेर पडत असेल आणि त्याचा मृतदेह संध्याकाळी घरी येत असेल तर त्याच्या कुटुंबीयांची काय अवस्था होत असेल याचा विचार करावा.
सावित्री नदीवरील अपघात होऊन दोन दिवस झाल्यानंतरही प्रशासन फारसे गंभीर नाही. इतक्या गंभीर प्रसंगात जिल्हाधिकारी किती वाजता तिथे पोहोचले, जिल्ह्याचे पालकमंत्री किती वाजता पोहोचले. आता तिथे जे मदतकार्य आहे, त्यांच्याकडे काय साधनसामग्री आहे? त्या दोन बस मिळाल्या का? जे लोक या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना काय मदत करणार आहात, याचा खुलासा झाला पाहिजे, असेही सांगून राणे म्हणाले की, या अपघाताला जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहितीही सभागृहाला मिळाली पाहिजे.