लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत असल्याचा आरोप करतानाच लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवारी, २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.
नवी दिल्ली- लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत असल्याचा आरोप करतानाच लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवारी, २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत बोलताना जाहीर केले.
राळेगणसिद्धीच्या (ता. पारनेर) पद्मावती मंदिरातील नवरात्रोत्सवाची सांगता हभप बाळकृष्ण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यावेळी हजारे यांनी पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्योजक भगवान पठारे, सुरेश पठारे, सुभाष पठारे, शंकर नगरे, दादा पठारे, राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहीणी गाजरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने आदी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, जनतेला सरकार दरबारी कामे मार्गी लावताना अधिकारी, कर्मचा-यांचे हात ओले करावे लागतात. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी विलंब होतो व त्यातूनच भ्रष्टाचार बोकाळतो. हे टाळण्यासाठी, सरकारी अधिकारी व कर्मचा-यांना लोकपालाच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे, तसे झाले तर भ्रष्टाचारास आळा बसू शकेल. मात्र मोदी सरकारने सरकारी कर्मचारी व अधिका-यांना लोकपालाच्या कक्षेतून वगळले आहे.
लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपण गेल्या तिन वर्षापासून पंतप्रधानांकडे सातत्याने करीत आहोत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या कायद्यातील दुरूस्तीचे विधेयक अवघ्या तीन दिवसांत मंजूर करून घेतले जाते, हा विरोधाभास आहे.
आंदोलनाची रूपरेषा
महात्मा गांधींच्या जयंतीदिनी, २ ऑक्टोबरला दिल्लीत येथे राजघाटावर म. गांधींच्या समाधीस्थळी हजारे हे चिंतन करणार आहेत. त्याच दिवशी आंदोनाची तारीख व रूपरेषा ते जाहीर करणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात येत्या तिन महिन्यात लोकपाल विधेयकाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हजारे यांचे आदोलन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माझी काळजी करू नका.
आपण समाजसेवेची सुरुवात राळेगणसिद्धीपासून केली. सुरुवातीस गाव त्यानंतर राज्य व आता देशासाठी आपण जीवन समर्पित केले आहे. देशातील सर्वसामान्य जनतेसाठी आपण लढा देत आहोत. आंदोलनामुळे राळेगणसिद्धी परिवारातील लोकांनी व्यथित होऊ नये, दु:खी होऊ नये, असे भावनिक आवाहन हजारे यांनी केले.