ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारताच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताचा दारुण पराभव झाला.
सिडनी- भारत जेतेपद राखेल, या क्रिकेटचाहत्यांच्या अपेक्षांना गुरुवारी सिडनी मैदानावर धक्का बसला. उपांत्य फेरीत भारतावर ९५ धावांनी विजय मिळवत यजमान ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाचे ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ४६.५ षटकांत २३३ धावांत संपला.
कर्णधार धोनीने ३ चौकार आणि २ षटकारांसह ६५ धावा केल्या. त्याला अजिंक्य रहाणेची (४४) साथ लाभली. मात्र कोहली (१), रैनाने (७) निराशा केली. रोहित (३४) आणि धवनने (४५) दमदार सलामी दिली. तत्पूर्वी, स्टीव्हन स्मिथने (१०५) दणकेबाज शतक ठोकताना ऑस्ट्रेलियाला ७ बाद ३२८ अशी मोठी धावसंख्या गाठून दिली.
उपांत्य फेरीतच भारताचा अंत
गतविजेत्या भारताला ९५ धावांनी हरवत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यजमानांचे ३२८ धावांचे आव्हान सोपे नसले तरी अशक्य नव्हते. मात्र फलंदाजी ढेपाळली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला. आठ वर्षानंतर त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी (२९ मार्च) मेलबर्न होणा-या ‘फायनल’मध्ये ऑस्ट्रेलियासमोर सहयजमान न्यूझीलंडचे आव्हान असेल.
तीनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याची पहिलीच वेळ असली तरी भारताने प्रथम फलंदाजी करताना तीन वेळा तीनशेहून अधिक धावा केल्या होत्या. तसेच २८७ धावांचे लक्ष्यही गाठले होते. त्यामुळे मोठे आव्हान असूनही भारत चुरस देईल, असे वाटले. परंतु, स्थिरावलेल्या सलामीवीरांनी आणखी थांबण्याची तसदी घेतली नाही. तसेच अन्य प्रमुख फलंदाजांनी विकेट फेकल्या. रोहित शर्मा (३४) आणि शिखर धवनने (४५) सावध आणि आश्वासक सुरुवात केल्यानंतर रंगतदार लढत होईल, असे वाटले. मात्र धवनने जोश हॅझेलवुडच्या एका सरळ चेंडूला उंचावरून मारण्याच्या नादात विकेट फेकली. डीप स्क्वेअर लेगला ग्लेन मॅक्सवेलने त्याचा सोपा झेल टिपला. धवन परतल्यावर विराट कोहलीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र तोही दडपणाखाली वाटला. खाते उघडण्यासाठी विराटने पाच चेंडू घेतले. अडखळत खेळणा-या कोहलीच्या खचलेल्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासाठी मिचेल जॉन्सनने बाऊन्सर टाकला. त्यावर विराट फसला आणि बॅटची वरची कडा घेत उंच उडालेला झेल हॅडिनने टिपला.
स्थिरावत असलेला रोहित शर्मा भारताच्या मदतीला धावून येईल, असे वाटले. मात्र अनुभवी जॉन्सनने अचूक यॉर्कर टाकत त्याच्या यष्टय़ा उखडल्या. पाच षटकांत १५ धावांत आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अजिंक्य रहाणेसह पाचव्या विकेटसाठी ७० धावा जोडताना ऑस्ट्रेलियाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या जोडीला अपेक्षित सरासरीने धावा जमवता आल्या नाहीत. त्यामुळे चेंडू आणि धावा यांच्यातील तफावत वाढली. ‘बॅटिंग पॉवरप्ले’मध्ये (३५ते ४० षटकांदरम्यान) केवळ २६ धावा निघाल्या. परंतु, रहाणे, धोनी परतल्यानंतर भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. ५ बाद २०७ वरून गतविजेत्यांचा डाव ४६.१ षटकांत २३३ धावांत संपला. रहाणेने ६८ चेंडूंत ४४ धावा केल्या. धोनीने दीड तास किल्ला लढवताना ६५ चेंडूंत सर्वाधिक ६५ धावांचे आव्हान दिले. त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. आर. अश्विन (५) मोहित शर्माला (०) लागोपाठच्या चेंडूंवर बाद करणा-या फॉकनरला हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र उमेश यादवने त्याला हॅट्ट्रिकपासून रोखले.
ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज बाद करण्यात भारताला अपयश आले तरी यजमानांनी भारताला ‘ऑलआउट’ करण्याची करामत साधली. स्पर्धेत प्रथमच भारत सर्वबाद झाला. वेगवान जेम्स फॉकनर (३ विकेट) सर्वात यशस्वी ठरला. त्याला मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सनची (प्रत्येकी २ विकेट) सुरेख साथ लाभली. शतकवीर स्टीव्हन स्मिथला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पध्र्यासमोर मोठे लक्ष्य ठेवणार, हे निश्चित होते. यजमानांनी तेच केले. ‘वनडाऊन’ स्टीव्हन स्मिथच्या (९३ चेंडूंत १०५ धावा) फटकेबाज शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३२८ धावा अशी मोठी धावसंख्या उभारली. यंदाच्या विश्वचषकातील आजवरच्या स्पर्धातील उपांत्य फेरीतील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. त्यातच स्पर्धेत पहिल्यांदाच भारताच्या गोलंदाजांना प्रतिस्पध्र्याच्या सर्वच्या सर्व विकेट घेण्यात अपयश आले.
फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (१२) लवकर बाद करण्यात उमेश यादवला यश आले तरी अन्य सलामीवीर आरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथने दुस-या विकेटसाठी १८२ धावांची मोठी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला सावरले. या जोडीने निम्म्याहून षटके (३१) खेळून काढताना मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. ९३ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची चमकदार खेळी करून स्मिथ माघारी परतला. त्याचे यंदाच्या स्पर्धेतील पहिले, मात्र वनडेतील चौथे शतक आहे. उमेश यादवसह मोहम्मद शामी आणि मोहित शर्माने संपूर्ण स्पर्धेत अचूक आणि प्रभावी मारा केला होता. मात्र स्मिथने त्याचे ११ पैकी ७ चौकार या मध्यमगती त्रिकुटाविरुद्ध लगावलेत. सुरुवातीला त्याने यादवला लक्ष्य करताना एका षटकात सलग तीन चौकार ठोकले.
स्मिथ परतल्यानंतर फिंचने एक बाजू लावून धरली. मात्र स्पर्धेतील दुसरे शतक ठोकण्यात त्याला अपयश आले. फिंचने ७ चौकार आणि एका षटकारासह ११६ चेंडूंत ८१ धावांची संयमी खेळी केली. फिंच-स्मिथच्या मजबूत भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया साडेतीनशेची मजल मारेल, असे वाटत होते. मात्र चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला ग्लेन मॅक्सवेल (२३) आणि फिंच हे एक धाव आणि पाच चेंडूंच्या फरकाने बाद झाल्याने यजमानांच्या धावगतीला ‘ब्रेक’ लागला.
कर्णधार मायकेल क्लार्कनेही (१०) निराशा केली. मात्र शेन वॉटसन (३० चेंडूंत २८ धावा), जेम्स फॉकनर (२१ चेंडूंत २१ धावा) आणि मिचेल जॉन्सनच्या (९ चेंडूंत नाबाद २७ धावा) छोटेखानी, परंतु झटपट खेळींनी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या रचता आली. या तिघांनी शेवटच्या १० षटकांत ८७ धावा चोपल्या. सात लढतींमध्ये प्रतिस्पध्र्यावर वरचढ ठरलेले भारताचे गोलंदाज सिडनीत अपयशी ठरले. यादवने चार विकेट घेतल्या तरी सर्वाधिक ७२ धावा मोजल्या. मोहितने ७५ धावा देत २ विकेट घेतल्या. शामीने आणि रवींद्र जडेजाने ६८ धावा दिल्या. मात्र अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने दिशा आणि टप्पा राखून गोलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेत त्याने १० षटकांत ४२ धावा दिल्या. अश्विन थोडा फार प्रभावी ठरल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आणखी एक ‘पार्टटाइम’ ऑफस्पिनर सुरेश रैनाकडे चेंडू का सोपवला नाही, हेच कळू शकले नाही.
मोक्याच्या क्षणी स्मिथ खेळला
अंतिम फेरी गाठल्याने खूप आनंदात आहोत. आमच्या संघाने आतापर्यंत दमदार क्रिकेट खेळले आहे. स्मिथने मोक्याच्या क्षणी खूप चांगली महत्त्वपूर्ण खेळी खेळली. आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम व्युहरचना करत भारताच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. मात्र याठिकाणी धोनीसह भारताच्या संघाला धन्यवाद देईन. कारण ते जवळपास चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहेत. धोनी पुढील विश्वचषकातही खेळेल, याची मला आशा आहे. कारण त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. न्यूझीलंडकडून साखळीत स्वीकारलेल्या पराभवानंतर आम्ही ख-या अर्थाने खेळ उंचावला. आता पुन्हा न्यूझीलंडशीच अंतिम लढत खेळायची आहे. आता आम्ही मेलबर्नकडे रवाना होऊ आणि अंतिम लढतीची तयारी करू. अंतिम फेरीत आम्हाला प्रोत्साहन द्यायला मेलबर्नवर मोठय़ा संख्येने ऑस्ट्रेलियन येतील याची आम्हाला आशा आहे. – मायकेल क्लार्क (कर्णधार, ऑस्ट्रेलिया)
सांघिक योगदान मोलाचे ठरले
जवळपास ३३० धावा करू, याची आम्हाला खात्री होती. त्यातच आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही चांगले झाले. विजयात सांघिक योगदान महत्वपूर्ण ठरले. आता तयारी मेलबर्नवर होणा-या अंतिम लढतीची आहे. त्यातच ती लढत न्यूझीलंडविरुद्ध होत आहे, हा आणखी विलक्षण प्रसंग आहे. – स्टीव्हन स्मिथ (सामनावीर)
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच झे. धवन गो. उमेश ८१, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. उमेश १२, स्टीवन स्मिथ झे. रोहित गो. उमेश १०५, ग्लेन मॅक्सवेल झे. रहाणे गो. अश्विन २३, शेन वॉटसन झे. रहाणे गो. मोहित २८, मायकेल क्लार्क झे. रोहित गो. मोहित १०, जेम्स फॉकनर त्रि. गो. उमेश २१, ब्रॅड हॅडिन नाबाद ७, मिचेल जॉन्सन नाबाद २७, अवांतर – १४ (बाईज १, लेगबाईज ७, वाईड ६), एकूण – ५० षटकांत ७ बाद ३२८ धावा.
बादक्रम : १-१५ (वॉर्नर), २-१९७ (स्मिथ), ३-२३२ (मॅक्सवेल), ४-२३३ (फिंच), ५-२४८ (क्लार्क), ६-२८४ (फॉकनर), ७-२९८ (वॉटसन)
गोलंदाजी : मोहम्मद शामी १०-०-६८-०, उमेश यादव ९-०-७२-४, मोहित शर्मा १०-०-७५-२, विराट कोहली १-०-७-०, रवींद्र जडेजा १०-०-५६-०, रविचंद्रन अश्विन १०-०-४२-१
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. जॉन्सन ३४, शिखर धवन झे. मॅक्सवेल गो. हॅझेलवुड ४५, विराट कोहली झे. हॅडिन गो. जॉन्सन १, अजिंक्य रहाणे झे. हॅडिन गो. स्टार्क ४४, सुरेश रैना झे. हॅडिन गो. फॉकनर ७, महेंद्रसिंग धोनी धावचीत (मॅक्सवेल) ६५, रवींद्र जडेजा धावचीत (स्मिथ) १६, रवीचंद्रन अश्विन त्रि. गो. फॉकनर ५, मोहम्मद शामी नाबाद १, मोहित शर्मा त्रि. गो. फॉकनर ०, उमेश यादव त्रि. गो. स्टार्क ०, अवांतर – १५ (लेगबाईज ८, वाईड ५, नोबॉल २), एकूण – ४६.५ षटकांत सर्वबाद २३३ धावा.
बादक्रम : १-७६ (धवन), २-७८ (कोहली), ३-९१ (रोहित), ४-१०८ (रैना), ५-१७८ (रहाणे), ६-२०८ (जडेजा), ७-२३१ (धोनी), ८-२३२ (अश्विन), ९-२३२ (मोहित), १०-२३३ (उमेश)
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ८.५-०-२८-२, जोश हॅझेलवुड १०-१-४१-१, मिचेल जॉन्सन १०-०-५०-२, जेम्स फॉकनर ९-१-५९-३, ग्लेन मॅक्सवेल ५-०-१८-०, शेन वॉटसन ४-०-२९-०
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- सात बाद ३२८
भारत- ४६.५ षटक सर्वबाद २३३
सामनावीर- स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया)