लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत जम्मू-काश्मीरमधील जनतेने यंदा मोठ्या उत्साहात मतदान केले. मात्र जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहूमत न दिल्याने राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
श्रीनगर- लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत जम्मू-काश्मीरमधील जनतेने यंदा मोठ्या उत्साहात मतदान केले. मात्र जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहूमत न दिल्याने राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचा पराभव करण्यात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी)ला यश आले असले तरी त्यांना बहुमतासाठी लागणारे संख्या बळ मिळवता आले नाही. त्यामुळेच आता पीडीपी, भाजप यांचे सरकार स्थापन होणार की पीडीपी काँग्रेस यांचे याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने तातडीने पीडीपीला पाठिंबा आणि सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. तर विधानसभेत दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. तर सर्वाधिक जागा मिळवणा-या पीडीपीने मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
तब्बल पाच टप्प्यात झालेल्या विधानसभेच्या ८७ जागांसाठीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचा पराभव झाला. पीडीपी २८ जागांवर, भाजप २५ जागांवर विजय मिळवला आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स १५ आणि काँग्रेस १२ मिळाल्या आहेत.
‘मिशन ४४’ लक्ष ठेवून या निवडणुकीत उतरलेल्या भाजपला स्वबळावर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करता आले नसले तरी, पक्षाची जम्मू-काश्मीरमधील आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ११ जागा मिळाल्या होत्या. भाजपने जम्मूमध्ये चांगली कामगिरी केली मात्र त्यांना काश्मीर खो-यात यश मिळवता आले नाही. जम्मूमध्ये विधानसभेच्या ३७ तर काश्मीर खो-यात ४६ जागा आहेत.
ओमर अब्दुल्ला सोनावरमधून पराभूत
सीमेवर होणारे हल्ले, दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले आणि नुकत्याच आलेल्या महापूर या सर्वांवर मात करत राज्यात ६६ टक्के मतदान झाले होते.