ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध केला असून या भ्याड हल्ल्यातील मारेक-यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. या महान विचारवंतांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई- ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध केला असून या भ्याड हल्ल्यातील मारेक-यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. या महान विचारवंतांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी किरवले यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना अतिशय दुदैवी आहे. डॉ किरवले हे आमच्या परळी तालुक्यातील मुळ रहीवासी होते.
आंबेडकरी चळवळीतले विचारवंत, मार्गदर्शक आणि शिक्षण तज्ञाची हत्या होणे हे पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ढासळल्याचे हे द्योतक आहे. समाजात असहिष्णुता वाढत आहे. किरवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
हल्लेखोरांवर कारवाई करा – रामदास आठवले
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांची कोल्हापूर येथे अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करून हत्या झाली हे दु:खद वृत्त कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे. डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्येची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे
दिग्गज व्यक्तीमत्व हरपले – विखे पाटील
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक तथा लेखक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून, त्यांच्या रूपात आंबेडकरी चळवळीतील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
दिवसाढवळ्या घरात घुसून झालेल्या डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येने राज्यात कायद्याचा धाक संपल्याचे दिसून येते. या हत्येचा तीव्र निषेध करून विखे पाटील यांनी पोलिसांनी सर्व पैलू विचारात घेऊन तपास करण्याची गरज असल्याचे सांगितले.
पुरोगामी विचारांचा पाईक हरपला -अशोक चव्हाण
प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना निषेधार्ह असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा पाईक आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
प्रा. किरवले यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील विविध चळवळींमध्ये सक्रीय असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व निघून गेले आहे. त्यांनी आयुष्यभर विचारांची बांधिलकी जपली. साहित्य व इतर माध्यमातून त्यांनी समतेची, न्यायाची व हक्कांची लढाई लढली. त्यांची उणीव नक्कीच जाणवत राहील.
वैचारिक चळवळीची मोठी हानी
देशातील दलित, ग्रामीण साहित्यिकांना कायम पाठबळ देणारे आणि त्यांच्या लिखाणासोबत त्यांना प्रेरणा देणारे डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील फुले-शाहू आंबेडकरी साहित्य व वैचारिक चळवळीची हानी आहे.
किरवले यांनी देशातील दलित साहित्यिकांना कोल्हापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे मोठे काम केले होते.
माझ्यासारख्या भटक्या विमुक्त समाजातील लेखकाची दखल घेत माझ्या साहित्यातील शब्दसंपदेवर प्रकाश टाकला होता. त्यांच्यामुळे दलित, आदिवासी आणि ग्रामीण साहित्यिकांचा एक मोठा आधार आम्ही गमावला आहे.
– लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक