राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावली.
नवी दिल्ली- राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावली. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका तातडीने फेटाळली. त्यामुळे पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
निकम यांनी पीडितेच्या घरच्यांना काय सल्ला दिला, तसेच या घटनेनंतर वृत्तवाहिनीवर अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती झाल्या. त्यामुळे या सगळ्यांची साक्ष घ्यावी, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला होता.
न्यायालयात कोणत्याही साक्षीदाराचा खटल्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणे गरजेचे आहे. भारतीय पुरावा कायद्यातील कलमानुसार कुठला साक्षीदार तपासावा, यासाठीचे नियम नमूद करण्यात आले आहेत. ज्या वैद्यकीय अधिका-यांनी पीडितेच्या शरीरावर झालेल्या जखमांच्याबाबतीत अभिप्राय दिला, ज्या वैद्यकीय अधिका-यांनी पीडितेला मृत घोषित केले आणि ज्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले, त्या सर्वांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आले आहे. त्यामुळे अन्य साक्षीदारांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. फक्त खटला लांबवण्यासाठी कोणताही तार्किक आधार नसताना पाच जणांच्या उलटतपासणीची मागणी करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता.
सरकारी वकील उज्ज्वल निकम, रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे संचालक, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका आरोपीच्या वकिलांनी केली होती. विधानसभेत आणि एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांचे नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केले होते.
मात्र आरोपींनी दाखल केलेली ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावली. यापूर्वी सत्र न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावली होती. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठानेही त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या प्रकरण
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांकडून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.