डिसेंबर १९९० मध्ये रत्नागिरीमध्ये पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. कोकणचे सुपुत्र आणि प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांना या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. त्यावेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आलेल्या काही अनुभवांनंतर मधुभाईंनी महामंडळामध्ये कोकण दिसतच नाही, तो दिसावा अशी आग्रही मागणी केली.
मात्र त्याला तत्कालीन महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी त्यांची मक्तेदारी कायम ठेवली होती. यातूनच दुखावलेल्या मधुभाईंनी साहित्य संमेलनानंतर अवघ्या तीनच महिन्यांमध्ये मार्च १९९१ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना रत्नागिरीत केली आणि कोकणातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यावेळी रत्नागिरीतील श्रीकांत ऊर्फ दादा शेटय़े, अरुण नेरूरकर, विवेक भावे, श्रीकृष्ण साबणे, डॉ. दिलीप पाखरे यांच्यासह असंख्य सोबत्यांना साथीला घेतले आणि गेल्या २५ वर्षामध्ये कोमसापने आपली कोकणपट्टय़ावर मक्तेदारीच जणू केली आहे.
गेल्या २५ वर्षामध्ये कोमसापच्या ५६ ते ६० शाखा स्थापन झाल्या असून यातील बहुतांश शाखा कार्यरत आहेत. यातूनच दरवर्षी होणारी जिल्हा साहित्य संमेलने, कवी कट्टा, तरुणांसाठी व्यासपीठ, महिला साहित्य संमेलने यांच्यासह विविध उपक्रमातून कोमसापची साहित्यसेवा अखंडपणे सुरूच आहे. मधुभाईंनी संपूर्ण जगाने दखल घ्यावी असे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे कवी केशवसुतांचे अप्रतिम स्मारक उभे केले आहे. या स्मारकाला कुसुमाग्रजांनी ‘कवितेची राजधानी’ या शब्दात सन्मान दिला आहे. एकीकडे कोमसाप कोकणात रूजत असताना मात्र अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने या संस्थेला कधी सोबत घेतलेच नाही, असे चित्र गेले २५ वष्रे अवघा महाराष्ट्र पाहात होता.
कोमसापच्या या प्रवासात केवळ कोकणातील कवी, साहित्यिकच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील कवी, साहित्यिकही सामील झाले आणि ही संस्था अधिक विकसित झाली, राज्यभर पसरली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दरवर्षी राज्यामध्ये वादाचे पडसाद उमटत असताना कोमसापचे अध्यक्ष मात्र एकमताने निवडले जात होते हेही कुठेतरी अधोरेखित होते.
मात्र असे असतानाही या साहित्य संस्था एकमेकांना सोबत घेत नव्हत्या, हेही तितकेच खरे होते. कोमसाप आणि मसाप या नेहमीच एकमेकांकडे पाठ करून उभ्या होत्या. मसापनेही कोकणामध्ये रुजण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून होणारे संघर्ष हे वैचारिक व्यवस्थेवर घात करणारे दिसत होते. या संस्था कधीतरी एकत्र येतील की नाही याबाबत साशंकता असतानाच मात्र हा योग कोमसापच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात जुळून आला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते. तो एक सुंदर क्षण होता. यावेळी मधुभाईंनीही आम्ही सारे जण मायमराठीच्या पालखीचे भोई आहोत, असे सांगतानाच साहित्य संस्थांनी एकत्र येणे ही आजची गरज असल्याची भावना व्यक्त केली. याला प्रा. जोशी आणि डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिलेले अनुमोदन बदलत्या प्रवाहाचे द्योतक होते. या संस्थांनी आपापली ओळख कायम ठेवतानाही साहित्य सेवेसाठी एकत्र येऊन काहीतरी विधायक केले तरीही त्याचे सकारात्मक परिणाम
जाणवणार हे निश्चितच आहे.
एकीकडे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड या गावामध्ये हा विलक्षण संयोग जुळून येत असतानाच रत्नागिरी शहरामध्येही त्याच संध्याकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेसोबत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद एकत्र आली आणि त्यातून दर्जेदार युवा साहित्य- नाटय़ संमेलन रत्नागिरीमध्ये घडले. युवकांनी साहित्य क्षेत्राकडे वळावे, व्यक्त व्हावे यासाठी साहित्यातील या दोन दिग्गज संस्था रत्नागिरीमध्ये एकत्र आल्या होत्या. याला ९७व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर आणि ९६व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्यासह संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी संदीप खरे हेही उपस्थित होते.
नाटय़ आणि साहित्य यामध्ये नवं काही घडावं यासाठी आयोजकांनी परिसंवाद, कवी संमेलन, नाटय़ाविष्काराचे आयोजन केले होते. संदीप खरे यांच्यासह गंगाराम गवाणकर, जयंत सावरकर यांच्या प्रकट मुलाखतींमुळे ग्रामीण भागातील युवकांनी कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे याचे बाळकडूच मिळाले. ग्रामीण भागातील युवकांना साहित्य-नाटय़ क्षेत्राकडे आकर्षित करावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी यावेळी केले. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम यापुढे केले जाणार आहेत अशी त्यांनी दिलेली ग्वाही ही रत्नागिरीमध्ये नवं काही घडण्याची जणू नांदीच होती. केवळ रत्नागिरीच नव्हे तर रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगडसारख्या भागांमध्येही या संमेलनाच्या माध्यमातून साहित्य-नाटय़ाचा नवा जागर होण्याचे यातूनच संकेत मिळत आहेत.
हा एक नवा बदल या कोकणपट्टय़ातील साहित्य, नाटय़ क्षेत्रात दिसून येत असतानाच ज्यांच्यासाठी हे केले गेले त्या युवकांसह स्थानिक साहित्यप्रेमींची या संमेलनांबाबत असलेली उदासीनता ही देखील एक ठळक गोष्टच आहे. मालगुंड येथे कोमसापचे कवी संमेलन तब्बल पाच तास चालले, दुस-या दिवशीच्या उद्घाटन संमेलनाला तुडुंब गर्दीही होती, मात्र त्यामध्ये स्थानिक रत्नागिरी- सिंधुदुर्गकरांची संख्या मात्र अपेक्षापेक्षा कमी होती हेही तितकेच खरे. हीच स्थिती युवा साहित्य-नाटय़ संमेलनाची होती.
ज्या युवा साहित्यिकांना या संमेलनातून प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आयोजकांना होती, त्यांनीच या संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गर्दी नसली तरीही दर्दी आले आहेत असे सांगून आयोजक आणि पाहुण्यांनी एकमेकांचे सांत्वन केले असले तरीही ही अनुपस्थिती आणि युवकांची उदासीनता याबाबत आयोजकांनीच आता विचार करायची गरज आहे.
एकीकडे कोकणातील साहित्य क्षेत्र या तीनही संस्थांच्या मिलाफामुळे नव्या वळणावर उभे असतानाच आयोजकांमध्येही युवकांची संख्या सर्वाधिक असणे आणि बुजुर्गानी त्यांच्यावर विश्वास टाकणे ही काळाची गरज बनली आहे. आजचा युवा साहित्यिकही ‘टेक्नोसॅव्ही’ आहे, तो कविता, लेख, चारोळय़ा यातून व्यक्त होत असताना, पथनाटय़ापासून नाटकापर्यंत स्वत:चे आविष्कार सादर करत असताना ते ‘ग्लोबल’ व्हावे यासाठी स्वत:च सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होत आहे.
कार्यक्रमांचे नियोजन हे युवा पिढीसाठी आता ‘प्रेझेंटेशन’ झाले असून त्यातही ही युवा पिढी तरबेज झाली आहे. अशा वेळी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणा-या आयोजकांनी अशा कार्यक्रमांची धुरा युवा वर्गावर सोपवली, त्यांच्यावर थोडी जबाबदारी दिली तर ते अधिक उत्साहाने एकत्र येतील आणि एक नवी पिढी पुन्हा सक्रिय होईल असे वाटते. त्यातूनच ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’ या कवी केशवसुतांच्या ओळी ख-या अर्थाने सत्यात उतरतील आणि नव्या पिढीची नवी तुतारी घेऊन हे सर्व केशवसुतांचे पाईक सज्ज होतील यात शंकाच नाही. साहित्यामुळे सामाजिक स्थैर्य मिळते. म्हणून साहित्य संस्था या समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘सलाईन’चं काम करतात असे म्हटले पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षापासून साहित्य क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर अनागोंदी झाल्याचे चित्र दिसून येते.
सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक स्थैर्याची जबाबदारी घेतलेल्या अनेक संस्थाच एकमेकांच्या सोबत नाही तर जेव्हा एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकतात, तेव्हा त्याचा विपरीत परिणाम थेट समाजमनावर होताना दिसतो. समाजाला वळण देणा-या या संस्थांनाच मग वळण देण्याची गरज वाटू लागते. अशा वेळी पुणे येथून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद, कोकणपट्टीमध्ये ठळकपणे काम करणारी कोकण मराठी साहित्य परिषद आणि नाटय़क्षेत्रातील अग्रणी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद या संस्था जेव्हा एकत्र येतात आणि त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुढाकार घेते, तेव्हा मात्र आता काही वेगळं आणि सकारात्मक घडण्याची चाहूल लागू लागते. हाच संयोग रत्नागिरीसारख्या राज्यातील छोटय़ा परंतु साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चे वेगळेपण जपणा-या ठिकाणी होतो तेव्हा या घटना लक्षवेधी ठरतात.