सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील ज्या गावात ऐतिहासिक व धार्मिक परंपरायुक्त ‘विजयी रथोत्सव’ साजरा केला जातो ते ठिकाण म्हणजे खानोली. वेंगुर्ले या तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ९ कि.मी. अंतरावरील हा विस्तीर्ण गाव डोंगर-कपारीत वसलेला असून विविध आकर्षक मंदिरांमुळे ख्याती पावलेल्या या गावची एकंदरीत विकासात्मक वाटचाल सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील ज्या गावात ऐतिहासिक व धार्मिक परंपरायुक्त ‘विजयी रथोत्सव’ साजरा केला जातो ते ठिकाण म्हणजे खानोली. वेंगुर्ले या तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ९ कि.मी. अंतरावरील हा विस्तीर्ण गाव डोंगर-कपारीत वसलेला असून विविध आकर्षक मंदिरांमुळे ख्याती पावलेल्या या गावची एकंदरीत विकासात्मक वाटचाल सुरू आहे.
खानोली गावात श्री देव रवळनाथ,श्री देव सिद्धेश्वर, श्री देवी सातेरी ही प्रमुख मंदिरे असून श्री देव वेतोबा, श्री देवी भावई, श्री देव ब्राह्मण, श्री देव गावडोबा, श्री देव दांडेकर अशी इतरही मंदिरे एकाच ठिकाणी स्थापन केलेली आहेत. ही मंदिरे पुरातन असून वर्षभर येथे धार्मिक सोहळे मोठया उत्साहात साजरे केले जातात; परंतु खानोली गावचा सर्वात मोठा उत्सव ‘महाशिवरात्र’ होय. हा सोहळा सुमारे सात दिवस अत्यंत श्रद्धापूर्वक साजरा केला जातो.
सर्व ग्रामस्थ पूर्वापार पद्धतीने ग्रामदेवतेची सेवा करतात. महाशिवरात्री दिवशी रात्रौ १२ वाजता श्री देव रवळनाथाच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक काढून तिला रथात आरूढ केले जाते. त्यानंतर दशावतारी नाटक झाल्यानंतर पहाटे रथ प्रदक्षिणेला सुरुवात होते. सिद्धेश्वर, सातेरी, रवळनाथ या मंदिरांना प्रदक्षिणा करून रथ मंडपात नेण्यात येतो.
खानोली हा सुमारे २४ वाडय़ांचा विस्तीर्ण असा गाव आहे. मूळ खानोली गावची ग्रामपंचायत स्थापना सन १९४३ साली झाली. खानोली,वायंगणी, तळेकरवाडी या तीन महसूल गावांसाठी गणपती मंदिर वायंगणीनजीक एकच ग्रामपंचायत अस्तित्वात होती. नंतर २००२ मध्ये या ग्रा.पं.चे विभाजन होऊन खानोली गावासाठी १ व वायंगणी, तळेकरवाडी या दोन महसुली गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावात सुरुवातीपासूनच शिक्षणाची सोय होती.
विभाजन झाल्यानंतर या गावात एक पूर्ण प्राथमिक व एक प्राथमिक शाळा आहे. वेंगुर्ले, वेतोरे, दाभोली येथे माध्यमिक शाळा असल्याने गावात माध्यमिक शाळा स्थापन झाली नाही. गावात सहकारी संस्था आहे. खानोली गावातून वेंगुर्ले-खानोली मार्गे कुडाळ तसेच अन्य लांब पल्ल्याची एस.टी. सेवा सुरू आहे. या गावातून अनामिका नदी वाहते. नदीकिनारी नारळ-पोफळीच्या बागा असून येथे भातशेतीही केली जाते.
गाव डोंगर-कपारीत वसला असल्याने डोंगर उतारावर आंबा, काजूच्या बागा आहेत. तसेच रतांबा (कोकम), सुरंगीच्या झाडांपासून मिळणा-या उत्पन्नावर काही ग्रामस्थांचे जीवन अवलंबून आहे. गावातील बरेचशे लोक नोकरी-धंद्यानिमित्त परगावी जाऊन स्थायिक झाले आहेत.
खानोली ग्रामपंचायतअंतर्गत घोगळवाडी, देऊळवाडी, सावंतवाडा, धनगरवाडी, घोलेकरवाडी, कातरणीचे भाटले, समतानगर, राऊळवाडी, आंबेसवाडी अशा एकूण ९ वाडया आहेत. गावात पाच सार्वजनिक विहिरी, २७ खासगी बोअरवेल असून राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ५ विहिरी गावात आहेत. राऊळवाडी, घोगळवाडी, समतानगर याठिकाणी लघुनळयोजना असून ग्रामस्वच्छता समिती, तंटामुक्ती समिती तसेच गावातील विविध प्रतिष्ठानमार्फत शैक्षणिक कार्य सुरू आहे. दलितवस्ती योजनेअंतर्गत समतानगर येथे गटार बांधकाम व संरक्षक भिंत, देऊळवाडी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावातील रस्त्यांची सुधारणा, आरोग्य सुविधा व स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत होणे आवश्यक आहे.
खानोलीतून अनेक मान्यवर व्यक्तींनी आपल्या कार्याने खानोली गावचे नाव उज्ज्वल केले आहे. कुडाळ/वेंगुर्लेचे माजी आ. कै. ज. सी. धोंड, विधान परिषद माजी आ. कै. सी. आर. खानोलकर, भारताचे निवृत्त लष्करप्रमुख प्रदीप नाईक, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश सुमन पंडित, निवृत्त कोकण आयुक्त गो. रा. पिंगुळकर, निवृत्त उपजिल्हाधिकारी कै. घनश्याम खानोलकर, वेंगुर्ले पंचायत समिती माजी सभापती कै. दत्तात्रय नीळकंठ ऊर्फ दादा नाईक तसेच दीपक भालचंद्र नाईक यांनी आपल्या कार्याने खानोली गावची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच मराठीचे कवी चिं.त्र्यं. प्रभुखानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांनीही आपल्या काव्यरचनेच्या जोरावर खानोली गावच्या विकासात भर घातली आहे. पूर्वी खानोली गावात डॉ. राधाकृष्ण प्रभुखानोलकर व डॉ. केळकर यांनी माफत दरात आरोग्य सेवा दिली होती. सध्या या गावात एकही आरोग्य सुविधा नसल्यामुळे आरोग्य सेवेसाठी दुस-या गावात जावे लागते.
मूळ खानोली गावच्या अनेक ग्रामस्थांनी वेंगुर्ले नगर परिषदेमध्ये नेतृत्व केलेले आहे. कै.डॉ. सीताराम नाईक, कै. सी. आर. खानोलकर, कै. एस. आर. खानोलकर, कै. मोहनराव खानोलकर यांनी सामाजिक क्षेत्रात तर रंगराव खानोलकर वगैरंेनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. खानोली गावाला आतापर्यंत सरपंचपदी कै. विश्राम सावंत, कै. नामदेव प्रभुखानोलकर, कै. दादा नाईक, कै. भाई जोशी, दीपक नाईक, रामकृष्ण पेडणेकर, बाबा नांदोस्कर हे लाभले आहेत.
पूर्वी खानोली गावातील अनेक जमीनदारांनी गावच्या शाळा, रस्ते, विहिरी, मंदिरे यासाठी जमिनी दान केलेल्या होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात खानोली गावातील गावपुढाका-यांचा शासन दरबारी दबदबा होता. त्यामुळे अनेक शासकीय, सार्वजनिक उपक्रम गावात प्रभावीपणे राबविले गेले आहेत. एकंदरीत ग्रामपंचायत स्थापनेपासून गाव आदर्श कार्य करीत असून सरपंच श्रीमती रंजना हळदणकर, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक, माजी सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींसह सर्व ग्रामस्थांचे गाव विकासासाठी सहकार्य लाभत आहे.