केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसरा आणि कदाचित आजवरचा सर्वात मोठा विस्तार रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसरा आणि कदाचित आजवरचा सर्वात मोठा विस्तार रविवारी सकाळी १० वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांची उचलबांगडी अपेक्षित असून काही बडय़ा मंत्र्यांची खाती बदलणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रीय महामार्ग, परिवहन, भूपृष्ठ तसेच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी सर्वात मोठे लाभार्थी ठरण्याची शक्यता असून एकात्मिक परिवहन मंत्रालयाच्या नावाखाली त्यांच्याकडे रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती भवनात रविवारी सकाळी १० वाजता होणा-या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आतापर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळातील उमा भारती, बंडारू दत्तात्रय, राजीवप्रताप रूडीराजीवप्रताप रूडी, कलराज मिश्र, महेंद्रनाथ पांडे आणि संजीव बालियान या मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले असून आणखी चार मंत्री आपले राजीनामे सादर करण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांचाही राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह आणि विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांची खाती बदलली जाण्याची चर्चा आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची बालियान यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
यांना मिळणार संधी?
मंत्रिमंडळ विस्तारात निर्मला सितारमन, वीरेंद्र कुमार, शंकरभाई वेगाड, के. हरिबाबू, सत्यपाल सिंह, अश्विनी चौबे, आर.के.सिंह, गजेंद्र शेखावत, अनंत हेगडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
यांनी दिले राजीनामे
उमा भारती, बंडारू दत्तात्रय, राजीवप्रताप रूडी, कलराज मिश्र, महेंद्रनाथ पांडे आणि संजीव बालियान
गडकरींचे खाते व्यापक होणार
राष्ट्रीय महामार्ग, परिवहन, भूपृष्ठ तसेच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एकात्मिक परिवहन मंत्रालयाच्या नावाखाली रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य एकात्मिक परिवहन मंत्रालयात नागरी उड्डाण मंत्रालयाचा समावेश असेल का, हे स्पष्ट होऊ शकले नाही. गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पदोन्नती मिळून स्वतंत्र प्रभार असलेले खाते दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात महाराष्ट्रातून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्र्बुद्धे यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रकाश जावडेकर यांचे मनुष्यबळ विकास खाते कायम राहील की बदलले जाईल, याविषयीही चर्चा आहे. सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वेखाते काढून घेतले जाणार हे आता निश्चित असून त्यांना पर्यावरण किंवा अन्य खाते दिले जाण्याची शक्यता आहे.
‘जद-यु’, ‘अण्णाद्रमुक’वर प्रश्नचिन्ह
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अण्णाद्रमुक आणि जनता दल युनायटेड यांच्या सहभागाविषयी निश्चिततता कायम आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये अजूनही अंतर्गत मतभेद कायम आहेत तसेच टीटीव्ही दिनाकरनने काही आमदारांच्या मदतीने राज्य सरकारच्या स्थिरतेलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक सहभागी होण्याची शक्यता धुसर आहे, तर आम्हाला सरकारमध्ये सहभागी होण्याविषयी अद्यापही काहीही माहिती मिळालेली नाही असे जनता दल युनायटेडच्या सूत्रांनी सांगितले. आमचे खासदार दिल्लीत आहेत. पण उद्या होणा-या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमच्याशी अद्याप संपर्क करण्यात आलेला नाही, असे जदयूच्या नेत्याने सांगितले. ‘एनडीए’चे निमंत्रण आल्यास जनता दल युनायटेडचे दोन प्रतिनिधी रामचंद्र प्रसाद सिंह आणि संतोष कुशवाह यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
शिवसेना अंधारात
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी अद्याप संपर्क साधलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला अंधारात ठेऊनच विस्तार होत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.मोदी मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्री असलेले अनंत गीते हे शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे द्यावीत, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे. शिवसेनेचे खा.अनिल देसाई यांना पूर्वी राज्यमंत्री पद देऊ करण्यात आले होते. तथापि, आम्हाला दुसरेही कॅबिनेट मंत्रीपदच हवे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. तेव्हापासून एकाच कॅबिनेट मंत्रीपदावर ते शिवसेना लटकलेली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेशीच नव्हे तर जुन्या कोणत्याही मित्र पक्षाशी अद्याप भाजपने विचारविनिमय केलेला नाही. अण्णाद्रमुक, जदयूसारख्या नव्या नवरीस हळद लावण्याचे काम सुरू आहे, या शब्दात शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराने नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीत होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रीपद मिळणार का? याविषयी राजकीय वतुर्ळात चर्चा रंगलेली असताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आम्हाला प्रसारमाध्यमांकडून कळले.
आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. आम्ही सत्तेसाठी लालची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवसेनेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. सर्वाचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. पण आमचे लक्ष मात्र मुंबईकरांच्या आरोग्याकडे आहे, असे ते म्हणाले. चार दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याविषयी बोलताना उद्धव म्हणाले की, मुंबईकर अडचणीत असताना शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मदत केली.
अनेकांची शिवसेना शाखेमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. नालेसफाई नीट झाली नसल्याने मुंबईत पाणी तुंबल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर उद्धव यांनी नालेसफाईत घोटाळा करणाऱ्यांना फासावर लटकवा असे म्हटले आहे. पावसानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली, त्याची जबाबदारी अन्य संस्था घेणार की नाही? असा सवाल त्यांनी विचारला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर गेली ५० वर्ष आम्ही काम करत आहोत असे उद्धव म्हणाले.
लोकसभा सदस्यांचा थयथयाट
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या निमित्ताने शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांत खदखद सुरू आहे. या विस्तारित मंत्रिमंडळात शिवसेनेला आणखी एक जागा मिळणार असल्याची चर्चा होती. या जागेसाठी अनिल देसाई आणि आनंदराव अडसूळ यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांचे नाव पुढे आले आहे. लोकसभेतील ज्येष्ठ खासदारांना डावलून राज्यसभेतील खासदाराला मंत्रीपद मिळणार असल्याने लोकसभेतील खासदारांनी थयथयाट सुरू केला आहे.
[EPSB]
[/EPSB]