कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने पाणी पेटू लागले आहे.
कल्याण- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने पाणी पेटू लागले आहे. महापालिकेत सामील करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये पाणी समस्या तीव्र बनली असून याबाबत अनेकदा तक्रारी पत्रव्यवहार करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी बुधवारी पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या मोर्चात रिकाम्या कळशी आणि हंडयासह महिला या मोर्चात मोठया प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
कल्याण-डोंबिवलीलगतची २७ गावे महापालिकेत सामील करण्यात आल्यानंतर या गावांचा खुंटलेला विकास मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र महापालिकेत सामील होऊन दीड वर्ष कालावधी उलटूनही शासनाची दुटप्पी भूमिका, प्रशासनाची अनास्था यामुळे काहीच कार्यवाही न झाल्याने या गावामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यात या गावांमध्ये पाणी समस्या तीव्र बनली असून अनेक भागांत पाण्याचा ठणठणाट झाला आहे.
याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, पत्रव्यवहार केले, निवेदने दिली, मात्र काहीच कारवाई होत नसल्याने या गावातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षभरापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना महापालिका प्रशासन ढिम्म बसून राहिल्याचे सांगत त्याचा निषेध करण्यासाठी २७ गावांतील ग्रामस्थांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला.
गेल्या वर्षभरापासून आम्हाला पाणी मिळेल, असे आश्वासन महापालिका देत आहे. मात्र वर्ष उलटून गेले तरीही पालिका प्रशासन याबाबत कोणतीच कार्यवाही करीत नसल्याचा आरोप मोर्चेक-यांनी केला. तसेच या मोर्चात महापालिका आयुक्त ई.रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
भोपरसह संदप, देसलेपाडा, सागाव, सागरली, नांदिवली, नवनीत नगर आणि आसपासच्या गावातील शेकडो ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते. भोपर येथील सर्वपक्षीय गाव समितीच्या आयोजनाखाली निघालेल्या या मोर्चात २७ ग्रामीण भागांतील लोकप्रतिनिधी व हजारो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त दीपक पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच पुढील १५ दिवसांत हा प्रश्न न सोडवल्यास गावागावात बेमुदत उपोषण छेडून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.