कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध सोलनपाडा धरणात रविवारी मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
नेरळ- कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध सोलनपाडा धरणात रविवारी मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर पर्यटकांची हुल्लडबाजी, धिंगाणा याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे या धरणावर पर्यटकांना येऊ न देण्याची मागणी केली.
त्यानुसार आता कर्जत तालुक्यातील सर्वच धरणे आणि धबधब्यांवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणा-यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात धाडले जाणार आहे. पुढील ३ महिन्यांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. त्यामुळे पिकनिकचा प्लॅन करणा-या पर्यटकांचा हिरमोड झाला असला, तरी स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सोलनपाडा डॅमवर या रविवारी सुमारे २० हजार पर्यटक आले होते. धरणाच्या बाजूलाच स्थानिक ग्रामस्थांची वस्ती आहे. याठिकाणी आलेले पर्यटक कसलेही भान न बाळगता दारू पिऊन धिंगाणा घालतात.
शाळा-कॉलेजची मुले-मुली धरणात किंवा आजूबाजूच्या माळरानात अश्लील चाळे करतात. यामुळे येथील लहान मुलांवर दुष्परिणाम होऊ नये, म्हणून स्थानिकांनी त्यांना हटकल्यास उलट स्थानिकांनाच दमदाटी केली जाते. शिवाय दारूच्या रिकाम्या बाटल्या शेतात फेकून दिल्या जात असल्याने शेतक-यांना शेतात काम करणं अवघड झाले आहे. त्यामुळे टेंभरे आणि मोग्रज ग्रामपंचायत सदस्यांनी या बेफाम पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
यानंतर कर्जतचे तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांनी पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील, कर्जतचे पोलीस निरीक्षक मुल्ला आणि नेरळचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याशी चर्चा केली.
यानंतर कर्जत तालुक्यातील सर्व धरणे व धबधब्यांवर पुढील ३ महिने जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. यानंतर या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे येथील बेकायदा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
‘त्याचा’ मृतदेह अजूनही पाण्यातच
दरम्यान, रविवारी सोलनपाडा धरणात बुडालेल्या मुंबईच्या दोन तरुणांना बाहेर काढण्यासाठी खोपोली येथील याक इन्स्टिटय़ूटची मदत घेण्यात आली. त्यांनी विनोद मथुराम रेड्डी (१९, रा. जोगेश्वरी) याचा मृतदेह पाच मिनिटांत बाहेर काढून तो कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
त्यानंतर अमित प्रकाश नाचरे (२४) याच्या मृतदेहाचा पाणबुडीच्या सहाय्याने सुमारे दोन तास शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे अखेर शोध थांबवण्यात आल्याचे याक इन्स्टिटय़ूटचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील, कर्जतचे पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्यासह सामाजिक कार्यकत्रे दत्तात्रय पिंपरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या ठिकाणी गेल्यास कारवाई!
या जमावबंदी आदेशान्वये पुढील ३ महिने सोलनपाडा, पाली-भूतिवली, पळसदरी, डोंगरपाडा, साळोख, अवसरे, पाषाणे, खांडपे, कशेळे या धरणे आणि धबधब्यांवर पाचपेक्षा जास्त पर्यटकांना एकत्र जाता येणार नाही.
तसे आढळल्यास सरळ गुन्हे दाखल केले जाणार असून त्यासाठी मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. जे पर्यटक हुज्जत घालतील, त्यांच्यावरही थेट कारवाई केली जाणार आहे.
सोलनपाडा येथे या रविवारी सुमारे २० हजार पर्यटक आले होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. त्यामुळे सर्व धरण क्षेत्रात १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यानंतर पर्यटकांना या भागात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जाणार आहे.
– रवींद्र बावीस्कर, तहसीलदार, कर्जत.