रायगड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शेकापचे आमदार जयंत (भाई) पाटील हे आज वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या आजवरच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर टाकलेला हा प्रकाशझोत..
रायगड ही महाराष्ट्रच नव्हे, तर भारत देशाला स्वराज्य आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी भूमी आहे. याच भूमीत ७ जुलै १९५५ रोजी प्रभाकर पाटील आणि सुलभाताई पाटील यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांचे नाव ‘जयंत’ ठेवण्यात आले. याच ‘जयंत’चे पुढे भाई झाले आणि त्यांनी समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अशा कर्तृत्ववान जयंतभाईंची आज ‘एकसष्टी’ आहे.
देशाचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आलेले असताना राष्ट्रीय काँग्रेस मात्र महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व बहुजनांच्या हिताकडे दुर्लक्ष करत होती. त्यावेळी महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेली आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित झालेली कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत होती. या कार्यकर्त्यांना कुठल्याही पक्षाकडून योग्य दिशा न मिळाल्याने त्यांनी ३ ऑगस्ट १९४७ रोजी महाराष्ट्रात ‘शेतकरी कामगार पक्षा’ची स्थापना केली. या पक्षात जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागो पाटील, वडील प्रभाकर पाटील व काका दत्ता पाटील यांनी आजीवन कार्य केले.
दत्ता पाटील यांनी तर २५ वर्षे आमदारकी भूषवली. त्यात एकदा विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले. तर भगिनी मीनाक्षीताई पाटील यांनीदेखील महाराष्ट्राचे मंत्रीपद भूषवले आहे. असा समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा लाभलेल्या भाई जयंत पाटलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राजकारणासह सर्वच क्षेत्रात स्वत:चा शिक्का उमटवला. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून झाली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर २७ जुलै २००० पासून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत.
रायगड जिल्ह्यातील बँका, विविध कार्यकारी सोसायटय़ा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत व आमदारक्या यांवरही भाईंचेच निर्वविाद वर्चस्व आहे. सध्या ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता’ हे राजकारणाचे सूत्र झालेले असताना पक्षाचे कार्य करणे कठीण झालेले आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वच्छ चारित्र्याचा आणि ज्यांच्याकडे आदराने पाहावे असा नेता जर कोणी असेल, तर ते जयंतभाईच असू शकतात, यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे.
राजकारण हा आमचा पैसा कमवण्याचा उद्योग नाही, तर अनेक उद्योगांच्या माध्यमातून कमावलेला पैसाही समाजकारण म्हणून राजकारणात वापरल्याचे भाई रोखठोकपणे सांगतात. शेकापच्या या कार्यात भाईंना विवेक पाटील, आमदार पंडितशेठ पाटील यांची खंबीर साथ मिळाली. याबरोबरच त्यांच्या सुविद्य पत्नी कल्पनाताई पाटील यांचा पिंडही समाजकार्याचाच असल्याने त्यांची प्रत्येक ठिकाणी त्यांना साथ मिळाली आणि त्यांच्या कार्याला गती मिळाली. आजही अनेक बाबी स्वतंत्रपणे कल्पनाताई पाटील करताना दिसतात.
मराठवाडा हा सुरुवातीला निजामाच्या ताब्यात असलेला प्रदेश नेहमीच दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिला आहे. तेथील कुठलाही पक्ष किंवा नेत्याने तिथे असलेला दुष्काळ शासनासमोर मांडला नाही किंवा सभागृहात झगडला नाही. हे काम शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांनी केले.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त असलेल्या गावा-गावात जाऊन त्यांनी तरुणांशी संवाद साधला. दुष्काळ समजून घेतला, त्यानंतर त्यावर उपाय सुचविले. काही प्रमाणात पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भरीव कार्य केले. त्यानंतर संघर्षशील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाईंच्या नेतृत्वाखाली ४ मार्च २०१६ रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली आणि त्यांनी दुष्काळग्रस्तांकडे लक्ष दिले. यानंतर दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघही वाढला. या मोर्चाने मराठवाडय़ातील जनतेने आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकरी, दु:खी, कष्टी लोकांचे नेते म्हणून शिक्कामोर्तब केले.
यासाठी संविधान मोर्चाचे ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांचेही भाईंना योगदान लाभले. मात्र इतके काम करूनही भाई प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे आदर्शवत ठरावे, असे त्यांचे कार्य महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सन १९८५ पासून १२ वष्रे संचालक असून १९९७ पासून आजपर्यंत बँकेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे. त्यांच्याच काटेकोर नियोजनातून रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. राज्यात सर्वप्रथम ४ टक्के व्याजदराने शेतकऱ्याला कर्जपुरवठा करणारी ही बँक असून शासनाच्या धोरणानुसार ० टक्के दरानेही बँकेमार्फत शेतक-यांना पतपुरवठा केला जात आहे. राजकीय आणि सामाजिक संपन्न वारसा लाभलेल्या जयंतभाईंना तितकाच पिढीजात संपन्न आíथक वारसाही आहे.
मात्र पूर्वजांच्या संपत्तीवर ऐशोआराम करणे हे त्यांच्या स्वभावात नाही. वंशपरंपरेने मिळालेल्या साधनसंपत्तीमध्ये त्यांनी स्वत:च्या उद्योगी वृत्तीतून वाढ केली आहे. सुरुवातीला नागेश एंटरप्रायजेस, नागेश पब्लिशर्स प्रा. लि. आणि पीएनपी मेरिटाईम सर्व्हिसेस प्रा. लि. इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय केला. त्यानंतर सीस्प्रे अॅल्युमिनियम बोट्स (इंडिया) प्रा. लि. ही अॅल्युमिनियमच्या बुलेटप्रूफ बोटी बनविणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी त्यांनी सुरू केली.
यात तयार झालेल्या पहिल्या वातानुकूलित बुलेटप्रूफ बोटीचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच कृषीवल सहाय्यक संस्था लि. अलिबाग आणि पर्यटन क्षेत्रातील सवाई रिसॉर्ट प्रा. लि. यांसह वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ते सातत्याने उत्पन्न वाढीच्या प्रयत्नात राहिले. राजकारण हे पैसा कमावण्याचे साधन नसून ‘समाजकारणासाठी राजकारण’ अशी त्यांची भूमिका आहे.
शिक्षणसंस्था हे माणसाला माणूस बनविण्याचे साधन आहे. त्याचा दर्जा हा महत्त्वाचा असतो. जिल्हा परिषदांच्या शाळेतही चांगला दर्जा शिक्षकांनी टिकवून ठेवला पाहिजे असे, त्यांचे शिक्षकांना सांगणे असते. कोकण एज्युकेशन सोसायटीचे ते संचालक होते आणि प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत.
डोनेशन हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला कलंक आहे, असे त्यांचे मत आहे. ६१ वर्षाचे आयुष्य होऊनही तरुणाला लाजवेल असा उत्साह, कणखर आवाज, संघर्ष करण्याची तयारी, बेडरपणा, आरोग्यसंपन्न शरीर, स्वयंपूर्ण असे कौटुंबिक वातावरण, विशिष्ट अशी त्यांची कार्यशैली यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू खुलले आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे आलेली प्रत्येक व्यक्ती त्यांची साथ कधीच सोडत नाही. यातच भाईंच्या जीवनाची यशस्वीता आहे. अशा भाईंना एकसष्टीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!