‘जत्रा’ हा शब्द नुसता उच्चारला ना तरी अजूनही माझं मन फुग्यासारखं होऊन जातं. हलकं हलकं पाय जमिनीवरून निसटतात आणि आभाळाच्या दिशेने धावू लागतात. मन पाखरू पाखरू होतं. फक्त ‘जत्रा’ या दोन अक्षरी शब्दात ही किमया आहे. पिटुकल्या हिरव्यागार खेडयात दोन जत्रा महत्त्वाच्या.
एक ‘सांबाची’ आणि दुसरी ‘सोळजाईची’ होळीला सांबाची जत्रा आणि देवदिवाळीला सोळजाईची. आमच्या गावात देवदिवाळीला घरोघरी पांढ-याशुभ्र जाळीदार आंबोळया बनतात. नारळ-गूळ रसातनं लोक मोठया चवीनं खातात. गाव साधंसं. जत्रा दिवसेंदिवस भरत नाही. दुपारी तीन ते रात्रौ सात, फारफार तर आठ वाजेपर्यंत.
आमच्या गावाशेजारच्या मार्लेश्वराची जत्रा मात्र दोन दिवस-रात्र चालते मकरसंक्रांतीला. लाखलाख भाविक येतात. एवढं काय करतात दिवस-रात्र असं विचारलं तर काकानं हळूच कानात काही सांगितलं. तर डोळे मोठेच झाले माझे. तर माझ्या पिटुकल्या गावाची इटुकली जत्रा. मनाला अपार वेड म्हणजे- त्या गुलाबी म्हातारीचं.
आताची मुलं म्हणतात, ‘बुढ्ढी के बाल’. आम्ही ‘म्हातारी’च म्हणत असू. छोटया छोटया थाटलेल्या दुकानांचं. दुकानं कसली? साखरपेढे, बत्तासे, शेवलाडू, चुरमु-याचे लाडू, बुंदी, भजी, कलिंगडवाले.. !
बाबा एक रुपया द्यायचे जत्रेसाठी. त्यात बरंच काय यायचं. जत्रेत गेल्यावर पहिलं देवदर्शन. सांब सदाशिवाच्या पिंडीवर अभिषेकपात्रातून अखंड वाहणारी संततधार. देवळाच्या गाभा-याबाहेर लगेचच पितळी मुखवटयाचा महादेव. का कुणास ठाऊक, पण मिशावाला शंकर मला आवडत नसे. त्याच्या आजूबाजूने पूर्ण दगडी देवांची रांग. चाफ्याची फुलं त्यावर वाहिलेली. संपूर्ण गाभारा थंड.
उदाचा वास भरून राहिलेला. उडवलेल्या अक्षता. त्या पायाला लागत. बाहेर आलो की दोन मिनिटं स्वस्थ बसून जत्रेत पळायचं आणि भिंगरी विकत घ्यायची. एका हातात भिंगरी आणि दुस-या हातानं लाडू, नळया, भजी खात खात संपूर्ण जत्रा फिरायची. पालखी नाचवतात ती पाहायला आगळीच मजा यायची. होम पेटायचा. होमाभोवती ढोल वाजायचे. होमात लोक नारळ टाकायचे.
जत्रेत कुणी ओळखीचं भेटायचं, त्याला पण गारेगार आईसफ्रूट खाऊ घालायचं.. जड पावलांनी घराकडे वळायचं. त्या क्षणी वाटायचं ‘पुढल्या वर्षी परत थोडं लवकर येऊया.’ अजून मजा करूया परत हा दिवस लवकर उजाडू दे रे देवा’ – असं मनात म्हणत घर गाठायचं.
‘जत्रा’ हा देवतेचा नैमित्तिक उत्सव. संस्कृत ‘यात्रा’ आणि प्राकृत ‘जत्ता’ या शब्दातून तयार झालेला जत्रा. अपार कृतज्ञतेनं गावोगावची माणसं येतात. देवाला फूल वाहतात. गायमुखाचं तीर्थ घेतात. एकमेकाला उराउरी भेटतात. झाडाखाली क्षणभर बसतात. मनं मोकळी करतात. संसारातली सुख-दु:ख सांगण्यात सांज परतून जाते. आपआपल्या गावच्या जत्रांची आमंत्रणं दिली जातात.
गावागावाच्या जत्रा निरनिराळया अहमदनगर जिल्ह्यातल्या ‘मढी’ची यात्रा तर म्हणजे होळीपासून पाडव्यापर्यंत सलग पंधरा दिवस चालते. कनिफनाथांची यात्रा. हिंदू- मुस्लिमांना एकत्र आणणारी.
‘मढी’ हे गाव तर भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जातं. कारण या यात्रेत बेचाळीस जमातीचे लोक महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येतात. ही यात्रा तर गाढव बाजारासाठीही प्रसिद्ध आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबाची यात्रा अशीच आठवडाभर चालते. बेलभंडारा उधळून जत्रेची सुरुवात होते. गाढव, घोडे, उंट, खेचरांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे.
भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे न्यायनिवाडे पण इथे होतात. या यात्रेत ‘घोंगडया’ विकत मिळतात. मालवणातील जत्रा लोखंडी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यात सैलानीचा दर्गा आहे. तिथे तर लाखभर विक्षिप्त, मनोरुग्ण येतात म्हणे. खरं-खोटं माहीत नाही पण ऐकून आहे असं. वारणा खो-यात जत्रेचे तीन दिवस वेगवेगळे साजरे होतात. पहिला उत्सवाचा नि कीर्तनाचा. दुसरा दिवस भंडा-याचा आणि तिसरा दिवस कुस्त्यांचा. तमाशांचे फड अशा जत्रांमधूनच रंगतात.
जत्रांमधून शिंग वाजतात. हलगी खणखणत राहते. धनगरांचे ढोल वाजतात. देशी वाद्य, संस्कृती, खानपान, खरेदी-विक्रीचे व्यवहार, जातपंचायती, पालखी-मिरवणुका, चुकामूक, मनाचं मीलन, लहानग्यांची मज्जा ही सारी ‘जत्रा’ या उत्सवी शब्दात सामावली आहे.
वय वाढलं तशी दुनियादारीत गुरफटायला झालं. आता लेकराबाळांना जत्रेत घेऊन जायला पण सवड होत नाही. घेऊन गेलो तरी उगाच ‘कसलं तर उघडयावरचं खाऊ नको’ म्हणायचा मोह आवरत नाही. मोठं झालो की, आईसफ्रूट आपणच खाल्लेली असतात याचा विसर का पडतो बरं?