जम्मू-काश्मीर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचेही भान विरोधकांना राहिले नाही.
श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचेही भान विरोधकांना राहिले नाही.
मागील काही काळात काश्मीर खो-यातील अशांत वातावरणामुळे झालेले मृत्यू आणि सरकारच्या सर्वच आघाडय़ांवरील अपयशाविरोधात नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी गोंधळ घातला. राज्यपालांचे भाषणही या पक्षांनी तीन वेळा थांबवण्यास भाग पाडले. त्यामुळे सरतेशेवटी राज्यपाल भाषण अर्धवट सोडून निघून गेले.
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सोमवारी पहिला दिवस होता. यानिमित्ताने राज्यपाल एन. एन. वोहरा हे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषणासाठी आले.
राज्यपाल आल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले, मात्र राज्यपालांनी सभागृहात पाय ठेवताच नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या विरोधी पक्षांनी सभागृहात विरोधाचे फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली. राष्ट्रगीत सुरू असल्याचे भानही त्यांना राहिले नाही.
राज्यपालांचे भाषण विरोधी पक्षांनी तब्बल तीन वेळा थांबवण्यास भाग पाडले. त्यामुळे राज्यपाल भाषण सोडून निघून गेले. याप्रकरणी सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.