अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात महाराष्ट्रातील दोन महिलांचा मृत्यू झाला.
श्रूनगर- अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात महाराष्ट्रातील दोन महिलांचा मृत्यू झाला. उषा सोनकर आणि उर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही महिला पालघरमधील डहाणू येथील रहिवासी होत्या. तर जखमींमध्येही महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश आहे.
सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यातून निघालेल्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सहा महिलांचा मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. तर ३२ जण जखमी आहेत.
भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.