रणजी करंडक स्पर्धेत (क गट) माजी विजेत्या मुंबईने मध्य प्रदेशवर पहिल्या डावात आघाडी घेतली.
इंदूर- रणजी करंडक स्पर्धेत (क गट) माजी विजेत्या मुंबईने मध्य प्रदेशवर पहिल्या डावात आघाडी घेतली. मध्य प्रदेशच्या ४०९ धावांना जशास तसे प्रत्युत्तर देत मुंबईने तिस-या दिवसअखेर सोमवारी ८ बाद ४१५ धावा केल्यात. त्यांच्याकडे सहा धावांची नाममात्र आघाडी असली तरी ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सलामीवीर जय बिश्तचे (१३५) शतक तसेच सिद्धेश लाड (८२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (९१) शानदार खेळीमुळे मुंबईला आघाडी घेता आली.
१ बाद १३० धावांवरून पुढे खेळताना मुंबईने तिस-या दिवशी आठ विकेटच्या बदल्यात २८५ धावा केल्या. त्यात जय आणि सूर्यकुमारचे मोठे योगदान राहिले. ८९ धावांवर खेळणा-या बिश्तने शतक ठोकलेच. शिवाय तिस-या क्रमांकावरील सिद्धेशसह दुस-या विकेटसाठी १७२ धावांची मोठी भागीदारी रचली.
१४० चेंडूंत १३५ धावांची चमकदार खेळी करून बिश्त परतला. त्याच्या शतकात १८ चौकारांचा समावेश आहे. जय बाद झाल्यानंतर लाडने कर्णधार यादवने शानदार अर्धशतके ठोकली. तसेच मुंबईला तीनशेच्या घरात पोहोचवले. मात्र दोघांनीही शतकाने हुलकावणी दिली. सिद्धेशने १३७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह ८२ धावांची संयमी खेळी केली. सूर्यकुमारनेही चांगली फलंदाजी करताना १४९ चेंडूंत ९१ धावा फटकावल्या. त्यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
मात्र लाड आणि यादवच्या विकेट पडल्यानंतर शुभम रांजणे (९) आणि अनुभवी अभिषेक नायर (१) लवकर बाद झाल्याने मुंबईच्या आघाडी घेण्याच्या आशांना धक्का बसला. मात्र आकाश पारकर (१) आणि सुफियान शेखने (खेळत आहे ३०) संयम दाखवत मुंबईला चारशेपार नेले. तसेच आघाडी मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात ४०९ धावा केल्यात. तीन दिवसांनंतरही पहिले डाव पूर्ण न झाल्याने सामना अनिर्णीत राहण्याची दाट शक्यता आहे. त्या स्थितीत पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईला जादा गुण मिळवता येईल.
[EPSB]
[/EPSB]