पेट्रोल, डिझेल दरात जबदरस्त वाढ झालेली आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलच्या किमती वाढलेल्या नसताना आणि बॅरेलचे भाव फक्त २२ रुपये इतके असताना कच्च्या तेलाचे शुद्धिकरण करून हा भाव जास्तीतजास्त ५० रुपये होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोदी सरकारने सातत्याने वाढवलेले आहेत.
नव्या वर्षाची सुरुवात सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी न केली जाता १.२९ पैसे प्रती लिटरमागे पेट्रोलची वाढ झाली आणि डिझेलची वाढ ९७ पैशांनी झालेली आहे. हे दर वाढवल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्रालयाने केलेली नसून, तेल कंपन्यांनी परस्पर केलेली आहे. यापूर्वी असे कधी घडलेले नव्हते. पेट्रोलियम मंत्रालयामार्फत दरवाढीच्या सूचना दिल्या जायच्या. मोदी सरकार आल्यानंतर गेल्या अडीच वर्षात ही आठव्यांदा वाढ करण्यात आली असून, सलग तीन महिन्यांत ही तिसरी दरवाढ करण्यात आलेली आहे.
डिझेल आणि पेट्रोलचा भाव वाढत असतानाच अनुदानित गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागलेले आहे. जाहिरात करताना अनुदानित गॅस सिलिंडर हा गरीब घरांकरिता मोदींनी दिलेला तोहफा आहे. अशी जाहिरात केली जात होती. गेल्या ७ महिन्यांत अनुदानित सिलिंडरमध्ये आठव्यांदा वाढ करण्यात आली आहे आणि आता गॅस सिलिंडरची नियमित किंमत आणि अनुदानित किंमत यात फार फरक राहील, अशी स्थिती नाही. तीच गोष्ट पेट्रोल आणि डिझेलची आहे. नवीन वर्षात १.२९ पैसे पेट्रोलचे दर वाढवले गेल्यामुळे मुंबईत आज ७६ रुपयांनी प्रती रुपये पेट्रोल विकले जात आहे. तर दिल्लीमध्ये ७४ रुपयांनी पेट्रोल विकले जात आहे.
२०१४ च्या १६ मे रोजी मोदींचे सरकार निवडून आले. त्या दिवशी भाजपाच्या लोकांनी ज्या विजयी मिरवणुका काढल्या त्या मिरवणुकांसाठी वापरलेल्या गाडय़ांमध्ये टाकलेल्या पेट्रोलचा प्रती लिटर भाव ६१ रुपये होता. मिरवणूक जोरात निघाल्या. मोदींनी सर्व देशभर पाटय़ा लावल्या होत्या. ‘महंगाई की पडी मार.. अब की बार मोदी सरकार’ गेल्या अडीच वर्षातील या पाटय़ांवर डांबर फासायची वेळ आली असून, आता त्या पाटय़ांऐवजी ‘महंगाई की पडी मार.. अब की भाजपा आरपार’ अशी घोषणा द्यायची वेळ आलेली आहे. सामान्य लोकांची फसवणूक करून अडीच वर्षापूर्वी मोदी सत्तेवर आले तेव्हा ६१ रुपये असलेले पेट्रोल आज ७६ रुपयांवर जाऊन धडकले आहे. अडीच वर्षात पेट्रोलच्या दरात लिटरमागे १५ रुपयांनी वाढ झाली आहे आणि विशेष असे की, डिझेलमध्ये जवळपास तेवढीच वाढ झालेली आहे.
मोदींची राजवट २०१९ मध्ये संपेल त्यावेळी पाच वर्षात पेट्रोलचा दर जवळपास १०० रुपयांपर्यंत मोदी नेऊन ठेवतील आणि डिझेलचा दरही जवळपास ८५ रुपयांपर्यंत राहील. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या बॅरेलची किंमत घसरलेली असताना पेट्रोल कंपन्यांनी परस्पर भाववाढ करून टाकलेली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर महाग करून टाकला. आता पेट्रोल आणि डिझेल वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या सर्व वस्तूंची किंमत आपोआप वाढणार आहे. कारण वाहतुकीचा सगळा खर्च वाहतूकदार त्या मालावर टाकणार आहेत. जेव्हा खारघरला खासगी गाडीवाल्यांना टोलमाफी दिली त्यावेळी टेम्पो आणि ट्रकवाल्यांना दुप्पट टोल लावला. हा टोल ट्रक आणि टेम्पोवाल्यांनी आपल्या खिशातून दिलेला नाही. तो वाहतूक केलेल्या मालावरच टाकलेला आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर त्याचा भरुदड पुन्हा आलेला आहे. आता वाढलेले डिझेल आणि पेट्रोलचे भाव पाहता महागाई दुप्पट होण्याची भीती आहे.
सरकार जागेवर नसल्यानंतर काय होते ते आज या देशात पावलापावलाला जाणवत आहे. नोटाबंदीनंतर शेतीमालाच्या सगळय़ा वस्तूंचा भाव आज कोसळलेला आहे. शेतक-याला जवळपास ४ वर्षानंतर उत्तम पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला होता आणि आलेल्या उत्तम पिकामुळे दोन पैसे कमावता येतील, अशी त्याची स्वप्ने होती. परमेश्वराच्या कृपेने पाऊस अतिउत्तम झाला. खरिपाची पिके शिगोशिग आली. समस्त शेतकरी वर्ग आनंदात होता आणि जेव्हा कापूस, जोंधळा, गहू, तांदूळ, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग ही सगळी धान्ये आणि कडधान्ये बाजारात येण्याची वेळ आणि मोदींनी नोटाबंदी करण्याची वेळ अशीही एक वेळ साधण्यात आली आणि शेतक-याचे कंबरडे मोडून टाकण्यात आले. त्याची या सरकारला कुठलीही खंत नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि ग्राहकाच्या बाजूने आहे, असे म्हणावे तर तसेही म्हणता येत नाही. कारण शेतीमालाचे भाव पडलेले असताना बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव चढे कसे काय? या सरकारला यातील अर्थशास्त्र कळत असते तर निदान वस्तूंचे भाव चढे होऊ दिले गेले नसते. शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील जो दलाल उभा आहे या दलालाने वारेमाप दलाली काढून वस्तूंच्या किमती चढय़ा कशा राहतील याची काळजी घेतली आणि सामान्य ग्राहकाला पेट्रोल, डिझेल दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणखी सहन करावी लागणार आहे. अडीच वर्षापूर्वी आजच्या सरकारच्या घोषणा काय होत्या? त्यावेळची वस्तूंचे दर काय होते? आज वस्तूंचे दर काय आहेत? २०१४ सालचे डिझेल-पेट्रोलचे दर, जीवनावश्यक वस्तूंमधील गोडेतेल, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, उडीदडाळ, मूगडाळ, शेगदाणे, मिरची याचे भाव काय होते? आणि मोदींचा राज्याभिषेक झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षात वस्तूंचे भाव किती वाढले याचा तक्ता प्रसिद्ध करून काँग्रेस पक्षाने या मोदी सरकारला उघडे पाडले पाहिजे.
सामान्य माणसाचा विश्वास असा होता की, बाकी राजकारण चुलीत गेले तरी भाजपाचे सरकार आल्यानंतर ‘महंगाई की मार’ कमी होईल. पण प्रत्यक्षात याच महागाईने सामान्य माणसाने जेरीला आणून टाकलेले आहे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढीव भावामुळे ही महागाई आणखी भडकत जाणार आहे. पेट्रोलच्या जागतिक किमतीचे सूत्र लक्षात घेतले तर मोदी सरकार तसे नशीबवान म्हणायला हवे. कारण मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या बॅरलचे दर सातत्याने चढे राहिले होते. मोदींचे सरकार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किमती घसरलेल्या असताना भारतात मात्र पेट्रोल-डिझेलचे भाव कोणत्या तर्कशास्त्राने वाढवले जात आहेत. आता जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे दर घसरलेले असताना पेट्रोलचा प्रती लिटरचा दर ५० रुपयांपर्यंत यायला हवा होता. असे तेल शास्त्रातले निष्णांत सांगतात. प्रत्यक्षात अडीच वर्षात १६ रुपयांनी लिटरमागे दर वाढले. पण या वाढत्या महागाईविरोधात सोशल मीडियावाले आवाज उठवायला तयार नाहीत आणि राजकीय पक्षसुद्धा सामान्य माणसाला वेठीला धरल्यानंतर त्याच्या बाजूने उभे राहायला तयार नाहीत.
मोदींचे एक नशीब असे की, त्यांच्याविरोधात १०० मुद्दे असताना देशातील सामान्य माणूस मुर्दाड झाल्यासारखा आहे. त्याच्यात संवेदना शिल्लक राहिलेल्या नाहीत. कदाचित मोदी सरकारने फसवणूक केल्यामुळे तो कमालीचा निराश होऊन हतबल झाला असेल. कारण २०१४ साली मोदी अधिकारावर येण्यापूर्वी तूरडाळीचा भाव प्रती किलो ६७ रुपये होता. मोदींची या देशाला एवढी मोठी देणगी आहे की, आज हा तूरडाळीचा भाव १९० रुपये किलोवर स्थिर राहिलेला आहे. अडीच वर्षात व्यापा-यांनी जवळपास १३० रुपयांची लूट केली असून, या डाळींच्या किमतीवर आता सरकारचे अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठामंत्री जे कोणी गिरीष बापट नावाचे आहेत त्यांच्याच भोवती डाळींच्या घोटाळय़ाचे आरोप घोंगावत राहिले आणि डाळींचे दर काही कमी झाले नाहीत. आता तर पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व किमती झपाटय़ाने भडकणार असून मोदी सरकार विरुद्धची लढाई आरपार करावी लागेल. कदाचित मोदींना हे कळून चुकले असेल की, सत्तेवरची आपली शेवटची संधी आहे, तेव्हा लुटून घ्या आणि देशाला बरबाद करून टाका. आज त्या दिशेने पावले पडत आहेत.