महागाईच्या मुद्दयावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एनडीए सरकारने महागाई कमी केल्याचा दावा केला.
नवी दिल्ली- महागाईच्या मुद्दयावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एनडीए सरकारने महागाई कमी केल्याचा दावा केला. त्यासाठी आकडयांचा हवाला देताना महागाईचे खापर पावसावर फोडले.
पावसामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत, असे उत्तरही जेटली यांनी दिले. महागाईवरून राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केल्यानंतर यूपीए सरकारच्या काळात वाढलेली महागाई एनडीए सरकारने कशी नियंत्रणात आणली, हे सांगण्याचा जेटलींनी प्रयत्न केला. मोदी सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केला.
गेल्या अठरा महिन्यांत महागाई दर नियंत्रणात आहे. साखरेची किमत अनेक महिन्यांपासून २३ रुपये आहे. अन्न आणि नागरी पुरठामंत्री रामविलास पासवान यांच्या कामाचीही जेटली यांनी प्रशंसा केली.
शेतक-यांना विविध योजनांच्या माध्यमातून २७ हजार कोटींची देणी होती. ती आता केवळ १.५ हजार कोटी शिल्लक असल्याचा दावाही त्यांनी केला. कांद्याची किंमत इतकी घसरली आहे की शेकडो टन कांदा फेकण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचेही ते म्हणाले.