भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वनडे गुरुवारी (२८ सप्टेंबर) बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे.
इंदूर- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वनडे गुरुवारी (२८ सप्टेंबर) बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली तरी यजमानांसाठी या लढतीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. भारताने सातत्य राखल्यास सलग दहाव्या विजयाची नोंद होईल आणि दोन दिवसआधीच ‘विजया’दशमी साजरी होईल.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलग दहा वनडे जिंकण्याचा पराक्रम आजवर अनेक देशांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच वेळा तसेच इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेने प्रत्येकी दोनदा अशी करामत साधली. या विक्रमात न्यूझीलंडचाही समावेश आहे. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने तब्बल सहा वेळा असा टप्पा पार करून अव्वल स्थान राखले आहे. मात्र भारताला या विक्रमाला गवसणी घालता आलेली नाही. सध्याचा जबरदस्त फॉर्म पाहता विराट कोहली आणि सहका-यांच्या आवाक्यात हा दुर्मीळ विक्रम आहे. वेस्ट इंडिज दौ-यातील तिस-या वनडेनंतर (अँटिगा, जुलै) भारताने मागे वळून पाहिलेले नाही. श्रीलंकेला (५-०) त्यांच्याच देशात हरवून कोहली आणि कंपनीने विजयाचा ‘षटकार’ पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या तीन वनडेत पाणी पाजून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीच. शिवाय सलग दहा विजयाचा विक्रम नोंदवण्यादृष्टीने कूच केली.
विराट कोहली आणि सहका-यांनी जबरदस्त कामगिरी करताना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर लोळवले. आता दोन वर्षापूर्वीच्या पराभवाचा (१-४) सव्याज बदला घेण्याची संधी आहे. प्रत्येक सामना जिंकायचा, या निर्धाराने खेळणा-या यजमानांना निर्भेळ यश मिळवणेही शक्य आहे. दुसरीकडे, स्टीव्हन स्मिथ आणि सहकारी गलितगात्र झालेत. त्यांचे सर्व डावपेच फोल ठरलेत. मात्र उर्वरित सामन्यांत खेळ उंचावला तर त्याचा फायदा आगामी टी-२० मालिकेत होऊ शकेल.
भारताने सर्व आघाडय़ांवर चांगले यश मिळवलेय. सर्वाधिक धावा करणा-या तीन फलंदाजांमध्ये अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने तीन लढतीत दोन अर्धशतकांसह ६०.३३ सरासरीसह १८१ धावा केल्यात. पहिल्या आणि तिस-या वनडेतील सामनावीराचा पुरस्कार पाहता त्याच्या भन्नाट फॉर्मची प्रचिती येते. हार्दिकने प्रभावी मध्यमगती मारा करताना पाच विकेटही मिळवल्यात. पंडय़ानंतर सर्वाधिक धावा सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या आहेत. त्यानेही दोन अर्धशतके झळकावलीत. मात्र ४३.३३ च्या सरासरीने अजिंक्यला १३० धावाच करता आल्यात. सलामीवीर रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली आणि ‘द ग्रेट फिनिशर’ महेंद्रसिंग धोनीने प्रत्येकी एक अर्धशतक ठोकले तरी प्रमुख फलंदाजांमध्ये सातत्य नाही.
मनीष पांडे (३ सामन्यांत ३९ धावा) आणि केदार जाधवने (३ सामन्यांत ६६ धावा) निराशा केली आहे. पंडय़ामुळे त्यांचे अपयश झाकले गेले आहे. मालिकेतील विजयी आघाडी पाहता मधल्या फळीत लोकेश राहुलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. फलंदाजांना अपेक्षित खेळ करता नसला तरी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ‘चायनामन’ कुलदीप यादव (७ विकेट) आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल (६ विकेट) या अननुभवी फिरकीपटूंनी ऑफस्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. या दुकलीने निवडसमितीसह संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत संधीचे सोने केले.
मध्यमगती जोडी भुवनेश्वर कुमार (४ विकेट) आणि हार्दिक पंडय़ाने (५ विकेट) यादव-चहलला चांगली साथ दिली आहे. तिसरा मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराही (३ विकेट) ठिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार कोहलीने प्रमुख गोलंदाजांनाच आलटून पालटून वापरले. सहावा गोलंदाज वापरलाच नाही. सर्वच गोलंदाज प्रभावी ठरत असले तरी संघात समावेश असूनही उमेश यादव आणि मोहम्मद शामीला अद्याप मैदानावर उतरण्याची संधी मिळाली नाही. बुमरा वगळून उर्वरित दोन सामन्यांत दोघांना संधी मिळू शकते.
प्रमुख फलंदाजांनी थोडी निराशा केली तरी भारतात सर्वकाही आलबेल आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पाहुण्या संघाला सर्व आघाडय़ांवर सुधारणा आवश्यक आहे. त्यांच्या केवळ तीन फलंदाजांना अर्धशतक मारता आले आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथने (२ अर्धशतके) आणि मार्क्स स्टॉईनिसने (एक अर्धशतक) थोडा प्रतिकार केला. कोलकात्यामध्ये सलामीवीर आरोन फिंचचे शतक ठोकत धडाक्यात पुनरागमन केले. मात्र त्याची झटपट खेळ व्यर्थ ठरली. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (३ सामन्यांत ६८ धावा) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला (५८ धावा) सूर गवसलेला नाही. चांगली सुरुवात करूनही वॉर्नरला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. कारकिर्दीतील शंभरावी वनडे असल्याने वॉर्नरसाठी ही लढत महत्त्वाची आहे.
मॅक्सवेलला फिरकी मारा खेळताच येत नाही. ट्रॅव्हिस हेड (३ सामन्यांत ४८ धावा) आणि यष्टिरक्षक मॅथ्यू वॅडे (२ सामन्यांत ११ धावा) सपशेल ‘फ्लॉप’ ठरलेत. गोलंदाजीतही वेगवान गोलंदाज नॅथन कॉल्टर नाईलने (७ विकेट) छाप पाडली आहे. मात्र त्याचा सहकारी पॅट कमिन्स (३ विकेट), डावखुरा फिरकीपटू अॅश्टन अॅगर (२ सामन्यांत २ विकेट), लेगस्पिनर अॅडम झंपा (एका सामन्यात एक विकेट) तसेच वेगवान गोलंदाज जेम्स फॉकनरला (एका सामन्यात एक विकेट) भारताच्या फलंदाजांना बाद करणे, जमले नाही. ऑस्ट्रेलियाकडील सर्व पर्याय संपलेत. त्यामुळे उपलब्ध क्रिकेटपटूंसह कामगिरी उंचावण्याशिवाय पर्याय नाही. मालिका हातची गेली आहे. आता ‘व्हाईटवॉश’ची नामुष्की टाळण्याचे आव्हान आहे. मात्र दडपण झुगारून न खेळल्यास पाहुण्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागेल, हे निश्चित.
वेळ : दु. १.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, केदार जाधव, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव,
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, पीटर हँडस्काँब, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वॅडे (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, हिल्टन कार्टराईट, अॅश्टन अॅगर, नॅथन कॉल्टर-नाईट, मार्क्स स्टॉईनिस, अॅडम झंपा.
पावसाचे सावट
बंगळूरुमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने चौथ्या वनडेवर पावसाचे सावट आहे. २००८ पासून भारत येथे हरलेला नाही. येथील खेळपट्टी संथ (स्लो) असण्याची शक्यता आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर तब्बल चार वर्षानी वनडे लढत खेळली जात आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेली शेवटची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्धचीच होती. त्यात यजमानांनी बाजी मारली होती. बंगळूरु हे कर्णधार विराट कोहलीचे ‘होमग्राउंड’ असले तरी फलंदाज म्हणून ‘अनलकी’ आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चार डावांत त्याला ०, ८, ३२ आणि ० अशा ४२ धावाच करता आल्यात.