भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी गुरुवारपासून (१६ मार्च) झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (जेएससीए) स्टेडियमवर खेळली जाणार आहे.
रांची- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी गुरुवारपासून (१६ मार्च) झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (जेएससीए) स्टेडियमवर खेळली जाणार आहे. १-१ अशा बरोबरीनंतर मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. मात्र रांचीमध्ये प्रथमच कसोटी सामना होत असल्याने क्रिकेटपटूंच्या कामगिरीसह खेळपट्टीच्या रागरंगाची मोठी उत्सुकता आहे.
पहिल्या कसोटीतील नामुष्कीजनक पराभवानंतर भारताची प्रतिष्ठा पणाला लागली. मात्र विराट कोहली आणि सहका-यांनी खेळ उंचावत बंगळूरु कसोटी आरामात जिंकली. तसेच चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांचा खेळ उंचावल्याने मालिकेतील रंगत वाढली आहे. त्यातच ड्रेसिंगरूमधील सहका-यांना विचारून ‘डीआरएस’ पुर्नाआढावा घेण्याबाबतच्या स्टीव्हन स्मिथच्या कृतीने मालिकेला वेगळे वळण लागले.
स्मिथ आणि कोहलीच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया बोर्डाने या वादात उडी घेतली. मात्र आयसीसीने कारवाई न करण्याचे ठरवल्याने वादावर पडदा पडला. मैदानाबाहेरील (ऑफ द फिल्ड) वाद विसरून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दोन्ही बोर्डानी आपापल्या क्रिकेटपटूंना दिला आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे. पुण्यानंतर बंगळूरुची खेळपट्टी ‘स्पिन’ला अनुकूल ठरली. पुण्याप्रमाणेच रांची स्टेडियमवरही प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे. या खेळपट्टीच्या रांगरंगावर निकाल अवलंबून राहील.
सांघिक कामगिरीचा विचार करता बंगळूरुतील ‘कमबॅक’ विजय भारताचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला आहे. सलामीवीर लोकेश राहुलचे सातत्य तसेच दुस-या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने दाखवलेला संयम उल्लेखनीय आहे. मात्र यजमानांच्या फलंदाजीमध्ये सर्वकाही आलबेल नाही.
भारताला सलामीचा प्रश्न अद्याप भेडसावतोय. अभिनव मुकुंदला संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे खांदा दुखापतीतून सावरलेला अनुभवी सलामीवीर मुरली विजयचे पुनरागमन नक्की मानले जात आहे. कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांसाठी झगडावे लागत आहे. त्याच्यासह यष्टिरक्षक, फलंदाज वृद्धिमान साहा, मधल्या फळीतील करुण नायरला सूर गवसावा, असे चाहत्यांना वाटते.
ऑफस्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला गवसलेला सूर प्रतिस्पध्र्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. उर्वरित मालिकेत या स्पिन दुकलीवरच यजमानांची भिस्त आहे. रांचीतील खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्यास भारत तीन स्पिनर्ससह खेळू शकतो. तसे झाल्यास नवोदित ऑफस्पिनर जयंत यादवला अंतिम संघात संधी मिळू शकेल. मात्र अनुभवी मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मासह उमेश यादवकडून अचूक आणि प्रभावी गोलंदाजी अपेक्षित आहे.
भारताच्या पलटवाराने ऑस्ट्रेलिया संघामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बंगळूरुमध्ये त्यांची फलंदाजी ढेपाळली. त्यातच पाहुण्या फलंदाजांनी अश्विन आणि जडेजासमोर शरणागती पत्करली. सांघिक कामगिरी उंचावण्यासह प्रमुख क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीमुळे पाहुण्यांच्या गोटात चिंता आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसह मार्क्स स्टॉईनिस तसेच उस्मान ख्वाजा आणि अॅस्टन अॅगरमध्ये चुरस आहे. डावखुरा स्टीव्ह ओकिफे आणि नॅथन लियॉनला सातत्य राखता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीही फार चांगली होत नाही.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह शॉन मार्श, पीटर हँडस्काँब, मॅथ्यू वेडला अद्याप अपेक्षित सूर गवसलेला नाही. रांचीतील खेळपट्टीबाबत मत-मतांतरे आहेत. गडद रंगाच्या खेळपट्टीमुळे क्रिकेटपटू संभ्रमात आहेत. पाहुणा कर्णधार स्मिथच्या मते, पहिल्या दिवशी खेळपट्टी ठणठणीत असेल. तसेच फार ‘बाऊन्स’ मिळणार नाही.
वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमन साहा (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पंडय़ा, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, करुण नायर, अभिनव मुकुंद, कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्काँब, शॉन मार्श, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वॅडे (यष्टिरक्षक), जोश हॅझ्लेवुड, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क, अॅस्टन अॅगर, जॅक्सन बर्ड, स्टीव्हन ओकिफे, मिचेल स्वीप्सन.
क्रिकेटपटूंचा वावरही महत्त्वपूर्ण ठरेल-कोहली
रांचीच्या खेळपट्टीसह क्रिकेटपटूंचा मैदानावरील वावरही महत्त्वपूर्ण ठरेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिस-या कसोटीसाठीच्या पूर्वसंध्येला बुधवारी म्हटले.
‘‘सांघिक कामगिरी उंचावण्यात खेळपट्टी तसेच हवामानाचे मोठे योगदान असेल. मात्र मैदानाबाहेरील गोष्टीही म्हणजे क्रिकेटपटूंची वर्तणूकही महत्त्वपूर्ण ठरेल.
कसोटीमध्ये मानसिकतेचा कस लागतो. पहिल्या दोन कसोटींमध्ये खेळपट्टय़ांमुळे नव्हे तर खेळपट्टीच्या भीतीमुळे फलंदाजी ढेपाळल्याचे पाहायला मिळाले,’’ असे कोहली म्हणाला. कोहलीचा पवित्रा पाहता दुस-या कसोटीतील ‘डीआरएस’ वाद अद्याप तो विसरलेला नाही.
कोहलीचे आरोप खोटे – स्मिथ
बंगळूरु कसोटीतील ‘डीआरएस’ वादाबाबत विराट कोहलीचे आरोप खोटे असल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने सांगितले.
‘‘माझ्या मते, कोहलीची वागणूक आणि त्याचे आरोप खोटे आहेत. अंपायर्सनी बाद दिल्यानंतर ड्रेसिंगरूममधील सहका-यांकडे पाहून विचारणा करण्याबाबतची माझी कृती चुकीची होती. मी चूक मान्य केली आहे. कोहलीचे वागणे म्हणजे मेंदू निष्प्रभ होणे, या वक्तव्यावरही मी ठाम आहे. मात्र ‘झाले गेले विसरून’ आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत,’’ असे स्मिथ म्हणाला.
‘कॅप्टन कुल’ धोनीची अनुपस्थिती जाणवेल
तिस-या कसोटीत भारताचा माजी कर्णधार आणि झारखंडचा सुपुत्र महेंद्रसिंग धोनीची अनुपस्थिती जाणवेल. विजय हजारे वनडे चषक स्पर्धेच्या निमित्ताने धोनी सध्या नवी दिल्लीमध्ये आहे.
विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियम (मुंबई) आणि ईडन गार्डन्सशी (कोलकाता) जोडले गेले आहेत. त्याप्रमाणे रांची स्टेडियम आणि धोनीचे नाते आहे. मात्र रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय सामना होत असताना प्रथमच धोनीला उपस्थित राहता येणार नाही.
हेही लक्षात ठेवा
» रांची हे कसोटी सामना खेळणारे भारतातील ६ वे ठिकाण बनले आहे.
» तिसरी कसोटी ही ऑस्ट्रेलियाची आजवरची ८००वी कसोटी आहे.
» पाहुणा कर्णधार स्मिथला पाच हजार धावांचा आकडा गाठण्यासाठी ७६ धावांची आवश्यकता आहे.