पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या लढतीत रविवारी ‘डकवर्थ-लुईस पद्धती’नुसार ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी मात करत भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी दिली.
चेन्नई- पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या लढतीत रविवारी ‘डकवर्थ-लुईस पद्धती’नुसार ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी मात करत भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. अष्टपैलू हार्दिक पंडया (६६ चेंडूंत ८३ धावा आणि २ विकेट) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (८८ चेंडूंत ७९ धावा) यजमानांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पंडया आणि धोनीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ७ बाद २८१ धावा केल्या तरी पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियासमोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष्य होते. मात्र पाहुण्यांना ९ बाद १३७ धावा करता आल्या. त्यांच्यातर्फे ग्लेन मॅक्सवेल (३९ धावा), जेम्स फॉकनर (नाबाद ३२) आणि डेव्हिड वॉर्नरने (२५ धावा) थोडा प्रतिकार केला. भारतातर्फे लेगस्पिनर युझवेंद्र चहलने तीन तसेच मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंडया आणि ‘चायनामन’ कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार (२५-२) आणि जसप्रीत बुमराने (२०-१) प्रभावी मारा केला.
तत्पूर्वी, ५ बाद ८७ धावा अशा बिकट स्थितीतील भारताच्या मदतीला हार्दिक पंडया आणि महेंद्रसिंग धोनी धावले. पंडयाने (६६ चेंडूंत ८३ धावा) तिसरे अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश आहे. पंडयाने पाहुण्यांचा लेगस्पिनर अॅडम झंपाला लक्ष्य करताना तीन षटकार ठोकले. सुरुवातीला सावध पवित्रा घेणा-या धोनीने पंडया बाद झाल्यानंतर ‘गियर’ बदलले. ८८ चेडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ७९ धावांची खेळी करताना त्याने वनडेतील अर्धशतकांची संख्या ६६वर पोहोचवली. पंडया आणि धोनीने सहाव्या विकेटसाठी ११८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना भारताला सावरले.
शेवटच्या षटकांत धोनीने भुवनेश्वर कुमारसह (नाबाद ३२) सातव्या विकेटसाठी ७२ धावा जोडताना संघाला तीनशेच्या घरात नेले. भारताने चांगली धावसंख्या उभारली तरी सहाव्या षटकात ३ बाद ११ धावा अशी यजमानांची अवस्था झाली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कॉल्टर-नाईलने अजिंक्य रहाणेसह (५) कर्णधार विराट कोहली (०) आणि मनीष पांडेला (०) बाद करत यजमानांना हादरवले. रोहितने (२८) केदार जाधवसह (४०) चौथ्या विकेटसाठी ५३ धावा जोडताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सहा षटकांच्या फरकाने दोघेही परतल्याने भारत (५ बाद ८७ धावा) पुन्हा अडचणीत आला.
धोनीचे अर्धशतकांचे ‘शतक’
पहिल्या वनडेतील अर्धशतक हे धोनीने तिन्ही प्रकारांतील क्रिकेटमध्ये मिळून १००वे अर्धशतक ठरले. अर्धशतकांचे ‘शतक’ ठोकणारा तो जगातील १३वा आणि भारताचा चौथा फलंदाज ठरला. धोनीपूर्वी विक्रमवीर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने अशी करामत साधली आहे. धोनीने ९० कसोटीत ३३, ३०२ वनडेत ६६ आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये एक अशी ‘शंभर’ अर्धशतके झळकावली आहेत.