देशातील विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायलयाने मोठा झटका दिला आहे.
नवी दिल्ली- देशातील विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशी पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायलयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलयाने विजय मल्ल्याला दोषी ठरवले असून १० जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
स्टेट बँकेसह अन्य बँकांनी एकत्र येऊन विजय मल्ल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डिएगो डीलमधून मिळालेले ४ कोटी डॉलर मल्ल्याने आपल्या मुलांच्या खात्यात वळवले असून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर अवमानाचा खटला चालवावा, अशी विनंती बँकांनी केली होती.
‘माझी २ हजार कोटींची संपत्ती बँकांनी जप्त केली आहे, माझ्याकडे आता पैसेच नाहीत, ती संपत्ती विकून त्यांनी कर्ज वसूल करावे, मी न्यायालयाचा अवमान केलेला नाही, सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी मी संपत्तीचे विवरण दिले होते, पण बँका समझोत्यासाठी तयारच नसल्याने विवरण योग्य की अयोग्य हा प्रश्नच येत नाही, असे मुद्दे मल्ल्या यांनी मांडले होते.
या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती ए. के. गोएल आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने विजय मल्ल्याला दोषी ठरवले. न्यायालयाची सहमती न घेताच आर्थिक व्यवहार करून त्याने न्यायालयाचा अवमान केला आहे, त्याने १० जुलैला न्यायालयात हजर राहावे, त्या दिवशी त्याला शिक्षा सुनावली जाईल, असे निर्देश त्यांनी दिले.