माघाची थंडी सरून वातावरणातला उष्मा हळूहळू वाढत असतो, वातावरणात बदलाचे संकेत परिसरातून मिळू लागलेले असतात, त्याचवेळी फाग पंचमी येते आणि शेवरी, सुरमाडाची झाडे होळी म्हणून गावोगावी उभी केली जातात. वाडयावाडयांमधून फाका घालायला सुरुवात होते. जसजशी फाल्गुन पौर्णिमा जवळ येते तसतसं वातावरण अजून बदलतं, हळूहळू संध्याकाळचा वारा वाहू लागतो, होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तर अनेक ठिकाणी छोटी-छोटी वावटळं येऊन त्याच्यासोबत परिसरातील पालापाचोळाही उडून जातो आणि मग घरातले वडीलधारे म्हणतात, ‘देवाच्या स्वागतासाठी वारा रस्ते झाडू लागलाय!’
निसर्गाची देवाच्या स्वागतासाठी ही जय्यत तयारी सुरू असतानाच भाविकही आपल्या स्वागताच्या तयारीत मग्न होतात. अचानक शांत असलेल्या रत्नागिरी शहरात गाडयांची, लोकांची गर्दी वाढते, पेट्रोल पंपापासून नाक्यावरच्या गादीवर मुंबईकर भेटू लागतात आणि मग भैरीबुवांच्या घरभेटीची चाहूल लागते. बारा वाडीतील घरे, वाडया, रस्ते झाडून स्वच्छ केले जातात, रांगोळया काढल्या जातात, फुलांची आरास भैरीबुवाच्या वाटेवर केली जाते आणि फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री ठीक बारा वाजता रत्नागिरीतील बारा वाडयांचा अधिपती, रखवालदार श्री देव भैरव अर्थात भैरीबुवा प्रजेची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मोठया दिमाखात पालखीतून बाहेर पडतो.
भेटीला आलेल्या टेंभ्ये, नाचणे, सडामि-या, जाकीमि-याच्या पालख्यांना भेट देतो. भैरीबुवा मंदिरातून बाहेर पडले की त्यांच्या स्वागतासाठी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये हजारोंच्या संख्येने जमलेले बारा वाडयांचे मानकरी, भक्तमंडळी ‘हुराऽरेऽऽ हुराऽऽऽ नि भैरीबुवाच्या पालखीला सोन्याचा तुरा रे होऽलिओ’चा गजर करतात आणि बारा वाडयांच्या शिमगोत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात होते.
मंदिरातून बाहेर पडलेल्या श्री देव भैरीची पालखी सर्वात प्रथम श्री देवी जोगेश्वरीच्या भेटीसाठी निघते. रात्री दीड वाजता जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी जाते. तेथे श्री देव भैरीची पालखी पहाटे तीन वाजेपर्यंत असते. त्यानंतर जोगेश्वरी देवीचा निरोप घेऊन भैरीबुवा ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडतात. मग बारा वाडयांतील ठरलेल्या मार्गावरून भैरीची पालखी मार्गक्रमण करते.
घरोघरी भेट देते आणि भक्तांच्या हुलप्यांचा स्वीकार करते. पौर्णिमेच्या दुस-या दिवशी धूलिवंदनाला भैरीची पालखी विविध ठिकाणाहून संध्याकाळी झाडगाव येथील सहाणेवर पोहोचते, तेथे मानाच्या घराजवळील तोडलेल्या सुरमाडाची होळी सहाणेसमोर उभी केली जाते आणि भैरीबुवा सहाणेवर विराजमान होतात. या सहाणेवर भैरीबुवा रंगपंचमीपर्यंत असतात. येथून ते घरभेटीसाठीही बाहेर पडतात. लांबहून येथे येणा-या प्रत्येक भक्ताची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी त्यांचा लोकदरबार येथे भरलेला असतो.
समाजातील प्रत्येक स्तरावरील भाविक येथे भैरीबुवाचं थेट दर्शन घेत असतो. पाच दिवसांनी रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी दुपारी १ वाजता श्री भैरीची पालखी सहाणेवरून निघते. विशेष म्हणजे या बारा वाडयांच्या सम्राटासमोर रत्नागिरीचे पोलीसही नतमस्तक होत शस्त्रसलामी देतात आणि भैरीबुवाचा मंदिरात परतीचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात नवलाई-पावणाई मंदिरात श्री देव भैरी त्यांच्या बहिणींची भेट घेतात, शहर पोलीस स्थानकाला भेट देतात, आणि रात्री बारा वाजता पालखी स्थानापन्न होऊन धुपारत, गावाचे गाऱ्हाणे होऊन रत्नागिरीच्या शिमगोत्सवाची सांगता होते.
रत्नागिरीकरांचे आराध्य असलेल्या या भैरीबुवांच्या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, पश्चिम किना-यावर गुजर व आंग्रे यांचे आरमारी प्राबल्य होते. सन १६८९ मध्ये संभाजी राजांच्या मृत्यूनंतर कान्होजी आंग्रे हा पश्चिम किना-यावर प्रमुख आरमारी सरदार होता. त्याचा मुलगा सेखोजी (सखाराम) हा १७३१ मध्ये रत्नागिरी किल्ल्यावर आरमार घेऊन आला. त्याच्यासोबत पाच गुजर कुटुंबे व्यापार-उदिमासाठी आली होती. त्यांनी रत्नागिरीत झाडगाव येथे श्री भैरी मंदिर बांधले. भैरी मंदिराच्या परिसरात असलेले काकासाहेब गुजरांचे घर या म्हणण्याला पुष्टी देते. सन १६८६ मध्ये आदिलशाही बुडाली व तेव्हापासून झाडगावचे सावंत खोत मंडळी स्थानिक सत्ताधारी असावी व त्यामुळेच ते भैरी देवस्थानचे प्रमुख सत्ताधारी व मानकरी होते.
काजरघाटीपासून बालेकिल्ल्यापर्यंतच्या हद्दीपर्यंत श्री देव भैरीची अधिसत्ता आहे. रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांतर्फे श्री भैरीबुवाला सलामी दिली जाते. सन १९१०ची एक घटना सांगितली जाते, त्याप्रमाणे तेव्हा ब्रिटिशांची राजवट होती. ढोल-ताशांच्या गजरात भैरीबुवाची होळी आणताना ब्रिटिश पोलीस अधीक्षकाने स्वत: येऊन सर्व वाद्ये बंद करण्यास सांगितले.
पंधरा मिनिटात ब्रिटिश अधिका-याचा घोडा जागच्या जागी दोन पायांवर उभा राहू लागला आणि अधिकारी घोडयावरून खाली पडला. त्याने भैरीबुवाची माफी मागितली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी श्री भैरीची पालखी शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येते. आजही ही प्रथा सुरू आहे. महिला पोलीस कर्मचारी ओटी भरतात, नारळ देतात व शहराच्या रक्षणाची विनंती करतात.
१९५० चा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट झाला व १९७६ मध्ये श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्ट निर्माण झाला. बारा वाडयांचे नागरिक आजही एकोप्याने भैरी देवस्थानचा कारभार चांगल्या प्रकारे करत आहेत. भैरीबुवाचे मंदिर दोन-अडीचशे वर्षांचे पुरातन असल्याने त्याचे छप्पर व खांब अत्यंत जीर्ण झाले होते. १९७८ मध्ये ट्रस्टने देवाचा कौलप्रसाद घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचे जुने लाकडी सामान गरजूंना मोफत वाटले. त्यात सात गरीब कुटुंबांची घरे उभी राहिली. मंदिराचा आहे तो ढाचा तसाच ठेवून नूतनीकरण करण्यात आले आहे.
श्री भैरी या मुख्य देवस्थानाची श्री जोगेश्वरी देवी व श्री नवलाई पावणाई देवी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. जोगेश्वरी देवीचे मंदिर झाडगाव येथील भैरीबुवाच्या सहाणेजवळ आहे. तसेच नवलाई पावणाईचे मंदिर जुन्या तांबट आळीमध्ये आहे. तृणबिंदूकेश्वर मंदिरात श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद प्रतिपदेपर्यंत संततधार असते.
श्री जोगेश्वरी मंदिरात श्री गणपती, विठलाई, रवळनाथ, वाघजाई, मानाई यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी मंदिराची रचना अर्धमंडप, सभामंडप, गाभारा अशी होती. जीर्णोद्धारानंतर सभागृह व गाभारा अशी रचना केली आहे. २००१ मध्ये मंडळाने रौप्यमहोत्सवी शिमगोत्सव साजरा केला आहे.
देवस्थानचा कारभार बारा वाडयांकडे आल्यानंतर या देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा देवस्थान विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष (कै.) अॅड. अरुअप्पा जोशी सांभाळत होते. तर आता व्यावसायिक रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे हा कारभार सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत बारा वाडयांतील मानकरी, ट्रस्टी, सदस्य खंबीरपणे उभे असून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणारा शिमगोत्सव मोठया आनंदाने साजरा होत आहे.