गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले रत्नागिरीचे सुधीर रिसबुड आणि राजापूरचे पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असलेले धनंजय मराठे या तिघांनी हे ‘आडवळणावरचं कोकण’ शोधताना कोकणातील सडय़ावरील कातळावरील अमूर्त, गूढ चित्रलिपी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच हा लेखाजोखा मालिकेतून ‘कोलाज’च्या वाचकांपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न..
मागील दोन लेखांत कातळ-खोद-शिल्प त्यांचा परिसर आणि सापडलेल्या कलाकृतींचे नमुने या सर्वांवर भाष्य केल्यानंतर काही ठळक मुद्दे आपल्या लक्षात येतात. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यात ४२ गावांत ६८ ठिकाणी सुमारे ६०० कातळ-खोद-शिल्पांचा भलाथोरला पट आपल्यासमोर आलेला आहे.
भव्य आकाराच्या पक्ष्यांच्या रचना, वास्तवातील आकाराशी सारखेपणा साधणा-या प्राण्यांच्या रचना, आकारांमधील वैविध्य असलेल्या मनुष्याकृती, अनाकलनीय भौमितिक रचना, अन्यत्र कुठेही न आढळणारे भव्य आकाराचे शिल्पपट (चित्रलिपीसारखी), धार्मिक विधीसाठी वापरत असावीत अशा रचना, अपवाद म्हणून काही प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या रचनांमध्ये आरपार दिसणारे तपशील, निसर्गनवलाईसोबत कोरलेल्या रचना. आढळलेल्या प्रत्येक ठिकाणांवरील किमान एक शिल्परचना जी पूर्णपणे वेगळी. हे सारे काही आपल्याला अचंबित करणारे असे आहे. कातळ-सडय़ाच्या पृष्ठभागाचा कॅनव्हास म्हणून वापर करून निर्माण केलेल्या या गूढ रचना माणसाच्या तर्काला आव्हान देणा-या आहेत.
मानवी जीवनाचा प्रदीर्घ इतिहासाचा कालखंड लक्षावधी वर्षाचा आहे. हा कालखंड ढोबळमानाने प्रागऐतिहासिक (प्राचीन) व ऐतिहासिक (अर्वाचीन) अशा दोन भागात विभागला जातो. प्रागऐतिहासिक कालखंडाचे पाषाण युग (StoneAge), ताम्रयुग (BronzeAge) आणि लोहयुग (IronAge) अशा तीन भागात विभागणी केली आहे. या युगांचा कालखंड जगाच्या वेगवेगळय़ा भागात वेगवेगळा आहे.
यातील अश्मयुगाचा कालखंड सर्वात मोठा आहे. या कालखंडाचेही प्राचीन अश्मयुग (Palaeolithic Age), मध्याश्मयुग (MesolithicAge) व नवाश्मयुग (Neolithic Age) असे तीन विभाग केले गेले आहेत. हा सर्व काळ लेखनविरहित होता. अश्मयुगातील मानव इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच रानटी अवस्थेत राहत होता.
कंदमुळे व जंगली प्राण्यांची शिकार यावर त्याचा उदरनिर्वाह चाले. अग्नी पेटवून त्याचा उपयोग करणे व दगडांपासून हत्यारे बनविणे त्याने साध्य केले. या काळात त्याला धातूचा शोध लागला नव्हता, म्हणून या कालखंडाला अश्मयुग असे म्हटले जाते. या काळातील त्याची हत्यारे ओबडधोबड व प्राथमिक अवस्थेतील होती. म्हणून याला जुने अश्मयुग व नंतरच्या सुधारित कालखंडाला नवे अश्मयुग असे म्हणतात.
या प्रागऐतिहासिक कालखंडात मानवाने आपल्या अस्तित्वाच्या खुणा गुहांच्या भिंतींवर, पाषाणांच्या बाजूंवर कोरल्या, रेखाटल्या किंवा रंगवल्या यालाच जगभरात रॉक आर्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते. जुन्या अश्मयुगात भारतात देखील मानवाची वस्ती होती. आदिमानवाचे अवशेष भारतात अनेक ठिकाणी सापडले आहेत.
मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे जगातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्राचीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा सर्वज्ञात आहेत. तसेच उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, केरळ इ. राज्यांमध्ये देखील प्रागऐतिहासिक कलेचा वारसा पाहावयास मिळतो. कोकणातही रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात, पालशेत या गावाजवळ झालेल्या उत्खननात अश्मयुगीन हत्यारे सापडल्याची नोंद आहे.
कोकणात आढळून येत असलेल्या पेट्रोग्लिफ्स तथा कातळ-खोद-शिल्पांचा निर्माता कोण? या निर्मितीमागे त्यांचा उद्देश काय? ही निर्मिती कोणत्या कालखंडातील आहे? शिल्पनिर्मितीसाठी कोणती हत्यारे निर्मात्याने वापरली असावी? असे प्रश्न व त्यातून निर्माण होणारे उपप्रश्न मनात उद्भवतात. काहींचा समज असा आहे की, या शिल्परचना गुराख्यांनी विरंगुळा म्हणून निर्मिल्या आहेत.
कोकणातील कातळ-सडय़ांचा सर्वात जवळचा संबंध असेल तर तो गायी, गुरे, शेळ्या-मेंढय़ा पाळणा-या, चरावयास नेण्याचा व्यवसाय करणाया व्यक्तींचा, यांना गुराखी किंवा जांगळी असे संबोधले जाते, गुराख्यांशी कातळ-सडय़ांच्या असलेल्या सलगीतून असा समज निर्माण झाला असावा. परंतु, गुराख्यांची जीवनशैली, सडय़ांची भौगोलिक ठेवण, त्यावर गुरे चरावयाची पद्धती व एकंदर शिल्परचना, त्या निर्मितीसाठी लागलेला दीर्घ कालावधी, शिल्परचनांची व्यापकता मोठय़ा भूप्रदेशावर शिल्परचनांचे असलेले अस्तित्व, इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करता या शिल्परचना गुराख्यांनी विरंगुळा म्हणून काढल्या असाव्यात असे मानता येणार नाही.
आणखी, एक समज असा आढळतो की, या रचना पांडवकालीन किंवा पांडवनिर्मित आहेत. ज्या गोष्टींमध्ये गूढता, भव्यता असते व त्याची निर्मिती कोणी केली हे ज्ञात नसते अशा गोष्टी पांडवांनी निर्मिल्या आहेत असा सार्वत्रिक समज असतो. या गोष्टीलाही गूढतेने व अगम्यतेने भरलेली कातळशिल्पे अपवाद कशी असतील. जी गोष्ट पिढय़ान्पिढय़ा वर्षानुवर्षे माहिती नाही, ती पांडवनिर्मित असे म्हटले जाते. यातील भावार्थ लक्षात घेतला तर या शिल्प-रचना अतिप्राचीन आहेत याची खात्रीच होते.
दीर्घकालीन चालत आलेल्या समजुती साधार असतात असे मानले तरीही महाभारतात मयसभेचा उल्लेख आहे, जी विश्वकर्माची अप्रतिम जादूई कलाकृती होती. भीमाचा लोखंडी पुतळा धृतराष्ट्रासमोर आणला गेला हा उल्लेखही महाभारतात आहे, यावरून पांडवकाली कला व शिल्पकला खूपच विकसित झाली होती हेच दिसून येते. कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात, आढळलेल्या सर्व शिल्परचना (आडव्या कातळावरील खोदलेली चित्रे) प्राथमिक अवस्थेतील आहेत. त्यामुळे त्या शिल्परचना पांडवकालीन आहेत असे मानता येणार नाही.
या संदर्भातील काही आख्यायिकाही आपली करमणूक करतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने या आख्यायिका शिल्परचनांभोवती रचल्या गेल्या असाव्यात असे प्रथमदर्शनी वाटते. पण या कथांमधील आशयाकडे बघितले तर या कथांमध्ये व शिल्परचनांमध्ये काहीतरी संबंध आहे असे लक्षात येते. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण दिशेस असणा-या काही शिल्परचनांभोवती प्राण्यांशी संबंधित आख्यायिका आढळून येतात उदा.
रेडा व वाघ यांची झुंज तसेच त्या भागातील शिल्परचनांमध्ये प्राणीरचनांचे अधिक असणारे प्रमाण. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेला राजापूर तालुका हा दुर्गम, वनाच्छादित प्रकारात मोडणारा स्वाभाविक प्रदेश आहे. या प्रदेशात वन्य प्राण्यांची रेलचेल अधिक होती व आहे. त्याचेच प्रतिबिंब शिल्परचनांमध्ये दिसून येते असे वाटते. मात्र, शिल्परचनांमध्ये दिसून येणारे काही प्राण्यांचे अस्तित्व या प्रदेशात सध्या नाही. मग ते प्राणी, शिल्परचना ज्या कालावधीत निर्माण केल्या, त्यावेळी या प्रदेशात अस्तित्वात होते व त्या सर्वांचे प्रतिबिंब तेथील शिल्परचनांमध्ये दिसते असे वाटते.
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडे असणा-या शिल्परचनांभोवती जमिनीशी संबंधित आख्यायिका समोर येतात. या भागात आढळणा-या काही शिल्परचनांभोवती असलेल्या आख्यायिकेतून एखादी गोष्ट जमिनीत गाडली गेली असल्याचे संकेत मिळतात. उदा. वऱ्हाड कातळात बुडाले. कोकणातील सडे कातळांनी बनलेले आहेत. दगडात एखादी गोष्ट गाडली कशी जाईल? या प्रश्नाने लक्ष वेधते ते भूरचनेकडे.
प्राथमिक माहितीत एक गोष्ट पुढे आली ती, या परिसरातील कातळ, इतर ठिकाणी आढळणा-या कातळापेक्षा नरम, मऊ आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणजे या परिसरात चि-यांच्या खाणींचे प्रमाण खूपच कमी आहे. बरोबर याच भागात असणा-या शिल्परचनांभोवती, जमिनीत गाडले जाण्याचा संकेत देणा-या आख्यायिका आढळून येतात. शिल्परचना निर्माण करणा-यांना उत्तरेकडील सडाकातळ नरम, मऊ आहे ही गोष्ट माहिती होती का? दगडांच्या जडणघडणीच्या कोणत्या टप्प्यात या शिल्परचना निर्माण केल्या गेल्या? त्यावेळी असलेली भूरचना, प्राणीसंपदा यामुळे त्याविषयाशी निगडित आख्यायिका निर्माण झाल्या असाव्यात. याबाबत ठोस उत्तर सध्या नाही. मात्र, आख्यायिकांमधील गर्भितार्थ शिल्परचनांचा कालावधी दर्शवितो का यावर अभ्यास होणे आवश्यक आहे.
कातळ-खोद-शिल्पाविषयी यापूर्वी विविध तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या लिखाणातून काही संदर्भ समोर येतात. अशा काही संदर्भांमध्ये, या प्राचीन खुणा, दिशांचे अथवा मार्गांचे दिशादर्शन करण्यासाठी निर्माण केल्या गेल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त झालेला दिसतो. परंतु, मार्ग म्हटला की तो ब-याच वेळा व्यापाराशी किंवा एका प्रदेशाचा दुस-या प्रदेशाशी संपर्क करण्यासाठी संबंधित असतो. इतिहासकालीन मार्गांचा विचार करता समुद्रामार्गे कोकण किनारा व तेथून पूर्वेकडे सह्याद्री पल्याड असे काही मार्ग असावेत. शिल्परचनांची ठिकाणे पाहता, या ठिकाणांची दिशा पूर्व-पश्चिम अशी नसून उत्तर-दक्षिण आहे असे लक्षात येते, म्हणजेच पूर्व-पश्चिम मार्गांशी या शिल्परचनांचा संबंध दिसून येत नाही.
दुसरे मार्ग म्हणजे उत्तर-दक्षिण प्रवासाचे. अशा मार्गांशी या शिल्परचना संबंधित आहेत का, याबाबत विचार करता असे दिसते की, आढळलेल्या कातळ-खोद-शिल्पांची ठिकाणे दक्षिणोत्तर असली तरी सलग दोन ठिकाणांच्या पूर्व-पश्चिम अंतरात फारच तफावत आहे. सध्याच्या मापन व्यवस्थेप्रमाणे सलग दोन ठिकाणांमधील सरळ रेषेतील पूर्व-पश्चिम अंतर अर्धा कि.मी.पासून तब्बल पंचवीस कि.मी. आहे.
तसेच ही ठिकाणे एका सरळ दिशेशी ठरावीक अंतराने नाहीत त्याऐवजी अशा ठिकाणांचे एकत्रित समूह आढळून येतात. उदा. बारसूच्या शिल्परचना ज्या सडय़ांवर आहेत त्या सडय़ांच्या सर्व अंगाला वेगवेगळ्या ठिकाणी शिल्परचनांचे समूह आढळतात. तसेच शिल्परचनांमध्ये दिशेशी संबंधित अथवा एखाद्या ठरावीक दिशेने कोरलेल्या शिल्परचना आढळून येत नाहीत. त्यामुळे या शिल्परचना मार्ग अथवा दिशादर्शक असाव्यात असे मानता येणार नाही असे वाटते.
या ठिकाणांचे भौगोलिक स्थान, गावाच्या सीमा, गावा गावांना जोडणा-या पायवाटा, घोडेबाव, पार यांचे समीप आहे असा आणि एक समज. आढळलेल्या जवळपास ६८ ठिकाणांपैकी फक्त निवळी, देवीहसोळसारख्या एक-दोन ठिकाणी शिल्परचनांच्या जवळपास घोडेबाव दिसून येते. त्यामुळे घोडेबावच्या शेजारी शिल्परचना आहेत हा निव्वळ योगायोगाचाच भाग असावा.
कोकणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर, गावांची रचना टेकडय़ांच्या कुशीत म्हणजेच एका गावातून दुस-या गावात जायचे झाले तर टेकडी चढून आल्यावर सडय़ावरच्या पायवाटेने दुस-या गावात म्हणजे टेकडीच्या दुस-या अंगाच्या कुशीतील गावात पोहोचायचे. कातळ-शिल्पांची सर्वच्या सर्व ठिकाणे अशाच सडय़ावर आहेत. सडय़ावरील हा प्रवास दिशा भ्रमित करणारा असतो. एखादे उंच झाड, लहानसा उंचवटा या एवढय़ाच काय त्या मार्गदर्शनाच्या खुणा. अशा या निर्मनुष्य पायवाटा अनेक श्रध्दा, अंधश्रध्दा जन्माला घालणा-या असतात.
अपवाद सोडल्यास या कातळ-शिल्पांचा समावेश त्या पायवाटा किंवा श्रध्दा/अंधश्रध्दा यामध्ये होत नाही. पाच/दहा गावातील ठिकाणे सोडल्यास अशा पायवाटांशी कातळ-शिल्पांचा थेट संबंधही आढळून येत नाही.
एकंदर शिल्परचनांचे भौगोलिक स्थान गाववस्तीपासून दूर मोकळ्या सडय़ांवर आहे या स्थानांचा व गावांच्या सीमांचा संबंध असावा का तसेच श्रध्दा, अंधश्रध्दा व गावाच्या सीमा यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे का, हे पडताळण्यासाठी कोकणातील ग्राम व्यवस्थेतील काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात. कोकणातील गाव ही संकल्पना गावठाणासारखी नाही. डोंगराच्या कुशीत चार-दोन वाडय़ा किंवा पाडे, त्यातल्या त्यात आर्थिक संपन्न व्यक्तींची एक-दोन मोठी घरे, पण, हे सर्व विखुरलेल्या अवस्थेत. गावाची एकंदर लोकसंख्या २००/४०० पेक्षा अधिक नाही.
काळाच्या ओघात काही गावांचा विस्तार वाढला आहे; पण अशी गावे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत. गावातील लोकवस्ती जिथे संपते तिथे गाव संपते अशी रचना. अशा या गावांची व्यवहाराच्या सोईच्या दृष्टीने सीमांची निश्चिती झाली ती इ. स. १८६० ते १८८० च्या दरम्यान. या सीमांसाठी बुरूज, ऐरणी घातल्या गेल्या. काही शल्परचना या बुरुजांच्या खाली गेलेल्या आढळतात तर काही ठिकाणी शिल्परचना बुरुजांना खेटून असल्याचे दिसून येते. पण, अनेक ठिकाणी या आखलेल्या सीमांच्या जवळपास देखील शिल्परचना आढळून येत नाहीत. यावरून शिल्परचना गावांच्या सीमेवर आढळून येतात असे म्हणण्याऐवजी गावाच्या लोकवस्तीपासून दूर सडय़ांवर आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल, असे वाटते.
हे झाले थोडेसे शिल्परचनांच्या बाबतीतील समज. असे म्हटले जाते की, प्रत्येक कालात्मक आविष्कार म्हणजे कलावंताने जीवनावर केलेले भाष्य ठरते. जीवनाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निरीक्षण करून केलेले असते. मग त्या आविष्काराची सौंदर्यदृष्टय़ा प्रतवारी कोणतीही असो. या अंगाने विचार करून शिल्परचनेतील उद्देशांचा विचार करता शिल्परचनेत आढळून आलेल्या मनुष्यप्राण्यांसकट सर्व प्राणी, पक्षी, जलचर यांच्या आकृत्या चिन्हांकित रेखाकृतीच्या स्वरूपात आहेत. त्यांचे रेखाटन प्राथमिक अवस्थेत आहे. या रचनांमध्ये सौंदर्याचा अभाव जाणवतो. तसेच शिल्परचनांमध्ये आढळून येत असलेला आणि एक प्रकार म्हणजे सांकेतिक चिन्हांची यामध्येही नाजूक नक्षीकाम आढळून येत नाही.
अशा या वेगवेगळ्या शिल्परचनांचे समूह विविध ठिकाणी पाहावयास मिळतात. या समूहातून शिल्पकर्त्यांला सौंदर्यपूर्ण कलात्मक गोष्टींचा आविष्कार घडवायचा उद्देश दिसत नाही. तसेच यातून एखादा तात्कालीन प्रसंग अथवा संस्कृती दर्शनाचा उद्देश असावा अशी जाणीव होत नाही. मग याची निर्मिती करण्यासाठी नक्की उद्देश कोणता ? यातून विधी किंवा तत्सम धार्मिक दृष्टिकोनातून याची निर्मिती करण्यात आली असावी का?
आदिमानवाचे जीवन अत्यंत खडतर व असुरक्षित होते. शिकार निश्चितपणे मिळेल याची शाश्वती नव्हती.
चित्र स्वरूपात प्राणी काढून त्यावर जादूटोण्याचा उपचार केला तर प्रत्यक्षात तसे घडते अशी त्याची श्रद्धा होती. मूळ वस्तू व तिची प्रतिमा या दोन्हीत फरक नाही असा आदिमानवाचा विभास होता. तसेच प्राणी खूप जन्मावेत, त्याची शिकार आपल्याला मिळावी व मारलेल्या प्राण्यांचे आत्मे संतप्त न होता त्यांचे सांत्वन व्हावे या विविध कारणांसाठी ही चित्रे काढली जात, असा एक तर्क आहे.
मानवाच्या प्रगतीच्या टप्प्यात माणसाच्या ऐहिक व आधिदैविक दृष्टिकोनामुळे त्याची कला अधिकाधिक प्रतीकात्मक व भौमितिक स्वरूपाची होऊ लागली. कोकणात आढळणा-या शिल्परचनांमध्ये या सा-याचे प्रतिबिंब दिसून येते का?
कोकणात आढळणा-या शिल्परचना या वेगवेगळय़ा कालखंडात कोरण्यात आल्या आहेत का? कोकणात सडय़ांवर व सडय़ांच्या कुशीत शेकडो मैल परिसरात अशी कोणती प्राचीन संस्कृती नांदत असावी? ती मानव जमात तेथे कोठून आली हा सुद्धा अभ्यासाचा विषय ठरेल. या संस्कृतीत ठिकठिकाणी पसरलेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या कलाकारांनी त्यांचे भोवतालचे वातावरण, समजुती व निरीक्षण यावर आधारित उपलब्ध तत्कालीन हत्यारांचे आधारित सडय़ांवर मोठय़ा प्रमाणात शिल्परचना खोदून पुढील अनेक संस्कृत्यांसाठी नकळत स्वत:च्या अस्तित्वाचे ठसे कोरून ठेवले असावेत असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
शिल्परचनांमधील वैविध्य, त्यांची ठिकाणे, त्यांचेबद्दल असलेले समज, आख्यायिकेतून डोकावणारा कालावधी व मिळालेले संदर्भ यातून या शिल्परचनांचा कालावधी निश्चितपणे सांगता येणार नाही. कालावधी समजून घेण्यासाठी कोकणात अन्यत्र आढळलेल्या ठिकाणांबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाचा मागोवा घेणे आवश्यक वाटते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील शिल्परचना नवाश्मयुगीन आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर गोवा येथील शिल्परचना अश्मयुगातील असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या दोन्ही ठिकाणी आढळलेल्या शिल्परचना या जांभ्या कातळातच कोरलेल्या असून त्या शिल्परचना व रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेल्या शिल्परचना निर्मितीच्या पद्धतीत प्रथमदर्शनी सारखेपणा जाणवतो.
त्यामुळे रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांमध्ये आढळून आलेल्या सर्व शिल्परचनांचा कालखंडही तोच असावा का? मात्र कालखंड ठरवणे हा विषय तज्ज्ञ संशोधकांचा आहे, त्यावरील त्यांचे भाष्य अधिकृत ठरेल. भारतात अन्यत्र आढळणा-या अशा प्रकारच्या शिल्परचनांपेक्षा कोकणात आढळणा-या शिल्परचनांची शैली भिन्न आहे असे वाटते.
इंटरनेटवरील माहितीच्या आधारे भारत देशाबाहेरील ऑस्ट्रेलिया, पोतुर्गाल, इजिप्त इ. ठिकाणी असलेल्या अशा प्रकारच्या शिल्परचना व कोकणातील आढळून आलेली कातळ-खोद-शिल्पांच्या शैलीमध्ये खूप सारखेपणा जाणवतो. परदेशातील अशा प्रकारच्या रचना व कोकणातील रचना यात काही संबंध आहे का? त्या चित्रांचा कालखंड व कोकणातील चित्रांचा कालखंड हा एकच आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
या सर्वांपलीकडे जाऊन, या वळणाने आम्हाला एका वेगळ्या ठिकाणी प्रवास घडवला व याठिकाणी असलेल्या वेगळेपणाचा शोध घेण्यास लावले. पृथ्वीच्या विराट देहात प्रचंड चुंबक शक्ती आहे. ही चुंबक शक्ती साधारणपणे उत्तर-दक्षिण अशी पसरलेली आहे. या चुंबक शक्तीचा चराचरावर परिणाम होत असतो. परंतु ही चुंबक शक्ती व त्याची गती आपणाला प्रत्यक्ष दिसत नाही, तसेच जाणवत देखील नाही.
चुंबकीय उपकरणांच्या मदतीने ही शक्ती उपकरणांमध्ये दर्शविणा-या फेरबदलातून आपण अनुभवू शकतो. पृथ्वीच्या आकाराच्या तुलनेत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच ठिकाणी अशी ठिकाणे आहेत. त्यापैकी देवाचे गोठणे येथील सडय़ावरील एक ठिकाण. अद्यापपर्यत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दर्शविणारे भारतातील हे पहिलेच ठिकाण. येथे होकायंत्रातील चुंबक सुईचे विस्थापन फार मोठय़ा प्रमाणात होते.
होकायंत्राच्या ठेवण्याच्या जागेत बदल झाला की सुई अस्थिर होते असे हे ठिकाण. बरोबर याच ठिकाणी एक कातळ-खोद-शिल्प आढळते. ही एक मनुष्याकृती असून त्याची निर्मिती कोणी केली? निर्मात्याला या परिसरातील चुंबकीय शक्तीची जाणीव होती का? कोकण प्रांतात फक्त याच ठिकाणी तेही लहान भागात चुंबकीय शक्तीचे दृश्य स्वरूप का अनुभवास मिळते? मात्र अशा अद्भुत ठिकाणाचा शोध आमच्या शोध प्रवासात लागला हे आमचे भाग्यच.
कोकणातील आडवळणावरील आमचा ‘कातळ-खोद-शिल्प’ शोध प्रवास अजूनही चालू आहे. नवनवीन ठिकाणे, संदर्भ समोर येत आहेत. समोर येणारे प्रत्येक ठिकाण एक नवीन कोडे जन्माला घालत आहे. आमच्या आजपयर्ंतच्या शोध प्रवासातून आमच्या अल्पमतीस जे जाणवले, जे अनुभवास मिळाले ते मांडण्याचा हा लहानसा प्रयत्न. कोकणातील वळणांना शोभेसा असा हा कातळ-खोद-शिल्पांचा शोध प्रवास अनेक अनुत्तरीत प्रश्नांमुळे गूढतेने व अगम्यतेने भरलेला आहे.
तज्ज्ञांना व अभ्यासकांना या शिल्परचनांचा कालखंड व उद्देश शोधण्याचे मोठे आव्हानच आमच्या शोधमोहिमेने निर्माण केले आहे तसेच आगळ्या वेगळ्या गोष्टी, ठिकाणे पाहण्याचा छंद असलेल्या पर्यटकांसाठी / अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच आहे यात तिळमात्र शंका नाही.