मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
मुंबई- मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सकाळी कडक उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची ताराबंळ उडाली.
मुंबईतील दादर,परळ, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली तसेच कुर्ला आणि ठाणे, डोंबिवली, कल्याण भागात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली.
मुंबईबरोबरच महाराष्ट्रातही दमदार पाऊस सुरु आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दापोलीत काही महत्त्वाचे मार्ग पावसामुळे ठप्प झाले आहेत. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.