थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाने ठाणे, रायगड पालघर जिल्ह्याला झोडपले. शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले.
ठाणे- थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसाने ठाणे, रायगड पालघर जिल्ह्याला झोडपले. शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे रेल्वेच्या उपनगरीय सेवेवरही परिणाम झाला. ठाणे स्थानकात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. तर ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर पाणी साचल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. या पावासामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाल्याने रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमध्ये पाणी साचले
कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण शहराबरोबरच ग्रामीण भागालाही झोडपले. रविवारी सुटी असल्याने कल्याण स्थानकात चाकरमान्यांची गर्दी नव्हती. सकाळी पावसाचा जोर मोठा असल्याने बाजारपेठ, रेल्वेस्थानक परिसरात पाणी साचले.
बिर्ला कॉलेज परिसरातही पाणी साचले. कल्याणातील शिवाजी चौक, बैलबाजार, आग्रा रोड, घोडे खोत आळी-दक्षिण मुखी मारुतीसह खाडीकिनारी असलेल्या गोिवदवाडी परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. शहाड गावात सखल भागात पाणी साचले. पावसामुळे गांधारी, उल्हास, काळू या नद्या भरून वाहत आहेत. भिवंडीतील इमारत कोसळण्याच्या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आपत्कालीन पथकातले अधिकारी, कर्मचारी हे मदत कामासाठी भिवंडीत गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेत मुख्य आपत्कालीन सेवा केंद्रात माहिती देण्यास कुणीच उपलब्ध नव्हते.
शहराच्या मुख्य भागातील रस्त्यांवर खड्डयांमुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना रहिवाशांना कसरत करावी लागत होती. जलमय रस्त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. लालचौकी, सहजानंद चौक, दुर्गाडीकिल्ला, वाडेघर येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. तर रिक्षाचालकांनीही प्रवाशांना इच्छीत ठिकाणी जाण्यास नकार दिल्याचे चित्र असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
भाजीपाल्याचे टेम्पोही दाखल न झाल्याने शहरात पुरेसा भाजीपाला पोहचला नाही. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूलमार्केटचा भाग पाण्याखाली गेला होता. अग्निशमन दलाचे कर्मचा-यांना आपत्काळासाठी कार्यालयात सतर्क राहाण्याचे निर्देश देण्यात आले होते. कल्याणच्या खाडीला भरती आल्याने पत्रीपूल भागातील नाला, जरीमरी नाला, कल्याण पूर्वेतील नाला, विठ्ठलवाडी नालेही भरून वाहत होते. त्यामुळे नाल्यालगत राहाणारे रहिवासी भीतीच्या सावटाखाली होते.
कल्याण पत्रीपूल,डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे लोहमार्गापर्यंत पाणी साचले होते. गोिवदवाडी, रेतीबंदर भागातील म्हशींच्या तबेल्यापर्यंत पाणी साचले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गणेश घाट, वाडेघरजवळील, साठेनगर भागात सकाळी पाण्याचा धोका निर्माण झाल्याने रहिवासी धास्तावले आहेत. पोलीस, अग्निशमन यंत्रणा, महापालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे या विभागांकडून कळवण्यात आले.