मुंबई व उपनगराला मंगळवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच रेल्वे रुळावर पाणी तुंबल्याने नेहमी धावणा-या मुंबईचा वेग मंदावला. काही ठिकाणी तर मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. असंख्य मुंबईकरांचे फार मोठे हाल झाले. ठिकठिकाणचे रस्ते नद्यांच्या पुराप्रमाणे वाहू लागल्याने गुडघ्याच्याही वर गेलेल्या पाण्यातून कशीबशी वाट काढत मुंबईकरांना प्रवास करावा लागला. रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबल्याने मुंबईची ही जीवनवाहिनी ठप्प झाली.
मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरील काही ठिकाणी रेल्वे वाहतूक बंद करावी लागली तर काही ठिकाणी अत्यंत धीम्या गतीने रेल्वे वाहतूक चालू ठेवावी लागली. रस्ते रेल्वे वाहतुकीप्रमाणेच विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी वादळी वा-याने झाडे उन्मळून पडली. मंगळवारच्या या अतिवृष्टीमुळे मुंबईकरांना २६ जुलै २००५ च्या महापुराच्या तांडवाची आणि निसर्गाच्या प्रकोपाची आठवण झाली. तशी अवस्था मंगळवारच्या अतिवृष्टीत झाली नसली तरीही २६ जुलै २००५ च्या महापुराचा तांडव अनुभवलेल्या मुंबईकरांना अतिवृष्टी सुरू झाली की त्यावेळच्या परिस्थिती भयावह आठवण होते.
तत्पूर्वी मुंबईत अतिवृष्टी अगर मुसळधार पावसाने लोकल बंद पडणे याची सवय झाली होती. मुंबईत पाणी तुंबून ५-६ तास उशिराने का होईना मुंबईकर घरी पोहोचत होते. मात्र २६जुलैच्या पावसाच्या तांडवात मुंबईकर घरी पोहोचू शकले नव्हते. म्हणूनच मंगळवारसारखी अतिवृष्टी होऊ लागली की, मुंबईकरांना २६ जुलै आठवतो आणि काळजात धडकी भरते. गेल्या ११ वर्षात तशी भयावह परिस्थिती उद्भवली नसली तरीही मुंबईकरांच्या मनातील त्या महापुराची भीती अद्याप दूर झालेली नाही. याचे कारण मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तरीही काही ठरावीक भागातील रस्त्यावर व रेल्वे मार्गावर पाणी तुंबून वाहतूक ठप्प होते. २६ जुलैनंतर मुंबईकरांचे अतिवृष्टीत पाणी तुंबून हाल होऊ नयेत म्हणून निश्चित स्वरूपाची ठोस उपाययोजना दुर्दैवाने करण्यात आलेली नाही.
दरवर्षी पावसाळय़ापूर्वी गटारे, नद्या, नाले साफ करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. उत्तम प्रकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करून पुरस्थितीत जनतेचे हाल होऊ नयेत म्हणून उपाययोजना केल्याचे राज्यकर्ते आणि बीएमसीमधील सत्ताधारी सांगत असतात. परंतु, पावसाळय़ात थोडी जरी अतिवृष्टी झाली तरी गटारे, रस्ते तुंबून होणारे हाल काय थांबले नाहीत. वाहतूक ठप्प होणे तसेच करोडे रुपयांचे आर्थिक नुकसान होणे यात काहीही फरक पडलेला नाही. गटारे, रस्ते पावसाळय़ात पाण्याने तुंबू नयेत म्हणून २६ जुलै २००५ नंतरच्या महापुरानंतर काही ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली. ती कार्यान्वित असल्याचे राज्यकर्ते व बीएमसीतील सत्ताधारी सांगत असतात. पण त्याचा हवा तसा उपयोग होत असल्याचे दिसत नाही.
मुंबईतील गटारे तुंबून रस्त्यावर पाणी तुंबण्याचे प्रकार काही थांबले नाहीत. शहराचे अति काँक्रिटीकरण, नियम आणि कायदे धाब्यावर बसवून होत असलेली अतिक्रमणे थांबली नाहीत. मुंबईतील मिठी, पोईसर, दहिसर व ओशिवरा या चार नद्यांची अवस्था आजही नाल्यासारखीच आहे. अतिक्रमण आणि प्लास्टिकच्या व अन्य कच-यांमुळे ठिकठिकाणी गटारे तुंबतात आणि पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे थोडय़ा पावसानेही रस्त्यावर पाणी तुंबते. वाहतूक व जनजीवन विस्कळीत होऊन ठप्प होते. ही दुस्थिती कायमचीच आहे.
मंगळवारी सरासरी १५० मिमी पाऊस पडून मुंबईत हाहाकार उडाला. मुंबापुरीची तुंबापुरी बनली. मुंबईची तुंबईची झाली. पावसाचे तांडव, अतिवृष्टी व निसर्गाच्या प्रकोपापुढे काय करणार? अशी उरबडवी भाषा आणि तात्पुरती वेळ मारून नेणारी घोषणाबाजी सत्ताधारी राज्यकर्ते नेहमीच करत असतात. मात्र पाऊस ओसरला की ते विसरतात. मात्र दरवर्षी येणारी ही दुस्थिती बदलण्यासाठी काही कायमस्वरूपी दुरदृष्टीची, सर्वाधिक प्राधान्याने ठोस उपाययोजनेच्या दृष्टीने कृती होत नाही. राज्यकर्त्यांची तशी मानसिकताच नाही. सोशिक मुंबईकर हे आणखी किती दिवस सहन करणार. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून या शहराची ख्याती आहे. परंतु हे शहर ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जेदार शहर व्हावे याकडे कुठच्याही राज्यकर्त्यांने आतापर्यंत गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना मुंबईचे शांघाय अगर सिंगापूर करू अश वल्गना सातत्याने केल्या जात होत्या. परंतु काही नागरी सुविधा वगळता या शहराच्या आंतरराष्ट्रीय दर्जात सुधारणा घडण्याच्या दृष्टीने काही घडले नाही. अन् मुंबईकरांच्या दुस्थितीत बदल झालेला नाही. आता केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई मनपावर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. भाजप सेनेच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणे मुंबईचे शांघाय, सिंगापूर करू ही भाषा आता बदलली असून ते मुंबईला स्मार्ट शहर बनवू. मुंबईचा विकास सेंट पिटर्स बर्ग, तेल अवीवच्या धर्तीवर करू अशी भाषा करत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने मेट्रोचे जाळे उभारण्यास प्राधान्यक्रमाने प्रारंभ चालविला आहे,पर्जन्य जलवाहिनीची कामे मार्गी लावणे व अन्य काही प्रकल्पांची कामे चालू केली आहेत. मात्र ती कामे फारच संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबईकरांचे हाल काही सुसह्य होतील अशी अपेक्षा बाळगणे गैर ठरेल.
मुंबईकर दहशतवादी हल्ले, दंगली, अपघात तसेच दरवर्षी पावसाळय़ात अतिवृष्टीने पाणी तुंबून होणारे हाल सहन करत जीवन जगत असतात. मुंबईकरांच्या व मुंबईच्या जीवावर राज्यकर्ते नेहमीच स्वत:च्या तुंबडय़ा भरत आलेले आहेत. देशाच्या तिजोरीत कर रूपाने कोटय़वधी रुपयांचा निधी देणा-या मुंबई शहराच्या सर्वागीण विकासाकडे केंद्र सरकारने द्यावे तसे लक्ष दिले नाही. दरवर्षी पावसाळय़ापूर्वी कोटय़वधी रुपये खर्च करून गटारे व नद्या, नाले साफ करण्याचे काम केले जाते. परंतु, मुंबईची तुंबई न होण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. मुंबईत अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी तुंबण्याला मुंबईच्या भौगोलिक स्थितीचे कारण पुढे केले जाते. सात बेटांच्या समुदायांचे बनलेल्या या शहरातील अतिवृष्टीत तुंबणारे पाणी समुद्रात निचरा होण्यामागची अडचण पुढे केली जाते. म्हणूनच या दृष्टीने जपानमधील टोकियो या शहरातील पुराच्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यासाठी तेथील सरकारने केलेल्या मेट्रोपॉलिटन एरिया आऊटर इंडर ग्राऊंड डिस्चार्ज चॅनलसारख्या योजनांचा विचार करावा लागेला.
टोकियातील भौगोलिक परिस्थिती मुंबईपेक्षाही बिकट आहे. जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचे हे शहर आहे. त्या शहरातून अनेक नद्या वाहतात. याठिकाणी पावसाचे प्रमाणही अति आहे. त्यामुळे ते शहर अतिवृष्टीत पाण्याखाली जात असे. परंतु तेथील सरकारने आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे नुसती कारणे देत न बसता आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरून ठोस अशी उपाययोजन केली, त्यामुळे टोकियो शहराची पुराच्या पाण्यामुळे होणारी अवस्था आता काही काळातच थांबवता येऊ लागली आहे. आपले राज्यकर्ते तशा प्रकारची कायमस्वरूपी ठोस कृ ती का करत नाहीत?