येत्या चार तासात मुंबईसह डहाणू आणि अलिबागमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबई- सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अजुनच वाढला आहे. येत्या चार तासात मुंबईसह डहाणू आणि अलिबागमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आवश्यकता नसेल तर घरा बाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस आणि महापालिकेतर्फे मुंबईकरांना करण्यात आले आहे.
पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या चार तासात मुंबई शहर आणि उपनगरासहीत अलिबाग, डहाणू आणि भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. तर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातही अतिवृष्टी होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईतील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊनच सरकारी कार्यालयातील कर्मचा-यांना दुपारी २.३० वाजताच घरी सोडण्यात आले आहे. तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.