हृदय प्रत्यारोपण करून आतापर्यंत डॉक्टरांनी हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या ब-याच रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
मुंबई- हृदय प्रत्यारोपण करून आतापर्यंत डॉक्टरांनी हृदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या ब-याच रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. मात्र पहिल्यांदाच या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे एका डॉक्टरचे प्राण वाचले आहेत.
वांद्रे ते मुलुंड असा पुन्हा एकदा ग्रीन कॉरिडोर तयार करून हृदय निकामी झालेल्या शहापूर येथील ५५ वर्षीय डॉक्टरला हृदय बसवून जीवदान दिले आहे. मागील वर्षभरात मुंबईत हृदय प्रत्यारोपणामुळे २१ जणांना नव्याने आयुष्य लाभले आहे.
खार येथे राहणा-या ३२ वर्षीय मुलाचा अपघात झाल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केले. डॉक्टरांनी त्याच्या नातेवाइकांकडे अवयवदान करण्याची परवानगी मागितली.
समाजात अवयवदानासंदर्भात सुरू असलेली जनजागृती पाहता अशा व्यक्तीचे अवयव गरजू व्यक्तीला जीवदान ठरू शकते. या विचाराने त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. नातेवाइकांच्या परवानगीनंतर ७ जुलै रोजी हृदय, यकृत, मूत्रपिंड व कॉर्निया दान करण्यात आले. यकृत ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यात आले. तर एक मूत्रपिंड हिरानंदानी रुग्णालयातील ४१ वर्षाच्या पुरुषाला तर दुसरे मूत्रपिंड लीलावती रुग्णालयातील एका महिलेला दान करण्यात आले.
हृदय मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात देण्यात आले. त्यासाठी लीलावती ते फोर्टिस असा ग्रीन कॉरिडोर तयार करून २४ किलोमीटर अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरना मुलाचे हृदय बसवून जीवदान दिले.
सध्या त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.