हाजीअली दर्ग्याकडे जाणा-या मार्गावरच अनधिकृत दुकानांचा विळखा पडल्यामुळे दर्ग्याचा कोंडलेला श्वास बुधवारी मोकळा झाला.
मुंबई- हाजीअली दर्ग्याकडे जाणा-या मार्गावरच अनधिकृत दुकानांचा विळखा पडल्यामुळे दर्ग्याचा कोंडलेला श्वास बुधवारी मोकळा झाला. या मार्गावरील सुमारे ७० ते ८० अनधिकृत दुकानांवर महापालिका व जिल्हाधिकारी यांनी संयुक्त कारवाई करत दर्ग्याचा मार्ग मोकळा केला.
तब्बल ७५ अनधिकृत दुकाने व अतिक्रमणे हटवण्यात आली असून पाच दुकानांनी न्यायायलातून स्थगिती आणल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे.
हाजीअली दर्ग्याच्या मार्गावर उभी राहिलेली सुमारे ८० अनधिकृत दुकाने व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी (शहर) कार्यालयांतील कर्मचा-यांमार्फत संयुक्त कारवाई बुधवारी दुपारी बारा वाजता हाती घेण्यात आली.
यात दर्ग्याकडे जाणा-या मार्गावर असणारी ७५ अनधिकृत दुकाने व अतिक्रमणांवर धडक कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी वकील महोदयांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ व मुंबई शहर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत महापालिकेने संयुक्त कारवाई केल्याची माहिती जी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी दिली.
या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील ५० जणांच्या पथकासह महापालिकेचे ३० कामगार, कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. यासाठी १ जेसीबी ३ डंपर वापरण्यात आले होते. येथे एकूण ८० अनधिकृत बांधकामे होती. परंतु ५ बांधकामांना न्यायालयाने स्थगिती दिल्याने उर्वरित ७५ अनधिकृत दुकाने हटवण्यात आली.