देशाबाहेर जाण्यास मनाई असलेल्या व्यक्तींच्या यादीतून माझे नाव काढावे आणि मला देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याने केली आहे.
लाहोर- देशाबाहेर जाण्यास मनाई असलेल्या व्यक्तींच्या यादीतून माझे नाव काढावे आणि मला देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याने केली आहे.
अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्तानने सईदला नजरकैदेत ठेवले असून त्याला देशाबाहेर जाण्यासही मनाई केली आहे. त्यामुळे सईदची कोंडी झाली असून आपल्याला देशाबाहेर जाता यावे, यासाठी त्याने आटापिटा सुरू केला आहे.
दुसरीकडे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही सईदची नजरकैदेतून मुक्तता करावी, असे म्हणत त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा कसा पुरस्कर्ता आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
दहशतवादाच्या मुद्दय़ावर जागतिक दबाव वाढू लागल्यानंतर पाकिस्तानने जानेवारी महिन्यात हाफीज सईदसह एकूण ३८ जणांचा समावेश देशाबाहेर जाण्यास मनाई असलेल्यांच्या यादीत केला होता. यानंतर हाफीजसह ४ इतर नेत्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले असून शांतता भंग न होण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हाफीज सईदने याविरोधात पाकिस्तान सरकारला पत्र पाठवले असून आपल्याला देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.
माझ्या संघटनेचा कुठल्याही दहशतवादी कारवायांमधील सहभाग सिद्ध झालेला नसून त्यामुळे ही कारवाई जाचक असल्याचे सईदचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही सईदची संघटना म्हणजे एक मोठी स्वयंसेवी संस्था असल्याची स्तुतिसुमने उधळली असून त्याला नजरकैदेत ठेवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या भूमिकेवर भारतातून संताप व्यक्त होत आहे.
२००८ साली मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ निरपराधांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदच असल्याचे अनेक पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत. मात्र हे पुरावे पोकळ असल्याचे सांगत ठोस पुरावे देण्याची मागणी पाकिस्तान करत आहे. त्यामुळे पाकिस्तानची एकंदरीत दहशतवादाला खतपाणी घालण्याची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.