महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
कोल्हापूर- महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात होता.
गोव्यातील ‘सनातन संस्थे’चा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची सतत चौकशी सुरू होती. या काळात त्याने अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र, प्रत्येक वेळी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.
सुमारे दोन वर्षांच्या चौकशीनंतरही समीरचा हत्येत थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांकडे नाहीत. गुन्ह्यातील इतर आरोपींना पकडण्यातही पोलिसांना अपयश आले आहे, हे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
तपासातील या त्रुटींची गंभीर दखल घेत न्यायालायने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर समीर गायकवाडची सुटका केली. मात्र त्याला महाराष्ट्र सोडून कुठेही जाता येणार नाही, दर रविवारी तपास यंत्रणेकडे हजेरी लावावी लागणार आहे. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा लागणार आहे तसेच साक्षादारावर दबाव आणता येणार नाही आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे लागेल.