गोव्यात बहुमत सिद्ध करण्यात भारतीय जनता पार्टीने अखेर यश मिळवले.
गोवा- गोव्यात बहुमत सिद्ध करण्यात भारतीय जनता पार्टीने अखेर यश मिळवले. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बाजूने २२ जणांनी तर विरोधात १६ जणांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनीही सरकारला पाठिंबा दिला.
निकाल लागल्यापासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या गोवा राज्यात १३ जागा जिंकूनही बहुमतासाठी आवश्यक असणारी २१ ची मॅजिक फिगर गाठण्यात पर्रिकर यशस्वी ठरले. या ठरावाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या बहुमत चाचणीत २२ आमदारांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला तर १६ आमदारांनी विरोध केला.
मतदानापूर्वी काँग्रेसचे विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. यावेळी प्रतापसिंह राणे यांनी किती आमदारांची उपस्थिती घटनेप्रमाणे आवश्यक असते? असा सवाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभारी सभापतींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावानंतर पत्रकार परिषदेत पर्रिकर यांनी दिग्वजयसिंग यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी ११ वाजता होईल. त्यात राज्यपालांच्या अभिभाषणाला मंजुरी देण्यात येईल. मंत्रिमंडळाचे खाते वाटप आणि त्याबाबतची अधिसूचना शनिवारी काढण्यात येईल. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई यांनी किमान सहमत कार्यक्रमाचा आग्रह धरला आहे. तो एप्रिलच्या मध्यात जाहीर करण्यात येईल.
भाजपाचे १३ आमदार असूनही राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी भाजपाला आवतण दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काँग्रेसने सर्वाधिक जागा (१७) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा केला नाही, याचा आधार घेत राज्यपालांनी पर्रिकर यांना सत्ता स्थापण्यास सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयानेही राज्यपालांचाच निर्णय योग्य ठरवत पर्रिकर यांना ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, आज सकाळी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी आपण सध्या पक्षातच असल्याचे सांगत मी काँग्रेसलाच मतदान करणार असल्याचे विधानसभेत जाताना माध्यमांशी बोलताना सांगितले. प्रारंभी सर्व नूतन आमदारांना शपथ देण्यात आली.
काँग्रेस आ. विश्वजित राणे यांचा राजीनामा
गोव्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हा विषय हाताळणा-या नेत्यांमुळे पक्षावर ही वेळ आली आहे.
काँग्रेसकडून मला काही अपेक्षा नाहीत. त्यांनी गोव्यातील जनतेचा विश्वास धुळीला मिळवला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रभारी सभापतींकडे सोपवला आहे. ते वालपोली मतदारसंगातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. सुमारे सहा हजार मतांच्या आघाडीने त्यांनी विजय मिळवला होता.