ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राज्यातील १८ लेखक आणि विवेकवादी आणि पुरोगामी विचारवंतांना संरक्षण देण्याची शिफारस राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने केली आहे.
बेंगळुरू- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राज्यातील १८ लेखक आणि विवेकवादी आणि पुरोगामी विचारवंतांना संरक्षण देण्याची शिफारस राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने ज्येष्ठ नाटय़कर्मी गिरीश कार्नाड यांच्यासह बंगारू रामचंद्रप्पा, पाटील पुट्टप्पा आणि चन्नवीरा कनावी यांच्यासह अनेकांना पोलीस सुरक्षा दिली आहे. लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी सनदी अधिकारी एस. एम. जामदार यांनाही संरक्षण पुरविण्यात आले आहे. पूर्वी धमक्या देण्यात आलेल्यांचा सखोल आढावा घेऊन ही यादी बनविण्यात आली आहे, अशी माहिती एका गुप्तचर अधिका-याने दिली. ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश दोघेही वेगळ्या लिंगायत धर्माचे पुरस्कर्ते होते. या पार्श्वभूमीवर लिंगायत आंदोलनातील धुरिणांना संरक्षण पुरविण्यात येत आहे.
कलबुर्गी प्रकरणाच्या तपासात लिंगायत आंदोलनाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता. हिंदू धर्मात फूट पाडण्याचा हा प्रकार असल्याचे हिंदुत्ववादी मानतात. गौरी लंकेश यांनीही लिंगायत हा वेगळा धर्म असल्याबाबत अनेक लेख लिहिले होते, असेही एका अधिका-याने सांगितले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी राज्य सरकारने पाठविलेला अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळाला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी तो तयार केला असून, त्यामध्ये हत्येचा तपशीलवार घटनाक्रम आणि त्यानंतर पोलिसांनी उचललेली पावले यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे.
[EPSB]
९१ वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात होणार
[/EPSB]