अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. तरीही आपल्या समस्यांवर इतरांनी बोलावे, त्यांना वाचा फोडावी, अशी अनेकांची इच्छा असते. कारण स्वातंत्र्याचा हक्क बजावताना संयमाचीही आवश्यकता असते. अनेकांच्या ठिकाणी नसतो. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क त्यांना बजावता येत नाही.
राष्ट्र सेवा दल कल्याण डोंबिवली विभागातर्फे उद्या रविवार २४ सप्टेंबर रोजी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सद्यस्थिती’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे काही तथाकथित हिंदुत्ववादी लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आमच्या विचारांच्या लोकांच्या हत्या होतात त्यावेळी हे समाजवादी गप्प का बसतात? किंवा बौद्ध, मुस्लिम व अन्य धर्माविरुद्ध ते का लिहीत नाही, असे प्रश्न आयोजकांना विचारले जात आहेत. व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य सर्वानाच आहे. मग प्रश्न करतेच असे लेख का लिहीत नाहीत? तेथे बोटचेपेपणा का करतात? यातून दुस-याच्या काठीने साप मारायचा असाच त्यांचा प्रयत्न दिसतो. शिवाय ज्या कारणाने या परिसंवादाचे आयोजन केले आहे, तेही एका ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखणीचा, सामाजिक कामाचा तो एक कृतज्ञता सोहळा आहे, गौरव आहे. तसेच गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्ताने सद्यस्थिती समाजासमोर आणून गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहणे हा मुख्य हेतू आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवलीतील पत्रकार, काही युवक संघटना यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करून पत्रकारांच्या सुरक्षा कायद्याची मागणी केली आहे. कल्याण तहसीलदरांना तसे निवेदनही दिले आहे.
गौरी लंकेश या निर्भीड पत्रकार होत्या. कुणाचाही मुलाहिजा न राखता त्या रोखठोक लिखाण करत असत, तसेच त्यावर परखरड भाष्यही करत असत. त्यामुळे त्यांनी अनेकांशी वैचारिक शत्रुत्व ओढवून घेतले होते. माणूस विचारी असला तर विचारांना विचाराने उत्तर देऊ शकतो. आरोपांना उत्तर न देता प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचेही उपद्व्याप काही मंडळी करत असतात. मात्र ज्यांना दोन्ही गोष्टी शक्य नसतात आणि आपले कारनामे बाहेर पडण्याची ज्यांना भीती असते ते कायदा हातात घेतात. गौरी लंकेश यांनी जर भाजपच्या विरोधात लिखाण केले नसते तर त्यांची हत्या झाली नसती, असे स्पष्ट मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानेच व्यक्त केले आहे. यातून या मागच्या शक्ती कोण आहेत, विचार कोणते आहेत हे समजून तपासाची पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
भारतीय संस्कृतीबद्दल सर्वानाच अभिमान आहे. ती कुणा एका संस्थेची, समाजाची किंवा व्यक्तीची खासगी मक्तेदारी म्हणून वापरता येणार नाही. एकाद्या व्यक्तीचे विचार, त्यांची मते पटण्यासारखी नसली, ती विरोधी वाटत असली तरी त्या व्यक्तीला संपवण्याची म्हणजेच ठार मारण्याची आपली संस्कृती नाही. पण अलीकडल्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे आणि आता गौरी लंकेश यांच्या हत्येतून जे चित्र समाजासमोर उभे राहत आहे, त्यात न पटणारे विचार संपवण्याची प्रवृत्ती वाढत आहे हे स्पष्टपणे समोर येत आहे. गौरी लंकेश या धाडसी, निडर, आपल्या विचारांशी प्रामाणिक होत्या, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. त्यांचे कुणाशीही व्यक्तिगत वैर नव्हते. वागण्या बोलण्यातही त्या समोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा आदर करणा-या, मृदुभाषी होत्या.
या सर्वाचा अर्थ त्यांच्या लेखनातील प्रामाणिकपणा हेच त्यांच्या हत्येमागचे कारण असू शकेल का? शोषित महिला, दलित कामगार आणि शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी गौरी लंकेश यांनी आपली लेखणी वापरली. त्यांनी सत्ताधारी, धनिक, भांडवलदार यांची कधीही परवा केली नाही. त्या एक निडर पत्रकार होत्या. त्यांच्या लेखनाने विरोधकांना चिमटा तर बसे; पण त्यातून कधी रक्त आले नाही. आपल्या सडेतोड लेखनाने त्यांनी ‘गौरी लंकेश पत्रिके’ला एक स्वतंत्र दर्जा आणि मूल्य प्राप्त करून दिले होते. आपल्या पत्रिकेतून त्यांनी सांप्रदायिक आणि जातीयवादी शक्तींविरोधात कठोर पावले उचलली. महिलांमधील असमानतेविरोधात त्यांनी विपुल लेखन केले आहे. जातीव्यवस्था, जातपंचायतीला त्यांचा विरोध होता. शेतकरी आंदोलनाला त्यांची नेहमीच साथ असे. गरीब कामगारांवरील अन्यायावर त्यांची लेखणी तुटून पडे. त्या प्रादेशिक भाषेतून साध्या सोप्या शब्दांतून लेखन करीत म्हणून ते सामान्य माणसालाही वाचावेसे वाटे. त्यांच्या विचारांना समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळे. धर्म-जातीच्या आधारे सामाजात फूट पाडणा-या व्यवस्थेला, पक्षांना आणि विभाजनवादी शक्तींना त्यांचा कडाडून विरोध होता.
एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांच्या विरोधकांनी ती समजूनच घेतली नाही. गौरी लंकेश यांनी फक्त सत्ताधारी भाजपविरोधात लेखन केलेले नाही. त्यांनी शोषित वर्गासाठी, सामान्य जनतेसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी विपुल लेखन केले. सामाजिक समस्यांचे आक्राळविक्राळ विदारक रूप त्यांनी सातत्याने समाजासमोर मांडले. मात्र, या सर्वाना सत्ताधारी पक्षच जबाबदार असतो. सध्या केंद्रात आणि देशभरात जास्तीत जास्त ठिकाणी भाजप सत्ताधारी आहे. त्यामुळे अनेकदा सत्ताधारी म्हणून भाजप टीकेचे लक्ष्य होतो. यातच त्यांच्या लेखणीचा प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा गौरव आहे.