महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर विख्यात लेखिका पर्ल बक् यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले होते.. ‘‘त्यांच्यासाठी मरण सुद्धा सोपं झालं होतं! पण मरण इतकं स्वस्त झालं आहे का? या जगविख्यात नेत्याला त्यांच्याच लोकांनी सहज मारलं, पण जगाला दिलेल्या त्यांच्या मौलिक विचारप्रणालीचा अंत होईल का?’’
एखाद्या व्यक्तीचे विचार, त्यांची मते जर पटण्यासारखी नसली, विरोधी वाटत असली तर त्या व्यक्तीला ठार मारून टाकण्याची आपली संस्कृती नाही; परंतु गेल्या काही वर्षामध्ये जर एखाद्याचे विचार पटले नाहीत, त्याचा विरोध टोकदार होत असेल तर त्याला संपवूनच टाकण्याची प्रवृत्ती आज वाढत चालली आहे आणि ही समाजासाठी नक्कीच घातक आणि चिंतेची गोष्ट आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या याच विषारी प्रवृत्तीचा भाग आहे. गौरी लंकेश यांना का मारले, कोणी मारले हा भाग येथे नाही; परंतु त्यांना मारून साध्य काय झाले? गौरी लंकेश या धाडसी, निडर आणि आपल्या विचारांशी आणि लेखनाशी प्रामाणिक होत्या. कोणीतरी येऊन सहज त्यांना गोळ्या घालून मारून टाकावे इतके व्यक्तिगत वैरही त्यांचे कोणाशी नव्हते. मग त्यांची त्यांच्या लेखनावर आणि प्रामाणिकपणावर असलेली निष्ठा त्यांच्या खुनास कारणीभूत झाली का? आपल्या लेखनाशी आणि विचारांशी प्रामाणिक असणे, हा आज अपराध झाला आहे. शोषित महिला, दलित, कामगार आणि शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली व त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. यासाठी त्यांनी सत्ताधा-यांची किंवा धनिक भांडवलदारांची भीड कधीही बाळगली नाही. वैचारिक मतभेद असतील, ते असे गोळ्या घालून मारून टाकता येत नाहीत, तर चच्रेने, युक्तिवादाने आणि विचारांनीच सोडवावे लागतात; परंतु आज समाजाची विचारशक्ती खालावली असून एक प्रकारची मानसिक विकृती निर्माण होत चालली आहे असे वाटते. म्हणूनच टीकेला विचाराने उत्तर देण्याऐवजी टीकाकारालाच संपवून टाकण्याची वृत्ती बळावली आहे!
गौरी लंकेश या हाडाच्या पत्रकार होत्या. निडर पत्रकारिता त्यांनी स्वीकारली होती. वडिलांपासूनच पत्रकारितेचा वसा त्यांनी घेतला होता. त्यांचे वडील पी. लंकेश हे सुद्धा धडाडीचे पत्रकार होते. ‘लंकेश पत्रिके’ हे त्यांच साप्ताहिक होते. या साप्ताहिकाचा वाचकवर्ग मोठा होता. १९६२ मध्ये जन्म झालेल्या गौरीचे माध्यमिक शिक्षण बेंगळूरू मध्ये झाले. त्यानंतर पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्या दिल्लीला गेल्या. त्याचप्रमाणे ‘मास कम्युनिकेशन’मधली पदवी पण त्यांनी घेतली. पुढे काही काळ दिल्लीत वास्तव्य केले. टाइम्स ऑफ इंडियात काही काळ त्या कार्यरत होत्या. ‘टाइम्स’ मधील नोकरी सोडल्यानंतर काही वृत्तसंस्थांमध्ये त्या होत्या. परंतु पुढे मात्र लंकेश पत्रिकेत वडिलांना मदत करण्यासाठी त्या बेंगळुरूला परतल्या. वडिलांच्या निधनानंतर त्या साप्ताहिकाची धुरा गौरी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. गांधीजी किंवा लोहिया मार्गाने लेखन करणा-या आपल्या वडिलांपेक्षा लेखनाचा वेगळा व तिखट बाज गौरीने पत्करला आणि साप्ताहिकाला वेगळे वळण देत टोकदार भूमिका त्यांनी स्वीकारली; परंतु नंतर घरगुती अडचणींमुळे आणि विवादामुळे त्यांनी स्वत:चे ‘गौरी लंकेश पत्रिके’ हे वेगळे साप्ताहिक सुरू केले आणि गेली तेरा वर्षे हे साप्ताहिक चालवताना त्यांनी आपली लेखणी अधिक तिखट आणि धारदार केली. त्यांनी या आपल्या साप्ताहिकातर्फे सांप्रदायिक आणि जातीयवादी शक्तींविरोधात कठोर लेखन केले. तर कट्टर िहदुत्ववाद्यांच्या विरोधात त्यांची लेखणी आग ओकत होती. महिलांमधील असमानतेविरोधात त्यांनी लेखणी चालवली होती. जातीव्यवस्थेला विरोध, शेतकरी आंदोलनाला साथ, गरीब कामगारांना न्याय ही त्यांच्या लेखणीची वैशिष्टय़े होती. गौरी यांचे साप्ताहिक प्रादेशिक भाषेत निघत होते, म्हणूनच जनसामान्यांपर्यंत त्यांचे विचार पोहोचत होते. त्यामुळे त्यांचे साप्ताहिक फार लोकप्रिय झाले होते. धर्म आणि जातीच्या आधारे समाजात फूट पाडणा-या व्यवस्थेला, पक्षांना आणि विभाजनवादी शक्तींना त्यांनी आपल्या लेखणीने कडाडून विरोध केला होता.
‘गौरी लंकेश पत्रिके’च्या रोखठोक आणि परखड भाषेची जाणीव त्यांच्या अनेक लेखांवरून स्पष्ट होते. ३० ऑगस्टच्या अंकात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडेतोड टीका करणारा लेख आहे. ‘कर्नाटकात भडका उडविण्यासाठी आलेल्या भगव्या व्यक्तीची कथा’ असे या लेखाचे शीर्षक आहे. तर २ ऑगस्टच्या अंकात अशाच प्रकारे त्यांच्या लेखणीने भाजपविरोधात आग ओकली आहे. लेखाचे शीर्षक होते ‘राज्यात आग लावण्यास सज्ज.’ अर्थात गौरी लंकेश यांनी फक्त सत्ताधारी भाजपविरोधात लेखन केले नाही, तर शोषित वर्गासाठी, सामान्य जनतेसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले. सामाजिक समस्यांचे आक्राळविक्राळ रूप त्यांनी सातत्याने मांडले. म्हणूनच त्यांचे साप्ताहिक अगदी कामगार, शेतकरी, महिलांपर्यंत पोहोचले आणि त्यातच त्यांच्या लेखणीच्या प्रामाणिकतेचा आणि निष्ठेचा गौरव आहे.
तिखट आणि धारदार लेखणी असलेल्या गौरीचा स्वभाव मात्र अत्यंत मृदू आणि गोड होता; परंतु त्यांचे काळीज मात्र वाघाचे होते. भीती हा शब्द त्यांच्यापासून लांब होता. म्हणूनच त्यांच्या लेखणीला वेळोवेळी धार येत होती. साप्ताहिक चालवताना गौरी लंकेश यांच्यावर खूप कठीण प्रसंग आले, आíथक समस्या आल्या; परंतु अशा कठीण प्रसंगी सरकारची किंवा धनिक भांडवलदारांची आíथक मदत न घेता, फक्त जनतेच्या लोकप्रियतेवर त्यांनी आपले साप्ताहिक १३ वर्षे अत्यंत खंबीरपणे चालवले. यातच त्यांच्या लेखणीमधील असामान्यता लक्षात येते.
शेवटी एकच प्रश्न पडतो की, गौरी लंकेश यांची हत्या करून काय साध्य झालं? त्यांची विचारधारा संपणार आहे का? ‘शत्रूवर सुद्धा प्रेम करा’ असा मौलिक सिद्धांत गांधीजींनी जगाला दिला, तो विचार आपल्याच देशात का पाळला जात नाही?
[EPSB]