गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतक-याला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून विधान भवनात विरोधक आक्रमक झाले.
मुंबई- गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतक-याला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून विधान भवनात विरोधक आक्रमक झाले. शेतकरी पोलीस ठाण्यातच असतानाच त्याला न्यायालायत नेले असल्याची खोटी माहिती देणा-या अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने
करण्यात आली.
गारपीटीमुळे झालेली नुकसानीची भरपाई मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलेले औरंगाबाद जिल्ह्यातील रामेश्वर भुसारी यांना पोलिसांनी मारहाण केली होती. इतकेच नव्हे त्यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करून डांबून ठेवले होते.
ही माहिती मिळताच विरोधी पक्षांचे सदस्य चौकशीसाठी गेलेले असताना तो शेतकरी पोलीस ठाण्यात नाही, अशी माहिती तेथील अधिका-यांनी दिली होती. त्यानंतर भुसारी पोलीस ठाण्यातच असल्याचे आणि त्यांना जबरदस्त मारहाण झाल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पहायला मिळाले. त्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधान भवनात आंदोलन केले.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करीत सभागृह दणाणून सोडले. अखेर कामकाज करणे अशक्य झाल्याने विधान परिषदेचे कामकाज १४ व्या दिवशीही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.